suvichar

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय २८

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (14:09 IST)
 
भर्तृहरी राजा गांवाच्या शिवेशीं येतांच द्वाररक्षकांनीं पिंगला सती गेलाचा वृत्तांत कळविला. तेव्हां राजास अत्यंत दुःख झालें. तो तसाच रडत, ओरडत स्मशानांत गेला व आपणहि पिंगलेप्रमाणें जळून जावें, अशा उद्देशानें तो तिच्यासाठीं केलेल्या अग्नींत उडी टाकू लागला. पण बरोबरच्या लोकांनीं त्यास धरून ठेवल्यामुळें राजाचा कांहीं इलाज चालला नाहीं. पिंगलेची ही अवस्था झाल्यानें राजास अतिशय दुःख झालें. तो तिचे एक एक गुण आठवून रडत होता.
 
पिंगला सती गेली म्हणून भर्तृहरी स्मशानांत शोक करीत आहे, ही बातमी ऐकून गांवचे लोकहि धांवत धांवत स्मशानांत आले. तेहि राजाबरोबर मोठमोठ्यानें रडूं लागले. परंतु त्यांचें तें रडणें वरवर दाखविल्यापुरतेंचि होतें.
 
राजा शोकसागरांत पडला असतां लोक त्याची समजूत करूं लागलें कीं, राजन् ! अशाश्वताचा शोक करून काय उपयोग ! ईश्वरावर भरंवसा ठेवून स्वस्थ असावें. अशा रीतीचा लोकांनी राजास पुष्कळ बोध केला. परंतु राजाचें तिकडे लक्ष जाईना. शेवटीं लोक आपापल्या घरोघर गेले. राजा मात्र स्मशांनांत पिंगलेच्या चितेशींच बसून राहिला. राख भरून टाकण्यासाठीं दुसर्‍या दिवशीं लोक स्मशानांत गेले. परंतु भर्तृहरी चित्तेस हात लावूं देईना व आपणहि तेथून उठेना. या पल्ल्यास गोष्ट आल्यानंतर लोक निघून गेले. भर्तृहरी मात्र अन्नपाण्यावांचून तसाच तेथें रात्रंदिवस बसून राहिला.
 
याप्रमाणें अवंतीमध्यें घडलेला प्रकार दूतांनीं मिथूलेस जाऊन विक्रमराजास सांगितला. तो ऐकून सत्यवर्मा, शुभविक्रम, सुमंतीक प्रधान आदिकरून सर्व मंडळींस अत्यंत दुःख झालें. ते सर्व ताबडतोब उज्जैनीस आले व स्मशानामध्यें जाऊन पाहतात तों त्यांना पिंगलेचें दुःख करीत भर्तृहरी रडत बसलेला दिसला. तेव्हां विक्रमराजा भर्तृहरीची समजूत करूं लागला. परंतु त्याला वेड लागल्यासारखें झालें तो पिंगला ! पिंगला ! असें म्हणून रडत होता. त्यास बोध करितां करितां दहा दिवस गेल्यावर विक्रमानें पिंगलेची उत्तरक्रिया केली. नंतर तो राज्यकारभार पाहूं लागला. विक्रमराजा त्यास नित्य जाऊन बोध करीत असे. याप्रमाणें बारा वर्षें झाली. पण बोध केल्यानें कांहीं फायदा झाला नाहीं. पिंगलेच्या दुःखाने भर्तृहरीनें अन्न सोडलें होतें व तो फक्त झाडांची पानें खाऊन व उदक प्राशन करून राहिला होता. त्यायोगानें त्याचें शरीर कृश झालें.
 
भर्तृहरीची अशी अवस्था पाहून मित्रावरूणीस ( सूर्यास ) त्याची दया आली. नंतर तो दत्तात्रेयाकडे गेला. दत्तात्रेयानें त्यास येण्याचें कारण विचारलें असतां मित्रावरूणी म्हणाला, आपणांस सर्व ठाऊक आहे. मीच सांगितलें पाहिजे असें नाहीं. परंतु सुचवायचें इतकेंच कीं भर्तृहरीवर आपली कृपा असूं द्या म्हणजे झालें. मग मित्रावरुणीस दत्तात्रेयानें धीर देऊन भर्तृहरीबद्दल काळजी न वाहतां स्वस्थ मनानें जावयास सांगितिलें व मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ यास मी भर्तृहरीकडे पाठवून त्यास बोध करून ताळ्यावर आणतो, अशा रीतीनें मित्रावरूणीची समजूत करून त्याची रवानगी केली.

सर्व पहा

वट पौर्णिमा २०२६: विवाहित महिलांनी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम काय करावे?

Vat Purnima 2026 Wishes in Marathi वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

Vat Purnima 2026 वट पौर्णिमा २०२६: पूजा, शुभ मुहूर्त, व्रत कथा आणि जाणून घ्या काय करावे-काय टाळावे

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments