गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (08:22 IST)

एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा : नितेश राणे

'गेल्या तीस वर्षापासून मुंबईकरांनी शिवसेनेच्या हातात बृहन्मुंबई महानगर पालिकेची एकहाती सत्ता दिली आहे. परंतु या मुंबईकरांच्या विश्वासाची परतफेड आपण कायमच रस्त्यावरच्या खड्ड्यांनी केली. मुंबईकरांच्या हक्काच्या किमान मुलभूत सुविधा तुम्ही पुरवाव्यात ही मुंबईकरांची रास्त अपेक्षा होती. परंतु अनेक मुंबईकरांना या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात आपला व आपल्या आप्तांचा जीव गमवावा लागला आहे. आज मुंबईकर वैतागुन म्हणतोय एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा.' अशी टीका महापौर किशोरी पेडणेकर यांना लिहलेल्या पत्रात आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
 
'आजपर्यंत मुंबईतील खड्ड्यांसाठी २२ हजार कोटी खर्च करुनही खड्डेमुक्त रस्ते होत नाहीत. मुंबई मनपानं सामान्यांनी आपल्या करातून दिलेला हा पैसा खड्ड्यात घातल  की कॉट्रक्टर्सच्या घशात? असा सामान्य मुंबईकरांच्या मनातला प्रश्न भाजप युवा मोर्चाचे तरुण विचारायला जातात. लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात. तेव्हा आमच्यावर दंडुकशाहीचा गैरवापर करून लाठी हल्ला केला जातो.' असेही राणे यांनी पत्रात म्हटले
 
'महानगर पालिकेतील सत्ताधारी सेना जर कॉट्रॅक्टरधाजणे निर्णय घेत असेल व आम्ही विचारलेल्या प्रश्नांना दाद देत नसेल तर लोकशाहीने मार्गाने आयुक्तांना भेटण्याचा पुर्ण अधिकार आहे. परंतु महापालिका आयुक्तही माझ्या युवा मोर्च्याच्या सहकाऱ्यांना भेटण्याचे टाळत आहेत. याचा अर्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कॉट्रॅक्टरच्या संगनमताने सत्ताधारी सेनेकडून दबाव टाकला जातोय की काय? किंवा त्यामुळेच भाजप युवा मोर्चाचे निवेदन स्वीकारण्याची महापालिका आयुक्तांना भिती वाटतेय?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
'सामान्य मुंबईकरांसाठी न्याय मागणाऱ्यांवर हल्ला करण्यात जी तत्परता तुम्ही दाखवली तीच तत्परता रस्त्यांचे खड्डे बुजवण्यात आपण दाखवाल, अन्यथा दिवाळीपूर्वी रस्त्यावरचे खड्डे उचलण्यात ठोस पाऊल उचलले नाहीत तर मी आणि माझे भाजपा युवा मोर्चाचे सहकारी यांना सोबत घेऊन मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी स्वतः रस्त्यावरती उतरू'. असा इशारा नितेश राणे यांनी दिला.