1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 13 जुलै 2021 (10:31 IST)

‘अंगारकी विनायक चतुर्थी’ कथा महत्त्व आणि पूजा विधी

Angarika Vinayak Chaturthi Puja Vidhi
प्रत्येक महिन्यात दोनवेळा चतुर्थी योग असतात. दोन्ही चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहेत. शुक्ल पक्षावर पडणार्‍या चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला ‘संकष्टी चतुर्थी’ म्हणतात. ही चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते, तेव्हा तिला ‘अंगारकी चतुर्थी’म्हणतात.  काही उपासक विनायक चतुर्थीच्या दिवशीही संपूर्ण दिवसभर उपवास करतात. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करणाऱ्याच्या मनातील इच्छा पूर्ण होतात, अशी गणेशभक्तांची श्रद्धा आहे. 
 
व्रत आणि पूजा करण्याची पद्धत
सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घालावे. 
नंतर श्रीगणेशाचे ध्यान करावं.
गणपतीसमोर व्रत करण्याचा संकल्प करावा. 
नंतर गणेशाच्या मूर्तीला पाणी, रोली, अक्षत, दुर्वा, लाडू, पान, अगरबत्ती अर्पण करावं. 
गणपतीला जास्वंदाची फुले आणि दुर्वा यांचा अर्पित कराव्या.
व्रताची कथा सांगावी किंवा ऐकावी. 
आरती करावी. 
अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणावे.
गणपती मंत्राचा जप करावा. 
संध्याकाळी चंद्रोदयानंतर व्रत सोडावं.
 
व्रताची कथा
शिवपुराणात उल्लेखित उपाख्यानानुसार, पार्वतीने एकदिवशी नंदीस द्बारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली. यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीस झुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली. शेवटी सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले. या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले. नंतर एकेदिवशी या कुमार मुलास द्वारपाल नेमून पार्वती स्नानास गेली असता शंकर तेथे उपस्थित झाले. त्यावेळी या कुमाराने शंकरास अडवले. पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद व नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झाले. यावेळी शंकरांनी त्रिशुलाने त्याचे मुंडके उडवले.
 
ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रुद्ध होऊन सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद व देवगणांनी पार्वतीला शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. शंकरांनी त्यास होकार दिला परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी गणांस उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुंडक्याच्या साहाय्याने कुमारास जिवंत केले. तदपरांत शंकरांनी या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले. देवगणांच्या आशिर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व गणेश नावाने प्रसिद्ध झाला. कुठल्याही पूजे आधी पहिला मान गणपती बाप्पांना असतो आणि त्यांचीच पूजा केली जाते.