शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Modified: शनिवार, 9 जुलै 2022 (11:51 IST)

विठ्ठलाच्या परम भक्त सखुबाई

sant sakhubai
सखुबाई या विठ्ठलाच्या निस्सीम भक्त होत्या. त्यांची महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध भक्तांमध्ये गणना होते. सखुबाई स्वभावाने जितक्या विनम्र होत्या त्याच्या विपरीत त्यांची  सासू आणि नवरा स्वभावाने तितकेच दुष्ट होते. या सर्व परिस्थितीला देवाची देणगी मानून सखुबाई आपले काम करत होत्या.

महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या काठावर कऱ्हाड नावाचे ठिकाण आहे. तिथे एक ब्राह्मण राहत होता. त्यांच्या घरात स्वतः ब्राह्मण, त्यांची पत्नी आणि मुलगा आणि सून असे चार माणसं राहत होते. ब्राह्मणाच्या सुनेचे नाव सखुबाई होते. त्यांचा सगळा वेळ त्या देवाचे नामस्मरण, ध्यान, उपासना, भजन इत्यादी करण्यात जात असे.

सासूचा छळ
सखुबाई जेवढ्या परमेश्वराच्या भक्त होत्या, मृदू, नम्र आणि साध्या मनाच्या होत्या, त्यांचे सासू-सासरे आणि पती हे तिघेही तितकेच दुष्ट, उद्धट, कुटिल आणि कठोर मनाचे होते. सखूला त्रास देण्याची एकही संधी ते सोडत नव्हते. पहाटेपासून ते रात्री झोपेपर्यंत विश्रांती न घेता यंत्रासारखे काम करूनही सासूबाई सखुबाईंना पोटभर खायलाही देत नव्हत्या. पण हीच देवाची दया मानून सखुबाई प्रकृती अस्वस्थ असतानाही त्या आपल्या कर्तव्याप्रमाणे काम करत असे. पण दुष्ट सासूला एवढ्यात समाधान होत नसे मग ती त्यांच्यासोबत मारहाण करत त्यांच्या आई-वडिलांना शिव्या देत असे. पण सखू सासूसमोर काहीच बोलायच्या नाही, अपमानाचा घोट घेऊनच राहत असे. या वेदनादायक दु:खांना आपल्या कर्माचे भोग आणि भगवंताचा आशीर्वाद मानून आनंदात राहत असे.
 
पंढरपूरला जायची इच्छा
पंढरपूर हे महाराष्ट्रातील वैष्णवांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी आषाढ शुक्ल एकादशीला मोठी यात्रा भरते. कीर्तन करता करता पंढरीनाथ श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो स्त्री-पुरुष लांबून येतात. तेव्हाही काही प्रवासी करहर मार्गे पंढरपूरच्या जत्रेला जात होते. यावेळी सखू कृष्णा नदीवर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना निघताना पाहून त्यांच्या मनात श्री पंढरीनाथाचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. सासू-सासर्‍यांकडून परवानगी तर मिळू शकणार नाही, परंतू पंढरपूरला जाण्याची इच्छा इतकी तीव्र होत की त्यांनी या मंडळीसोबत का जाऊ नये, असा विचार केला. त्या वारकर्‍यांच्या समूहात सामील झाल्या. त्याच्या एका शेजाऱ्याने ही सर्व बातमी त्याच्या दुष्ट सासूला सांगितली. ते ऐकून ती विषारी नागिणसारखी फुसफुसत उठली आणि आपल्या मुलाचे कान भरुन सखूला ओढून आढण्यास पाठवले. त्याने नदीकाठ गाठून सखूला मारहाण करून घरी आणले. आता तिघांच्या सल्ल्यानुसार पंढरपूरची यात्रा होईपर्यंत सखूला बांधून ठेवायचे आणि दोन आठवडे काहीही खाणेपिणे न देण्याचे ठरले. त्यांनी सखूला दोरीने इतके घट्ट बांधले की त्यांच्या शरीरात खड्डे पडले.
 
विठ्ठलाची प्रार्थना
बंधनात पडलेल्या सखूने कापत असलेल्या स्वरात भगवंताची प्रार्थना केली - "हे नाथ! मला एवढीच इच्छा होती की या डोळ्यांनी तुझे चरण एकदाही बघता आले असते तर मी आनंदाने प्राण सोडून दिले असते. माझ्याकडे जे काही आहे, ते तूच आहेस. मी चांगली- वाईट जसी कशी आहेस, फक्त तुझीच आहे. अशा प्रकारे सखू बराच वेळ प्रार्थना करत राहिल्या. भक्ताच्या अंतरात्म्याचा खरा हाक कधीच व्यर्थ जात नाही. ते कितीही संथ असले तरी ते त्रिभुवनाला छेदून भगवंताच्या कानाच्या छिद्रात प्रवेश करते आणि त्याच क्षणी त्याचे हृदय द्रवित करते.
 
विठ्ठलाचे स्त्री रूपात आगमन
सखूच्या हाकेने वैकुंठनाथाचे आसन हलले. ते लगेच सुंदर स्त्रीचे रूप धारण करून त्याच क्षणी सखूकडे गेले आणि म्हणाले - "बाई! मी पंढरपूरला जात आहे, तू जाणार नाहीस का?" सखू म्हणल्या- "बाई! मला जायचंय, पण मी इथे बांधलेली आहे; माझ्या सारख्या पापिणीच्या नशिबात पंढरपूरची यात्रा कुठे." हे ऐकून नारी रुपात देव म्हणाले- "बाई! मी तुझी सदैव सोबती आहे, तू दुःखी होऊ नकोस. तुझ्याऐवजी मी इथे बांधलेली उभी राहते." असे सांगून भगवंतांनी ताबडतोब त्यांच्या बेड्या सोडल्या आणि त्यांना पंढरपूरला पाठवले. आज सखूचा हा एकच बंध उघडला नव्हता, त्यांचे सगळे बंध कायमचे उघडले होते. त्या मोकळी झाल्या होत्या.
 
