1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 29 जून 2022 (09:12 IST)

मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं- राज्यपालांकडे देवेंद्र फडणवीसांची मागणी

devendra fadnavis
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांनी  राज्यपालांची भेट घेतली.
भेट संपल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, "आम्ही राज्यपालांना आज ईमेल द्वारे एक पत्र दिलं आहे. शिवसेनेचे 39 आमदार बाहेर आहेत आणि ते काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर राहू इच्छित नाही. याचाच अर्थ ते सरकारमध्ये राहू इच्छित नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्याजवळ बहुमत शिल्लक राहिलेलं नाही तेव्हा त्यांनी तातडीने सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावं असं पत्र आम्ही त्यांना दिलं."
 
"बहुमत सिद्ध करण्यासाठी सरकारला सांगावं अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. या पत्रात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयांचा उल्लेख केला आहे. त्यावर राज्यपाल योग्य निर्णय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे," असं देवेंद्र यांनी म्हटलं.
 
देवेंद्र फडणवीस आज दिवसभर दिल्लीत होते. त्यांनी पक्षश्रेष्ठींशी खलबतं केली आणि ते मुंबईला परतले. त्यानंतर ते इतर नेत्यांबरोबर राजभवनात पोहोचले.
 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली होती. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
 
एकनाथ शिंदेंनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर भाजपा नेते वेट अँड वॉच मोडवर असल्याचं सातत्याने सांगत होते. त्यामुळे ही भेट महत्त्वाची आहे.
 
या भेटीपूर्वी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, "या राजकीय नाट्यात काहीतरी कृतिशील भूमिका घेतली पाहिजे यातून त्यांनी हे पाऊल उचललं असावं. तसंच या राजकीय घडामोडीत विरोधी पक्षाची काय भूमिका आहे हा प्रश्न उपस्थित झाला असता. त्यामुळे भाजप नेते भेटायला गेले असावेत."
 
दरम्यान, देवेंद्र यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे गटाचीही बैठक झाली.