1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (09:49 IST)

म्हणून राष्ट्रवादीने भर पावसात केले आंदोलन

कर्नाटक सीमा ही काय भारत पाकिस्तानची सीमा आहे काय? असा खडा सवाल करीतकर्नाटक राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर सक्ती विरोधात कागल शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने भर पावसात आंदोलन करीत राष्ट्रीय महामार्ग तासभर रोखला.
 
महाराष्ट्र राज्यातून कर्नाटकात प्रवेशासाठी आरटीपीसीआर सक्ती केली जात आहे. या विरोधात कोगनोळी टोल नाक्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग  तासभर रोखून धरला. तणावग्रस्त वातावरणामुळे कर्नाटकचे पोलीस महासंचालक, बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी व पोलिसांचा प्रचंड फौजफाटा कोगनोळी नाक्यावर दाखल झाला होता.
 
यावेळी भैय्या माने यांनी, ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमा ही काय भारत-पाकिस्तान सीमा आहे काय? महामार्ग रोखण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा जाब विचारला. ही सक्ती माघार घेतली नाही तर महाराष्ट्रातही कर्नाटकची वाहने येऊ देणार नाही, इशाराही दिला. कोल्हापूरकडून महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यातील पलिकडील भागातील कागल तालुक्यासह आजरा, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यांमध्ये जाणाऱ्या तसेच गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचीही कुचंबना होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावर कर्नाटक प्रशासनाचे अधिकारी निरुत्तर झाले.