शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (13:49 IST)

कुपोषणामुळे महिनाभरात 118 चिमुकल्यांचा बळी

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात तब्बल 118 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. नंदुरबारमधील कुपोषणाचा मृत्यूदर राज्याच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा दुप्पट असल्याने चिंतेचा विषय ठरत आहे.
 
महाराष्ट्रात सर्वाधिक कुपोषित बालकं नंदुरबार जिल्ह्यात आढळतात. अशात शासनाच्या विविध योजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 
सप्टेंबर महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातील 12 बालविकास प्रकल्पांतर्गत एकूण 2 हजार 992 बालकांचा जन्म झाला तर 0 ते 6 वर्षे वयोगटातील तब्बल 118 बालकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. एका महिन्यात 118 बालकं कुपोषणामुळे मृत झाल्याने प्रशासनाच्या विविध योजनांवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होत आहे. 
 
त्यातून विशेष म्हणजे राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या अक्कलकुवा येथील भगदरी गावात मागील चार महिन्यांपासून अंगणवाडी सेविका कामावर आली नाही तसेच येथून पोषण आहार देखील वितरीत झाला नसल्याची तक्रार गावकऱ्यांकडून करण्यता येत आहे.
 
मृत पावलेल्या 118 बालकांमध्ये 0 ते 28 दिवसांचे 37, 1 महिना ते 1 वर्ष वयोगटातील 38, 1 वर्ष ते 5 वर्षे वयोगटातील 20 आणि उपजत 23 बालकांचा समावेश आहे. दरम्यानच्या काळात नंदुरबारमध्ये सहा मातांचा देखील मृत्यू झाला आहे. 
 
राज्यात 0 ते सहा वयोगटातील दर हजार बालकांमध्ये 21 बालकांचा मृत्यू कुपोषणामुळे होतो. या आकडेवारीच्या तुलनेच नंदुरबार जिल्ह्यातील सरासरी मृत्यूदर दुप्पट झाल्याचे समजते.
 
मृत झालेल्या बालकांमध्ये नवापूर बालविकास प्रकल्पाअंतर्गत सर्वाधिक 22 बालकांचा मृत्यू झाला. तोरळमळ आणि अक्ककुवा बालविकास प्रकल्पात अनुक्रमे 16 आणि 15 बालकांचा मृत्यू झाला.