शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जून 2020 (16:32 IST)

महत्त्वाची बातमी, प्रशासनाने जारी केला नवा आदेश

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच (pune corona cases updates)चालली आहे. त्यामुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येईपर्यंत प्रत्येक नागरिकाने मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आला आहे. जर मास्क न वापरल्यास कुणी आढळलं तर त्याला 500 रुपये दंड ठोठवण्यात येणार आहे.
अनलॉक 1 मध्ये अटी शिथिल करत सर्व बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहे. परंतु, गेल्या दोन आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे शहरात मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.
 
घराबाहेर पडताना, सार्वजनिक ठिकाणी, सरकारी-खाजगी कार्यालयात  मास्कचा वापर सक्तीचा असणार आहे.  मास्क न वापरल्यास 500 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. शुल्क भरण्यास टाळाटाळ केली तर कलम 188 नुसार कारवाई केली जाणार आहे, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
दरम्यान, पूर्व भागातील बीटी कवडे रस्ता परिसर हा सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे.  26 ते 30 जून या परिसरात सकाळी 7 ते 9 दूध विक्री आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 7  दरम्यान दवाखाने, औषधाची दुकाने वगळता इतर सेवा बंद राहतील.
 
बीटी कवडे रस्ता माल वाहतूक आणि अत्यावश्यक सुविधा पुरवणारी वाहने यांच्या वाहतुकीसाठी खुला राहणार आहे.
 
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17515  वर
दरम्यान,  पुणे  शहर आणि जिल्ह्यात गेल्या 24 तासामध्ये कोरोनाचे 660 रुग्ण आढळले (pune corona cases updates) आहे.  यापैकी 531 रुग्ण पुणे शहरात तर 98 रुग्ण पिंपरी चिंचवड भागात आढळून आले आहे.  तर ग्रामीण भागात 24 तर छावणी परिसरात 11 रुग्णांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात 20 जण मृत्यू पावले. जिल्ह्यात 17515 एकूण कोरोनाबाधित रुग्ण संख्या आहे तर 645 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
लग्न समारंभासाठी 50 जणांचा परवानगी
दरम्यान,  कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन दरम्यान, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी  देण्यात आलेली आहे. त्यामुळे 50 लोकांच्या मर्यादेतच सोशल डिस्टसिंग पाळून खुले लॉन, विना वातानुकुलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह येथे समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्यात आल्या आहे.
अटी व शर्ती :
१. लग्न समारंभाच्या ठिकाणी सर्व नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील.
२. लग्न समारंभाच्या ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई आहे आणि त्याचे उल्लंघन केल्यास सदरील व्यक्ती दंडनीय कारवाईस पात्र राहील.
३. लग्न समारंभाच्या ठिकाणी जास्तीत जास्त ५० व्यक्ती उपस्थित राहतील व त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर (सोशल डिस्टेंसिंग) सहा फूट राखणे बंधनकारक राहील.
४. लग्न समारंभाच्या ठिकाणी गुटखा, पान, तंबाखू खाण्यास व मद्यपानास सक्त मनाई राहील.
५. लग्न समारंभाची जागा, वारंवार हाताळले जाणारे भाग निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
६. लग्न समारंभाच्या आत व बाहेर जाण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हात धुणे,सॅनिटायझरचा वापर या करिता संंबंधित विनावातानुकूलित मंगल कार्यालय /हॉल/खुले लॉन/सभागृह व्यवस्थापक/मालक यांच्यामार्फत व्यवस्था करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत वातानुकूलित सेवेचा (एसी) वापर करण्यात येऊ नये.
७. लग्न समारंभाच्या ठिकाणी बसण्याच्या जागा सामाजिक अंतर राहील अशा पद्धतीने खुणा (मार्किंग) करुन निश्चित करण्यात याव्यात.
८. लग्न समारंभाच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापक / मालक यांच्या मार्फत करण्यात यावी.
९. लग्न समारंभाच्या ठिकाणी नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले तर सदर भागातील खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह तात्काळ बंद करण्यात येतील.
या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटनाविरूद्ध भारतीय साथ अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ1860) कलम 188 आणि या संदर्भातील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.