गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 23 मार्च 2020 (16:58 IST)

आता देशांतर्गत विमान वाहतूकही थांबवायला हवी : राज ठाकरे

करोनाचा राज्यात होत असलेल्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारनं केलेल्या उपाययोजनांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. यासाठी मी सरकारचं अभिनंदन करतो. उपाययोजना करायला थोडा उशीर झालाय पण सरकारनं योग्य पावलं उचलली आहेत, असं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
 
राज म्हणाले, “यासंदर्भात  माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय. करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. पण आता पुढे जाऊन देशांतर्गत विमान वाहतूकही थांबवायला हवी,  अशी सूचना आपण मुख्यमंत्र्यांना केली. ज्यांनी आजवर डॉक्टरांवर हात उचलले आहेत. त्यांना आता त्यांचं महत्व कळतं असेल. त्या सर्वांना जाणीव झाली असेल की आपण काय चूक केली आहे.”
 
“कालचा जो बंद झाला मला अस वाटतंय की, काही मुठभर लोकांना याचं गांभीर्य अजूनही समजत नाही. जर भारतात हे पसरलं तर देशात ६० टक्के लोकांना याची लागण होऊ शकते, म्हणजे हा आकडा किती भयंकर असू शकतो याचा अंदाज यायला हवा. हे आवरण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा आहेत का?” असा सवालही राज यांनी यावेळी केली.