शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 15 मार्च 2023 (13:54 IST)

शेअर मार्केटमधील गुंतवणूक खरंच झटपट पैसा देते? त्यात काय धोके आहेत?

स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणं पूर्वीपेक्षा अधिक सोपं आहे. ऑनलाईन सेमिनार, मोबाईल फोनवरचे अ‍ॅप याद्वारे खातं कसं उघडावं आणि पैसे कसे गुंतवावे हे सांगणारी माणसं आहेत.
 
नव्वदीचं दशक जसं संगणकक्रांतीचा काळ होता. तसं सध्याच्या कालखंडाला 'बाजारक्रांती' असं म्हटल्यास वावगं ठरु नये.
 
यामुळेच गुंतवणूकदारांची संख्या वाढते आहे. गेल्या वर्षी एक लाख 20 हजार कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढून घेतले.
 
याआधी जेव्हा असं झालंय तेव्हा बाजाराला फटका बसला आहे. पण यावेळेस असं झालं नाही. 2022 मध्ये म्युच्युअल फंडात छोट्या गुंतवणूकदारांनी 74000 कोटी रुपये गुंतवले.
 
एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक हाही एक महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे.
 
पण दुसरीकडे असेही लोक आहेत, जे पर्सनल फायनान्स मॅनेजमेंटसंबंधी प्रचंड माहिती असतानाही चाचपडताना दिसतात. त्यांना अनेक गोष्टी लक्षात येत नाहीत.
 
अभिनेता अर्शद वारसीसंदर्भात एक वाद समोर आला होता. युट्यूब चॅनेलवरुन झालेल्या घोटाळ्यात अनेक गुंतवणूकदारांचे पैसे गेले होते.
 
भविष्यात असं नुकसान होऊ नये पर्सनल फायनान्ससंदर्भात काही मूलभूत गोष्टी
 
1. गुंतवणूक का खर्च?
बँकेतून काढत असलेला प्रत्येक रुपया हा खर्च होतोय का गुंतवला जातोय हे आपण समजून घ्यायला हवं.
 
आवश्यक गरजांव्यतिरिक्त अन्य गोष्टींवर म्हणजेच महागड्या गोष्टींवर होणारा खर्चही आपल्या मिळकतीच्या प्रमाणात हवा.
 
आपल्या ओळखीतल्या व्यक्तीकडे एखादा महागडा फोन असेल तर तो फोन तुम्हाला घ्यायला जास्त पैसा लागू शकतो. पण तुम्ही त्या फोनचा वापर अभ्यासासाठी, कामासाठी आणि त्यातून पैसे कमावण्यासाठी करत असाल तर मात्र ती गुंतवणूक आहे.
 
अनेक जणं दुसऱ्यांची लाइफस्टाईल, त्यांच्याकडच्या महागड्या वस्तू पाहतात आणि त्यांच्या उत्पन्नाचा बराचसा भाग तशाच वस्तू खरेदी करण्यावर खर्च करतात. मग त्याची गरज असो की नसो. हे पूर्णपणे आर्थिक नियोजनाच्या तत्वाच्या विरुद्ध आहे.
 
वॉरन बफे यांनी सांगितलेली एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे- जे लोक गरज नसेल्या वस्तूही खरेदी करतात, त्यांच्यावर पुढे जाऊन गरजेच्या वस्तू विकायची वेळ येते.
 
2. झटपट पैसा मिळवता येतो?
अनेक लोकांनी स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवून भक्कम आर्थिक स्रोत निर्माण केले आहेत. पण त्यांच्यापैकी कोणीही झटपट पैसे मिळवलेले नाहीत.
 
अनेक नवीन गुंतवणूकदारांना असं वाटतं की स्टॉक मार्केटमधून झटपट पैसा मिळवता येतो. हे सर्वस्वी चूक आहे.
 
एखाद्या कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवले तुर तुम्हाला वर्षभरात दुप्पट, तिप्पट परतावा मिळेल अशा जाहिराती तुम्ही वाचल्या असतील. या जाहिरातींपासून, दाव्यांपासून सावध राहा.
 
'रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट' असं काही नसतं. जर कमी कालावधीत जास्त पैसा मिळत असेल, तर त्यामध्ये जोखीमही तितकीच अधिक असते हे विसरता कामा नये.
 
फ्युचर्स-ऑप्शन्स संदर्भातही अनेकदा असं सांगितलं जातं की, अमुक व्यक्तीने वर्षभरातच त्याच्या गुंतवणुकीच्या कितीतरी पट पैसा कमावला.
 
