1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 28 एप्रिल 2020 (08:18 IST)

पोल्ट्री उद्योगाला सध्याच्या टाळेबंदीमुळे अजून मोठा फटका बसला

चिकन खाल्ल्यामुळे करोना होतो अशा खोडसाळ अफवांमुळे अडचणीत आलेल्या पोल्ट्री उद्योगाला सध्याच्या टाळेबंदीमुळे अजून मोठा फटका बसला आहे. फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या या अफवेमुळे ग्राहकांची चिकनसाठी असलेली मागणी उतरली आणि नंतर लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सुद्धा व्यावसायिकांना चिकन उत्पादन कमी करावे लागले. सध्या या अफवा शांत झाल्या आहेत. तसंच चिकनची मागणीही वाढू लागली आहे. तरीही मागणी आणि पुरवठा यांचा मेळ नसल्याने चिकनचे दर बऱ्यापैकी वाढले आहेत.
 
एकीकडे चिकन महाग झाले आहे तर दुसरीकडे पोल्ट्री उद्योगाला या सगळ्या कारणांमुळे घरघर लागली आहे. महाराष्ट्रात साधारणपणे 5.06 कोटी कोंबड्या या संघटित क्षेत्रांमध्ये असल्या तरीसुद्धा नुकत्याच झालेल्या पशू जनगणनेमध्ये शेतकऱ्यांनी परसात वाढवलेल्या कोंबड्यांची संख्या हे लक्षणीय म्हणजेच 2.21 कोटी होती. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाला बसलेल्या या फटक्यामुळे कुक्कुटपालनाकडे जोडधंदा म्हणून पाहणाऱ्या शेतकऱ्यावर सुद्धा संक्रांत येत आहे, अशी कबुली राज्य शासनाच्या पशुसंवर्धन खात्यातले अधिकारी देतात.