1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (08:06 IST)

नवनीत आणि रवी राणांना अडवण्यासाठी शिवसैनिकांचा मातोश्रीवर पहारा

navneet rana
"उद्या सकाळी 9 वाजता 'मातोश्री'वर जाऊन हनुमान चालिसा वाचणार आहे. आम्हाला अडवून दाखवा," असं आव्हान अपक्ष आमदार रवी राणा यांनी शिवसैनिकांना दिलंय. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी मुंबईत आज (22 एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.
 
दरम्यान दुपारी साडेचारवाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे मातोश्री निवासस्थानी दाखल झाले. त्यावेळेस शिवसैनेच्य कार्यकर्त्यांनी 'शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है' च्या देणाऱ्या घोषणा दिल्या.
 
संध्याकाळ झाली तरी शिवसैनिकांनी मातोश्रीचे आवार सोडले नाही. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडल्यावर त्यांनी शिवसैनिकांना परत जाण्याची विनंती केली मात्र शिवसैनिकांनी मातोश्री निवासस्थानाचा परिसर सोडणार नसल्याचा निर्धार बोलून दाखवला.
 
नवनीत आणि रवी राणा काय म्हणाले?
आमदार रवी राणा म्हणाले, "उद्धवसाहेब हिंदुत्व विसरले आहेत आणि ते दुसऱ्याच दिशेनं जाऊन महाराष्ट्राचं वाटोळं करतायेत. महाराष्ट्राचं हे विघ्न संपवण्यासाठी हनुमान चालिसा वाचण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि उद्या 9 वाजता आम्ही तिथं जाणार आहोत."
 
मुंबई पोलिसांनी आम्हाला कलम 149 नुसार नोटीस दिलीय, अशी माहिती राणा दाम्पत्यानं दिली.
 
यावेळी रवी राणा म्हणाले, "आम्ही गोंधळ करण्यासाठी आलो नाहीय. आमचा एकच उद्देश आहे, महाराष्ट्रातील संकटाच्या मुक्तीसाठी मोतीश्रीची वारी करणार आहोत. बजरंगबली, हनुमानाचं नाव घेताना विरोध होत असेल तर त्याला विरोध करावा लागेल."
 
"कायदा सुव्यवस्थेचं पालन करून मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचू. कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडू देणार नाहीत. माझं आमच्या लोकांना आवाहन आहे की, मुंबईत येऊ नका. वातावरण बिघडवायचं नाहीय," असंही राणा म्हणाले.
 
 
"मुंबईत पाय ठेवू देणार नाही, असं शिवसैनिक म्हणाले होते. पण शिवसैनिकांना मी मुंबईत आलो हे कळलंच नाही. आणि पाय नाही इथं जिवंत उभा आहे," असंही रवी राणा म्हणाले.
 
यावेळी नवनीत राणा म्हणाल्या की, "बाळासाहेबांनी पदासाठी विचारधारा मरू दिली नाही, समाजासाठी लढाई केली."
 
"मुंबईत जन्म, विदर्भाची सून, शिवसैनिक माझं काहीही बिघडवू शकत नाही," असंही यावेळी नवनीत राणा म्हणाल्या.
 
नवनीत राणा-रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अखेर मुंबईत पोहोचले आहेत. ते मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करणार आहेत.
 
या प्रकाराला शिवसेनेने विरोध केला आहे. राणा दाम्पत्याच्या या भूमिकेमुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही आक्रमक झाल्या आहेत. आमच्या शिवसैनिकांची माथी भडकवू नका, ते तुम्हाला भारी पडतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
 
पहाटे अडीच वाजता राणा दाम्पत्य खाजगी वाहनाने नागपूर विमानतळावर पोहचले, त्यानंतर सकाळी साडेसहाच्या विमानाने नागपूर विमानतळावरून मुंबईला रवाना झाले.
 
यावेळी खासदार नवनीत राणा वाय प्लस दर्जाची सुरक्षा न घेता मुंबईत पोहोचल्या आहेत.
 
उद्या 23 एप्रिल रोजी ठाकरे कुटुंबीयांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री समोर हनुमान चालिसाचं वाचन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
राणा समर्थक सायंकाळी 7 वाजता मुंबईला निघतील आणि उद्या सकाळी मातोश्रीवर राणा दाम्पत्यासह कार्यकर्ते हनुमान चालिसा म्हणणार, अशी माहिती युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाअध्यक्ष जितू दुधाने यांनी दिली आहे.
 
दरम्यान, राणा यांच्या खार येथील निवासस्थानी आणि मातोश्रीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शिवसैनिक घोषणाबाजी करत आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
 
रवी राणा यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेड लावले आहेत. हा रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आलाय.
 
मातोश्री हे मुख्यमंत्र्यांचं खासगी निवासस्थान आहे. तसंच कलानगर हा भाग मोठा वर्दळीचा आहे. तसंच कोणतंही आंदोलन करण्याची परवानगी फक्त आझाद मैदानात करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे 23 तारखेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला बजावली आहे.
 
भाजपला बंटी आणि बबलीची गरज - संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी रामा दाम्पत्याला बंटी बबलीची उपमा दिली आहे.
 
नागपुरात बोलताना ते म्हणाले, "राणा दाम्पत्याला जर स्टंटच करायचे असतील तर शिवसेनेलाही स्टंटचा अनूभव आहे. त्यांना मुंबईचे पाणी माहित नाही अजून. हनुमान चालीस वाचणे, रामनवमी हे श्रद्धेचे विषय आहेत.  हे नौटंकीचे किंवा स्टंटचे विषय नाही. भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाची नौटंकी आणि स्टंट करून ठेवला आहे.  त्यातली ही सर्व पात्रं आहेत.
 
"राणा दाम्पत्याला लोक यांना गांभीर्यानं घेत नाहीत. महाराष्ट्रात आम्ही सर्व सण साजरे करतो, रामनवमी, हनुमान जयंती आणि गुढीपाडवा साजरा करतो. भाजपाला आता राणा दांपत्यासारख्या बंटी आणि बबलीची आपल्या मार्केटिंगसाठी आवश्यक पडते अशी परिस्थिती आहे. मुंबईचे पोलीस आणि शिवसैनिक सक्षम आहे. भारतीय जनता पक्षाला आता मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड फिल्मस्टार्सची गरज पडली आहे."
 
दरम्यान पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याशी चर्चा केली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याबाबत चर्चा झाली असल्याचं उपायुक्तांनी सांगितलं.  
 
राणा यांची मातोश्रीवर आंदोलन करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही.
 
2020 च्या ऐन दिवाळीत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाचा पवित्रा घेतला. शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईत 'मातोश्री' वर धडक देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
 
पण, पोलिसांनी त्यांना अमरावतीतच ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे आता काय होतंय यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.