गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 1 एप्रिल 2021 (07:56 IST)

ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना लिहील पत्र

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये सोनिया गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. ममता बॅनर्जी यांनी पत्रातून विधानसभा निवडणुकीचा हा टप्पा झाल्यानंतर भाजपाविरोधात रणनीती आखण्यासाठी बैठक करण्यासंबंधी सुचवलं आहे. ममता बॅनर्जी यांनी पत्रात सात मुद्द्यांचा उल्लेख केला असून भाजपाकडून लोकशाही आणि राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे असं म्हटलं आहे. तसंच देशातील जनतेसमोर आपण नवा पर्याय ठेवला पाहिजे असंही मत व्यक्त केलं आहे.
 
“भाजपा इतर पक्षांना घटनात्मक हक्क आणि स्वातंत्र्य मिळू नये यासाठी प्रयत्न करत आहे. राज्य सरकारांचे अधिकार सौम्य करून त्यांना केवळ पालिकेच्या स्तरावर न्यायचं आहे. थोडक्यात त्यांना संपूर्ण देशात एका पक्षाचं हुकूमशाही शासन स्थापन करायचं आहे,” असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
 
“मला वाटतं ती वेळ आली आहे जेव्हा भाजपाकडून लोकशाही आणि राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. टीएमसीची प्रमुख म्हणून मी मनापासून तुमच्यासोबत आणि समविचारी इकर पक्षांसोबत या लढ्यात आहे,” असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
 
ममता बॅनर्जींनी हे पत्र सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच डीएमकेचे स्टॅलिन, वायएसआर काँग्रेस प्रमुख जगन मोहन रेड्डी, बीजेडी प्रमुख नवीन पटनाईक, तेलंगण राष्ट्रसमिती प्रमुख चंद्रशेखर राव, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पाठवलं आहे.