1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (20:46 IST)

वेदांता उद्योग समुहाचा तब्बल १.५४ लाख कोटी रुपयांचा सेमीकंडक्टरचा उद्योग महाराष्ट्रातून गुजरातमध्ये पळवला

Aditya Thackeray
महाराष्ट्रातील उद्योग जगतासाठी अत्यंत धक्कादायक वृत्त आहे. वेदांता उद्योग समुहाचा तब्बल १.५४ लाख कोटी रुपयांचा सेमीकंडक्टरचा उद्योग गुजरातमध्ये पळवून नेण्यात आला आहे. जून महिन्यापर्यंत तळेगावमध्ये गुंतवणुकीस इच्छूक असलेला हा उद्योग अचानक गुजरातला का गेला, असा घाणाघाती सवाल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांनी आज माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. वेदांता-फॉक्सकॉनने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे आपल्याला धक्का बसला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. सेमीकंडक्टर बाबत आत्मनिर्भर होण्यासाठी भारतातील उद्योजकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील काही वर्षांपासून सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे भारतातील उद्योगांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. ऑटो आणि स्मार्टफोन निर्मिती उद्योगांना मोठा फटका बसला होता. सोमवारी वेदांता समूहाने फॉक्सकॉन कंपनीसोबत २० अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. अहमदाबादजवळ हा सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात येणार आहे.
 
वेदांता लिमिटेड आणि तैवानची Foxconn पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये अर्धसंवाहक आणि प्रदर्शन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी स्वाक्षरी केलेल्या करारांतर्गत १९.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करतील. संयुक्त उपक्रमाने पश्चिम राज्यातील सर्वात मोठे शहर अहमदाबादजवळ युनिट्स उभारण्यासाठी गुजरातमधून भांडवली खर्च आणि वीज यासह सबसिडी मिळविली. शोपीस गुंतवणूक, जी गुजरातने भारतीय राज्यातील कोणत्याही गटाद्वारे आतापर्यंतची सर्वात मोठी असल्याचे म्हटले आहे.
 
या कंपन्यांनी सांगितले की, वेदांत-फॉक्सकॉन संयुक्त प्रकल्पामुळे गुजरातमध्ये १ लाखाहून अधिक रोजगार निर्माण होतील. जगातील बहुतेक चिप्सचे उत्पादन तैवानसारख्या काही देशांपुरते मर्यादित आहे आणि उशीरा प्रवेश करणारा भारत आता कंपन्यांना “इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात नवीन युग सुरू करण्यासाठी” सक्रियपणे प्रलोभन देत आहे कारण ते चिप्सवर अखंड प्रवेश मिळवण्याचे मार्ग शोधत आहेत.
 
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी वेदांता समूहाच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले असल्याचे म्हटले. वेदांता समूहाचे अनिल अग्रवाल यांच्या ट्वीटचे स्क्रिनशॉट शेअर करत ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, भारतात सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प सुरू होतोय याचा आनंद आहे. मात्र, महाराष्ट्रातून हा प्रकल्प बाहेर गेल्याने धक्का बसला आहे. कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह मी बैठका घेतल्या होत्या. महाराष्ट्रात हा प्रकल्प सुरू करण्याबाबत सर्वकाही अंतिम करण्यात आले होते. हा प्रकल्प राज्यात आला असता तर नवीन सरकारला याचे श्रेय घेता आले नसते. या नव्या सरकारकडे आपल्या राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्याची वचनबद्धता दिसत नसल्याची टीका आदित्य यांनी केली.