शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (16:26 IST)

सिनेमांचे शूटिंग झालेला ‘तो’ बगिचा समस्यांच्या विळख्यात

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या भितींच्या पायथ्याशी असणा-या बगिच्याची अत्यंत दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. समस्यांच्या विळख्यात सापडलेला या बगिच्याकडे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे .
अकोले तालुक्यातील पश्चिमेला तालुक्यापासुन ४९ कि मी .वर १९१६ साली ब्रिटीशांनी भंडारदरा धरणाची निर्मिती केली .त्याच वेळी भंडारदरा धरणाच्या बगिच्याची निर्मिती देखील झाली .

राजकपुरसारखा प्रसिद्ध सिनेकलाकारही या बगिच्याच्या प्रेमात पडल्याने ब-याच चित्रपटांचे चित्रीकरणही या बगिच्यात केले गेले . परंतु याच बगिच्याचे आता विद्रुपीकरण झाले असुन याला केवळ भंडारदरा धरणाचे जलसंपंदा विभागाचे उदासिन धोरण कारणीभुत ठरले आहे .

बगिच्यामध्ये पर्यटकांना बसण्यासाठी बनविलेले कठडे ठिकठिकाणी तुटले आहेत तर काही जमिनदोस्त झाले आहेत . बगिच्यात रोज होणारी स्वच्छता थांबल्याने जागोजागी कच-यांचा खच तयार झाला आहे .तर घाणीचे साम्राज्य पसरल्याने सर्वत्र दुर्ग॔धी सुटली आहे .काही वर्षापूर्वी या बगिच्यात एक तलाव बांधण्यात आला होता .हा तलाव कायम कोरडाठाक असतो .तलावात तलावापेक्षा जास्त उंचीचे गवत वाढले आहे .

भंडारदरा धरणाच्या या बगिच्याचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बगिचामध्ये असणारा नयनरम्य ” अंब्रेला धबधबा ” हा धबधबा दुरुस्तीच्या नावाखाली जलसंपदा विभागाच्या भंडारदरा धरण शाखेने कायम बंद ठेवणेच पसंत केले. भंडारदरा धरणाच्या बगिच्याला भले मोठे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे .मात्र हे प्रवेशद्वार कायम कुलुपबंद अवस्थेत असल्याने पर्यटकांना आडबाजुने कसातरी प्रवेश करुन बगिच्यामध्ये जाण्याची वेळ आली आहे .या बगिच्याची ओळख पुसु नये यासाठी काळजी घ्यावी व पुन्हा पुर्वीचे वैभव करुन द्यावे ही इच्छा स्थानिक नागरीक जलसंपदा विभागाकडे व्यक्त करत आहेत.