सखूच्या वेशात नाथ बांधलेले होते. सखूची सासू, सासरे वगैरे येतात आणि वाईटसाईट बोलून निघून जातात आणि देवही सूनप्रमाणे सर्व काही भोगत असतो. असे पंधरा दिवस निघून जातात. सासू-सासरे आणि नवरा विचार करतो की इतक्या दिवस काहीही न खाता-पिऊन जर ही मेली तर आपण खूप संकटात सापडू. म्हणून पश्चात्ताप करून ते भगवंताचे सर्व संबंध तोडून, ​​क्षमा मागून, मोठ्या प्रेमाने स्नान व भोजन वगैरे करण्यास सांगू लागतात. सद्गुणी पत्नीप्रमाणे परमेश्वरही मान खाली करून उभे राहतात. सखू परत येईपर्यंत ते तिथेच थांबतात. आंघोळ करून कुटुंबासाठी स्वयंपाक तयार करतात स्वतःच्या हाताने तिघांना जेवण देतात. आजच्या जेवणाला काही अनोखी चव होती. देवाने आपल्या सुंदर वर्तनाने आणि सेवेने सर्वांना त्यांच्यासाठी अनुकूल केले होते.
 
मृत्यू आणि पुन्हा जीवन
इकडे सखुबाई पंढरपूरला पोहोचल्या आणि देवाचे दर्शन घेऊन आनंद सिंधूमध्ये तल्लीन झाल्या. त्यांच्या जागी दुसरी कोणीतरी स्त्री बांधली आहे हे त्या विसरल्या. जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी पंढरपूरच्या हद्दीबाहेर जाणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली. प्रेमुग्धा सखू भगवान पांडुरंगाच्या ध्यानात मग्न झाल्या. त्यांनी समाधी घेतली. शेवटी सखूंचा जीव सुटला आणि त्यांचा देह पडला. नशिबाने कऱ्हाडजवळील किवळ नावाच्या गावातील एका ब्राह्मणाने त्यांना ओळखले आणि त्यांच्या साथीदारांना बोलावून त्यांचे अंतिम संस्कार केले. आता रुक्मिणीजींनी पाहिलं की त्या इथेच मरण पावल्या आहेत आणि माझा स्वामी त्यांच्या जागी सून होऊन बसले आहे. हे विचार करत त्यांनी स्मशानभूमीत जाऊन सखूंच्या अस्थी गोळा केल्या आणि त्यात प्राण ओतले. सखू नव्या शरीरात जिवंत झाल्या. त्यांना जिवंत केल्यावर देवी म्हणाल्या - "तू या देहातून पंढरपूरच्या बाहेर जाणार नाहीस असे तुझे वचन होते. आता तुझा मृतदेह जाळला गेला आहे. आता तू या नवीन देहातून प्रवाशांसह घरी परत जा." सखुबाई प्रवाशांसह दोन दिवसांत करहारला पोहोचल्या. सखूंचे आगमन झाल्याचे समजताच भगवंत सखूंच्या वेषात मडके घेऊन नदीच्या काठी आले दोन-चार गोड गोष्टी करत ते मडके त्यांना सोपवून अदृश्य झाले. सखू मडके घेऊन घरी आल्या आणि कामात व्यस्त झाल्या, पण त्यांच्या घरच्यांच्या स्वभावात झालेला बदल पाहून खूप आश्चर्यही वाटले.
 
काही दिवसांनी जेव्हा किवळ गावातील ब्राह्मण सखूंच्या मृत्यूची बातमी त्यांच्या घरी द्यायला आले आणि सखूला घरात काम करताना बघितले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी सखूंच्या सासऱ्यांना हाक मारली आणि त्यांना म्हणाले- "सखू पंढरपुरात वारली होती, ती भूत बनून तुमच्या घरी तर आली नाही?" सखूंचे सासरे आणि नवरा म्हणाले - "ती पंढरपूरला गेलीच नाही, तुम्ही असं कसं बोलत आहात." ब्राह्मणाच्या सांगण्यावरून सखूंना बोलावून सर्व गोष्टी विचारण्यात आल्या. त्यांनी भगवंताच्या सर्व लीला सांगितल्या. सखूंचे बोलणे ऐकून सासू आणि नवरा मोठ्या पश्चातापाने म्हणाले - "नक्कीच लक्ष्मीपती येथे बांधलेल्या स्त्रीच्या रूपात होत्या, त्यांनी यातना सहन केल्या." तिघांचीही अंत:करणे पूर्ण निर्मळ झाली होती. आता ते भगवंताच्या स्तोत्रात मग्न झाले आणि सखूंचा मोठा उपकार मानू लागले. अशा रीतीने सासूबाई आणि पती यांना परमेश्वराच्या कृपेने अनुकूल बनवून सखुबाई आयुष्यभर त्यांची सेवा करत राहिल्या आणि त्यांचा सर्व काळ परमेश्वराचे स्मरण, ध्यान यात घालवला.