शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (19:09 IST)

पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांच्या चौकशीची भाजपची मागणी, राष्ट्रवादीचे नेते म्हणतात...

sharad panwar
मुंबईतील कतिथ पत्राचाळ घोटाळा प्रकरणी भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या चौकशीची मागणी केलीये. आमदार अुतल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कालबद्ध मर्यादेत चौकशीची मागणी केलीय.
 
याबाबत बोलताना अतुल भातखळकर म्हणाले, "पत्राचाळ प्रकरणात ईडीने शरद पवारांच्या सहभागाचे पुरावे चार्जशीटमध्ये दाखल केले आहेत. त्यामुळे चौकशी गरजेची आहे."
 
तर, भातखळकर यांचे आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने फेटाळून लावलेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण म्हणाल्या, "देवेंद्र फडणवीस हे अतुल भातखळकर यांचे बालहट्ट नक्कीच पुरवतील. पण, अनेक नेते विकासक आणि स्थानिकांना बोलावून चर्चा करतात. त्यामागे लोकांचं पुनर्वसन हेच उद्दीष्ट असतं."
 
पत्राचाळ प्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत सद्यस्थितीत आर्थररोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने सोमवारी संजय राऊत यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केली.
 
यात 2006 मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्र्यांनी पत्राचाळ प्रकरणी बैठक घेतल्याचं लिहिण्यात आलंय. 2006 मध्ये देशात काँग्रेसप्रणीत यूपीएचं सरकार होतं आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री होते. त्यामुळेच भाजपने शरद पवारांच्या चौकशीची मागणी केलीये.
 
ईडीने चार्जशीटमध्ये काय म्हटलंय?
पत्राचाळ प्रकरणाची संजय राऊत यांच्याविरोधात दाखल आरोपपत्रात ईडीने थेट शरद पवारांचं थेट नाव घेतलेलं नाही. पण, एका ठिकाणी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री असा उल्लेख केलाय. साल 2006 मध्ये केंद्रात यूपीएचं सरकार होतं आणि शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री होते.
 
ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलंय, "म्हाडाच्या निवासी अभियंत्याने पत्राचाळ प्रकरणी कागदपत्र सुपूर्द केले. त्यांची छाननी केल्यानंतर असं दिसून आलं की 12 ऑगस्ट 2006 रोजी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्र्यांनी याबाबत चर्चा करण्याची इच्छा दर्शवली होती. त्यानुसार या चर्चेमध्ये गृहनिर्माण विभागाच्या सचिवांनी भाग घेतला होता."
 
"याच बैठकीत पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत आणि विकासक ठक्करही उपस्थित होते," असं ईडीने आपल्या आरोपपत्रात पुढे म्हटलंय.
 
या बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली याबाबत पुढे ईडीने माहिती दिली आहे. त्यानंतर केंद्रीय कृषीमंत्र्यांचा उल्लेख करताना दावा केलाय की, "केंद्रीय कृषीमंत्र्यांनी शासन आदेशात बदल करण्याचा अधिकार हा सरकारचा असतो सचिवांचा नाही असं म्हटलं. त्यानंतर कोर्टाच्या आदेशांची प्रत सचिवांकडून मागून घेतली."
 
'पवारांची चौकशी करा'
ईडीने चार्जशीटमध्ये केंद्रीय कृषीमंत्री म्हटलं असंल तरी शरद पवारांचं थेट नाव घेतलेलं नाही. पण, 2006 मध्ये शरद पवार यूपीए सरकारमध्ये केंद्रीय कृषीमंत्री असल्याने भाजपने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पवारांच्या चौकशीची मागणी केलीये.
 
भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले, "पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांचा सहभाग होता हे ईडीने पुराव्यानिशी चार्जशीटमध्ये दाखवून दिलं आहे. पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यात संजय राऊतही होते. त्यानंतर गुरूआशिष कंपनीला काम मिळालं."
 
ते पुढे म्हणाले, या प्रकरणी पवारांचा हात आहे का नाही याची चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीये.
 
याबाबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, "देवेंद्र फडणवीस अतुल भातखळकरांचे बालहट्ट नक्कीच पुरवतील. याआधी आरोप करण्यात किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज होते. आता भातखळकर आहेत."
 
त्या पुढे म्हणाल्या, "स्थानिक रहिवाशांनी निवडलेल्या विकासकासोबत अनेक नेते चर्चा करत असतात. त्यामागे लोकांचं पुनर्वसन हेच उद्दीष्ट असतं."
 
तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते महेश तपासे म्हणाले, पत्राचाळ प्रकरणी ईडीने शरद पवारांचं नाव घेतलेलं नाही. पण भाजपने पवाराच्या चौकशीची मागणी केलीये. कारण नसताना भाजप मोठ्या नेत्यांची बदनामी करत आहे.