पण त्यातही जोखीम आहेच.
 
दुसरीकडे पर्सनल फायनान्सच्या तत्वांनुसार गुंतवणूक ही एक दीर्घकालीन गोष्ट आहे.
 
3. फारसा वेळ न घालवता पैसा कमावता येतो...
दर महिन्याला मिळणाऱ्या पगाराव्यतिरिक्त उत्पन्नाचा पर्यायी स्रोत म्हणून स्टॉक मार्केटकडे पाहणं यात काहीही गैर नाहीये. पण कोणताही वेळ न गुंतवता शेअर मार्केटमधून पैसे मिळत राहतील हा विचार करणंही चूक आहे.
 
नियोजनपूर्वक गुंतवणूक करून स्ट्राँग पोर्टफोलिओ तयार करणं हे वेळखाऊ काम आहे.
 
आपली जोखीम पत्करण्याची तयारी आणि आर्थिक उद्दिष्टांचा विचार करून आपला पोर्टफोलिओ तयार करणं गरजेचं आहे.
 
या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतो. पोर्टफोलिओ तयार केल्यानंतरही दर सहा महिन्याला परीक्षण करत राहायला हवं. एखाद्या गुंतवणुकीतून समाधानकारक परतावा मिळत नसेल तर तुम्ही त्याचा अभ्यास करायला हवा.
 
ही सगळी प्रक्रिया वेळखाऊ आहे. पोर्टफोलिओ तयार केल्यानंतरही प्रत्येक सहा महिन्यांनी त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आढावा घेणं आवश्यक आहे.
 
जर कोणत्याही गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा मिळत नसेल, तर त्याचं विश्लेषण करून योग्य ती उपाययोजना करणं आवश्यक आहे.
 
सुधारित पर्याय आजमवायला हवेत. यासाठी वेळ लागतो, तो देणं आवश्यक आहे.
 
काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं
1. काही दुर्देवी घटन घडली तर कुटुंबाला आर्थिक मदत होऊ शकेल असा राखीव पैसा तुमच्याकडे आहे का?
 
सामान्यत: असा विचार हा मानसिकदृष्ट्या त्रास देणारा असतो. पण आर्थिक नियोजनाच्या वेळी भावनांना काहीच स्थान नसतं. तुमच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून देणं आवश्यक आहे. तुमचे सगळे खर्च निभावू शकतील असा विमा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे.
 
2. एखाद्या कारणामुळे माझी नोकरी गेली तरी मी माझी जीवनशैली तशीच ठेवू शकतो का?
 
सरकारी कर्मचाऱ्यांना जे आर्थिक स्थैर्य मिळतं ते खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही. 2008 मध्ये उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे अनेक लोकांनी नोकरी गमावल्या. ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते. आपण यातून धडा शिकायला हवा आणि आर्थिक नियोजन करायला हवं.
 
3. तुमच्या मुलांना उच्चशिक्षण देता येईल, एवढं तुमचं आर्थिक नियोजन आहे का?
 
हा प्रश्न कदाचित आदर्शवादी वाटू शकतो. पण मुलांच्या शिक्षणाचा खर्च हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाटा असू शकतो असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
 
मुलांच्या शालेय, महाविद्यालयीन आणि त्यापुढच्या शिक्षणासाठी पुरेसे पैसे तुमच्याकडे आहेत याची काळजी घ्या. तेव्हा महागाई वाढलेली असू शकते याचाही अंदाज घेऊन तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल.
 
4. तुमचं आयुष्य निवृत्तीनंतर नीट जगू शकाल एवढी तुमची आर्थिक ताकद आहे का?
 
निवृत्ती तर खूप दूरची गोष्ट आहे असं अनेकांना वाटतं. पण पर्सनल फायनान्सच्या तत्वांनुसार जर एखादा टाळता येणार नाही असा खर्च असेल तर त्यानुसार नियोजन करायला हवं.
 
5. तुमच्या कुटुंबात अनुवांशिक आजारपण आहे का?
 
हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. अनुवांशिक आजारपणं चाळिशीनंतर दूर होण्याची शक्यता नसते उलट बळावू शकते. अशा वयात विमा मिळणंही अवघड असतं. अनुवांशिक आजारपण असलेल्या लोकांनी जास्तीत जास्त आजारांना सामील करणारं विमा कवच घ्यावं.
Published By -Smita Joshi