1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 मे 2019 (18:10 IST)

गडचिरोलीतील शहीद जवानांच्या वारसांना 25 लाख रु. मदत, एकाला नोकरी तर निवृत्तीच्या कालावधीपर्यंत पगार

गडचिरोली येथे कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा परिसरात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला होता. या भीषण स्फोटात C-60 दलाचे 15 जवान शहीद झाले. सर्व शहिदांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित होते. 
 
त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. सोबतच त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबाला भेट दिली असून त्यांचं सांत्वनही केले आहे. यावेळी ते म्हणाले की, गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्याच्या चौकशीचे आदेश आम्ही दिले आहेत.   हल्ल्याचा प्रत्युत्तरही नक्षलवाद्यांना योग्य प्रकारे दिलं जाणार आहे. 
 
सरकार शहीद जवानांच्या परिवाराच्या पाठीशी कायम आहे. असे त्यांनी सांगितले.  शहीद जवानांच्या वारसांना 25 लाखांची मदत केली जाणार आहे. राज्य सरकार याबाबतची घोषणा करणार असून, शहीद जवानांच्या कुटुंबातील एकाला नोकरी व निवृत्तीच्या कालावधीपर्यंत पगार देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली असून हा हल्ला ज्यांनी केला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.