शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जानेवारी 2020 (11:55 IST)

देवासमोर काढा वाराप्रमाणे रांगोळी

प्रत्येक वारा प्रमाणे रांगोळी काढण्याचे आपले महत्त्व आहे. श्रद्धेने काढल्यास आपणास शुभ फलश्रुती होते. या रांगोळ्या कश्या काढायच्या, त्यांचे काय महत्त्व आहे? त्यामुळे काय फायदा होतो ? हे जाणून घेऊ या.....
 
सोमवारची रांगोळी  :- 
ही रांगोळी काढल्यास सर्व विघ्ने दूर होऊन प्रगती होते. आणि चंद्राची पूजा केल्यास पुण्य लाभते. ह्यातले क्लीं हे बीजाक्षर श्रीकृष्णाशी संबंध दाखवते. हे बीज बुद्धीचे कारक आहे. हे लक्ष्मीबीज आहे. त्यामुळे लक्ष्मीची कृपा होऊन धन-धान्य, समृद्धी मिळविण्यासाठी या रांगोळीचा उपयोग होतो. ही रांगोळी काढल्यावर ह्यात एक प्रकाराचे चैतन्य निर्माण होते.

मंगळवारची रांगोळी :-
या रांगोळीने संपत्ती प्राप्त होते, शास्त्राचे ज्ञान होते आणि मंगळ ग्रहाच्या पूजल्याचा लाभ होतो. ह्यातले ह्रीं हे बीजाक्षर सूर्याशी निगडित आहे. सूर्याची जीवनशक्ती, आरोग्य प्रदान करण्याची ताकद या बीजाक्षरात सामावलेली आहे.
बुधवारची रांगोळी :-
या रांगोळीमुळे सर्व प्रकारच्या शास्त्रांचे ज्ञान मिळते. पत्नी प्रेम वाढून घरात सुख शांती नांदते. पैशाने होणारे नुकसान टळते. आणि बुध ग्रहाच्या पूजल्याचा लाभ मिळतो.
गुरुवारची रांगोळी :-
या रांगोळीने संपत्ती प्राप्त होते आणि शास्त्राचे ज्ञान होऊन गुरु ग्रहाच्या पूजेचा लाभ मिळतो. महत्त्वाकांक्षेची पूर्ती होऊन कीर्ती मिळते.
शुक्रवारची रांगोळी :-
या रांगोळीमुळे मुला- मुलींचे विवाह योग्य ठिकाणी होतात. अर्थात चांगले योग जुळून येतात. जोडीदार चांगला मिळतो. शुक्र ग्रहाच्या पूजल्याचा लाभ मिळतो. हा वार देवीचा असल्याने आदिशक्तीचा वरदहस्त आपल्यावर राहतो.
शनिवारची रांगोळी :-
या रांगोळीमुळे आरोग्य लाभ प्राप्ती होते. भूत, प्रेत, पिशाच्च बाधा होत नाही. शनी ग्रहाच्या पूजल्याचा लाभ मिळतो. शनी हा न्यायप्रिय ग्रह आहे आणि बऱ्याच वेळा दुःख देणारा ग्रह समजला जातो. आपल्या दुःखाचे निर्दालन करण्याची ताकद ह्या रांगोळीत आहे.
रविवारची रांगोळी :-
या रांगोळीमुळे हाती घेतलेले काम पूर्ण होऊन सिद्धी प्राप्त होते आणि सूर्य पूजल्याचा लाभ मिळतो. प्रत्यक्षात आपणं ह्याच देवाला दररोज बघतो. या प्रत्यक्ष दिसणाऱ्या देवात एक अव्यक्त अशी आत्मशक्ती दडलेली आहे, जी आपणं बघू शकत नाही, पण अनुभवू शकतो. सूर्य पूजा म्हणजे आपल्या आत्म्यांचीच पूजा आहे.