Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कार्तिक माहात्म्य - अध्याय १५

Updated: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:57 IST)
शंकरांनीं हसून आपल्या तीक्ष्ण बाणांनीं ते सर्व बाण तोडले व सात बाणांनीं त्याचे घोडे, ध्वज, छत्र, धनुष्य तोडिलीं ॥१४॥
ज्याचें धनुष्य तुटलें आहे व जो विरथ झाला आहे असा तो जलंधर हातांतील गदा उगारुन वेगानें शंकरावर धावला. इतक्यांत शंकरांनीं बाणांनीं त्याची गदा तोडून दोन तुकडे केले ॥१५॥
तरी तो मूठ वळवून बुक्कीनें मारण्याकरितां शंकराकडे आला. तेव्हां शंकरांनीं वाणौघानें त्याला एक कोस मागें हटविलें ॥१६॥
तेव्हां आपणापेक्षां शंकर अधिक बलवान् आहे, असें पाहून जलंधरानें शंकरास मोह पाडणारी अशी अद्भुत गंधर्वमाया उत्पन्न केली ॥१७॥
तेव्हा गंधर्व गाऊं लागले, अप्सरा नाचूं लागल्या, दुसरे ताल, वेणु, मृदंग इत्यादि वाद्यें वाजवूं लागले ॥१८॥
तेव्हां तो मोठा चमत्कार पाहून शंकर त्या नादानें मोहित झाले, हातांतील शस्त्रें गळलीं तरी तीं त्यांना समजलीं नाहींत ॥१९॥
शंकरांचे चित्त असें एकाग्र झालें आहे असें पाहून, जलंधर कामातुर होऊन जेथें पार्वती बसली होती तेथें त्वरेनें गेला ॥२०॥
बलवान् शुंभ व निशुंभ यांना युद्धाचे जागीं ठेवून आपण, दहा हात, पांच मुखें, तीन नेत्र, जटा असें शंकराचें रुप धारण करुन मोठ्या वृषभावर बसून गेला, तेव्हां हा शंकरच आला असें पार्वतीला वाटलें ॥२१॥२२॥
व सख्यांमधून उठून त्याच्या समोर पुढें आली. ती सुंदर पार्वती दृग्गोचर होत आहे ॥२३॥
इतक्यांतच त्याचें वीर्य गळून पडलें व अंग जड स्तब्ध झालें; तेव्हां हा दैत्य आहे हें पार्वतीला समजलें व ती भ्याली ॥२४॥
ती त्वरेनें उत्तर मानस सरोवरांत जाऊन दडली; क्षणांत विजेप्रमाणें ती दिसेनाशी झाली, तेव्हां तो दैत्य जेथें शंकर होते तेथें युद्धास आला. इकडे पार्वतीनें भीतीनें मनांत विष्णूचें स्मरण केलें ॥२५॥२६॥
स्मरण करते इतक्यांत विष्णु जवळ बसले आहेत असें तिनें पाहिलें. पार्वती म्हणतेः-- हे विष्णो ! दुष्ट जलंधरानें अद्भुत चमत्कार केला. त्या दुष्टाचें चरित्र आपण जाणत आहां विष्णु म्हणतातः-- पार्वती, त्यानें जो मार्ग दाखवून दिला त्याचेंच मी आचरण करणार आहें ॥२७॥२८॥
तो स्त्रीचे पाविव्रत्यानें सुरक्षित आहे तोंपर्यंत कशानेंही मरणार नाहीं नारद म्हणतातः-- विष्णु याप्रमाणें बोलून जलंधराच्या नगरास गेले ॥२९॥
नंतर शंकर गंधर्वाच्या नादांत समरांगणांत होते ती गंधर्वमाया नाहींशी होतांच ते सावध झाले ॥३०॥
शंकराच्या मनाला मोठा चमत्कार वाटला व रागानें पुन्हां जलंधराशीं युद्धास निघाले. दैत्यानें पुनः शंकर आलेले पाहून त्यांच्यावर बाणांचा वर्षाव केला ॥३१॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये पंचदशोऽध्यायः ॥१५॥

सर्व पहा

शुक्रवारी करा वैभवलक्ष्मीचे हे सोपे उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी

Mahalaxmi Pujan on Friday महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी करा हे 4 उपाय

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

Sai Baba Puja Mantra गुरुवारी करा साईबाबांची पूजा, उपवासाचे नियम मंत्र जाणून घ्या

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments