1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (08:29 IST)

चौथ्या लाटेपासून वाचण्यासाठी संपूर्ण लसीकरण आवश्यक राजेश टोपे म्हणाले…

राज्यातील राहिलेल्या नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावे, अशी मी त्यांना विनंती करतो असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून ही समाधानाची बाब असली तरी चौथ्या लाटेपासून वाचण्यासाठी संपूर्ण लसीकरण आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
 
यावेळी त्यांना पत्रकारांनी देशात किंवा राज्यात कोरोनाची चौथी लाट येऊ शकते का असा प्रश्न राजेश टोपेंना विचारला असता यावर उत्तर देताना ते म्हणाले की, आधी रुग्णसंख्या कमी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सर्वात महत्वाची आणि समाधानाची बाब ही आहे की नवीन केसेसची संख्या कमी झाली आहे. तर राज्यामध्ये सक्रीय रुग्णांची संख्या २० हजारांच्या खाली गेली असून एकेकाळी तिसरी लाट एवढी मोठी होती की एकावेळी ४८ हजार रुग्ण आढळत होते. काही लाखांमध्ये सक्रीय रुग्णसंख्या होती. या सर्व पार्श्वभूमीवर समाधानाची बाब ही आहे की केसेस कमी झाल्यात आणि लसीकरणाचे प्रमाण खूप चांगले आहे, असे टोपे यांनी म्हटले आहे.
 
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, जे काही राहिलेले लसीकरण आहे त्यांना मनापासून विनंती करायचीय की पूर्ण लसीकरण करुन घ्यावे. बुस्टर डोससाठी जे पात्र आहेत त्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी, अत्यावश्यक सेवेतील कामगार, पोलिसांनी बुस्टर डोस घेतला पाहिजे. १५ ते १८ वयोगटातील लोकांनाही लसीकरणाचा चांगला प्रतिसाद दिला आहे. लसीकरण राहिलेल्यांना मी प्रार्थना करेल की ज्यांची पहिली लस राहिली आहे त्यांनी ती नक्की घ्यावी. याचे कारण एकच आहे जर आपल्याला खऱ्या अर्थाने चौथी लाट येऊ द्यायची नसेल, सुरक्षित रहायचे असेल, समाजाला सुरक्षित ठेवायचे असेल तर लसीकरण करुन घेणे ही काळाची गरज आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.