रूप तेरा ऐसा दर्पण मे ना समाय
सौ. भाग्यश्री कुलकर्णी, इंदूर
सौंदर्य हा स्त्रीचा (आणि पुरूषांच्याही) अगदी जिव्हाळ्याचा विषय. या विषयात रस नसणारी स्त्री विरळाच. स्त्रीत्व खऱ्या अर्थाने जाणवते ते नटणं, मुऱडण यातूनच. त्यामुळेच पूर्वीपासनुच स्त्रिया आपली वेशभूषा, रंगभूषा, अलंकार या बाबतीत जागरूक आहेत. स्त्रियांना आभूषित करणारी सौंदर्य साधनांचे प्रकारही अनेक आहेत. अन्न, वस्त्र, निवारा ही माणसाची मुलभूत गरज भागल्यानंतर आदिम काळातही उपलब्ध दात, हाडे इत्यांदीपासून विविध आभुषणे तयार केली जात होती, याचे पुरावे उत्खननातुन सापडले आहेत. एका विशिष्ट जमातीपुरतीच ही अलंकारप्रियता, श्रृंगारप्रियता मर्यादीत नसुन सर्व समुहातील, जातीतील, प्रदेशातील स्त्रिया तसेच पुरुषही याबाबतीत जागरुक आढळतात.स्त्रीच्या सौंदर्यात भर टाकणारे सोळा श्रृंगार तर सर्वच प्रदेशातील स्त्रिया लग्नकार्यात, उत्सवात करताना दिसतात. काळानुरूप यात बदलही होताना दिसतो पण श्रृंगारप्रियता कमी होत नाहीये, उलट ती वाढतेच आहे.
पूर्वीपासुन कंकवाची चिरी, मळवट किंवा गोल या स्वरूपात कुंकू लावणार्या मराठी स्त्रियांना प्रसिद्ध चित्रकार राजा रविवमर्याने चंद्रकोर लावायला शिकवली आणि बालगंधर्वांच्या स्त्री पात्राची वेषभूषा, केशभूषा त्या काळात विशेष लोकप्रिय होत्या. बायका अगदी हुबेहुब त्यांची लकब आणायचा प्रयत्न करीत.निजामाचा राणीवसा तर हमामखान्यातून परतताना मेंदीच्या हलक्या मंद सुगंधाबरोबर तिचा लालसर रंगदेखील अंगावर, केसांवर मिरवत परतत असे. अशी स्त्री आसपास वावरताना तो मोहक सुगंध, मन वेडावल्याशिवाय राहणारच नाही. मेंदीला स्त्रीच्या श्रृंगारात फार महत्व आहे. मेंदी अल्पायुषी असली तरी प्रत्येक मंगलप्रसंगी, माहेरवाशिण सासरहून येताना, आणि माहेरून जाताना ही मेंदी लावते. असा प्रघात राजस्थानी महिलांमध्ये आढळतो.हात दोन्ही बाजुंनी मांडावे, पायाची नक्षी मागुन थोडीतरी मोकळी ठेवावी (माहेरची वाट म्हणून) पायाला थोडीतरी मेंदी लावावी मग ती तळपायाला का असेना! (आईच पोट शांत राहतं) अशा अनेक समजुती मेंदीबरोबर गुंफल्या गेल्या आहेत.
निसर्गात असणार्या विविध प्रकारच्या पत्री, फुले यांचाही आभूषण म्हणून वापर केला जातो. या पानाफुलांची उमेलाही (पार्वती) भुरळ पाडली अन् त्याच वापरून तिने शंकरांनाही प्राप्त करून घेतले म्हणूनच आजही हरतालिता, मंगळगौर या सारख्या मंगलमय सौभाग्यसणात पत्री, फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हे सणही ही फुले ज्या काळात मुबलक मिळतात, त्या श्रावणात येतात.या बाह्य सौंदर्य घटकांबरोबरच स्त्रियांचे मुलभुत प्रमाणबद्ध शरीर, तिचा नाजुकपणा हेही सौंदर्याचे लक्षण मानले जाते. आकाशातुन जाणार्या पुष्पक विमानातुन खाली पडलेल्या पारिजातकाच्या फुलाच्या माराने मृत्युमुखी पडलेली राणी, यौवनात पदार्पण केलेल्या सुंदरींच्या मद्याच्या चुळीने फुलणारा तो बकुळ आणि सुंदरीच्या लत्ताप्रहाराने बहरणारा तो अशोक या अन् अशा कितीतरी प्रकारच्या सौंदर्याच्या वर्णनांनी संस्कृत साहत्यि भरलेले अन् 'भारलेले' आहे.मस्तानीच्य 'आरसपानी' सौंदर्यावर मोहीत झालेला बाजीराव, त्याकाळातील सर्वश्रेष्ठ योद्धा, पण तिच्या सौंदर्यापुढे झुकला. तिच्या नितळ कांतीचे वर्णन करताना असे म्हणतांत की तिने पान खाल्ल्यावर गळ्यातून उतरणारा सरही तिच्या त्वचेवरून दिसत असे.
गजगामिनी म्हणून स्त्रीचे वर्णन करतानाच तिच्या सिंहकटीचेही तितकेच वर्णन होते. तिच्या केशसंभारापासून ते तिच्या पदकमलापर्यंत प्रत्येक अवयवांची विपूल वर्णने सर्व प्रकारच्या साहित्यात आहेत. ज्या कूटप्रश्नाचे उत्तर कालिदासाचा प्राण घेणारे ठरले त्या उत्तरातही स्त्रीचेच वर्णन होते. ''तुझ्या मुख्यरूपी अम्बुज म्हणजे शुभ्र कमळावरती तुझ्या डोळ्यांची दोन 'नील' कमले उगवलेली आहेत'' हीच ती त्या कोड्याची समस्यापूर्ती होती.विश्वामित्रासारख्या श्रेष्ठ ऋषीवर्याची तपस्या मेनका भंग करू शकली ते तिच्या सौंदर्यामुळेच! मोहिनीरूपानेच विष्णू भस्मासुराचा वध करू शकला.सीतेच्या रूपानेच रावणला मोहित केले, तर द्रौपदीच्या प्राप्तीच्या लालसेने महाभारत घडले. क्लिओपात्राच्या राजकारणनितीपेक्षाही ती तिच्या वैशिशष्ट्यपूर्ण राहणीमानाबद्दल गाजते अन् मोनालिसाही तिच्या गूढ सौंदर्याबद्दल लोकांचे चित्त वेधुन घेते. स्त्री आणि सौंदर्य हे एकमेकांपासून वेगळे नाहीच. किंवा ते वेगळे दाखवणेही अशक्य आहे. एखाद्या कृष्णवर्णीय बांधेसुद आदिवासी, भिल्ल स्त्रीचे सौंदर्यही डोळ्यात भरते. सौंदर्य रंगावर अवलंबून नाही. म्हणूनच जेव्हा निर्सगाची विविध रूपे आपण बघतो तेव्हाही हा सर्व साज अंगावर ल्यालेली 'ती' धरतीच आपणासमोर येते. पावसाळ्यात हिरव्या बुट्टेदार रंगाचा शालू घेतलेली ती उन्हाळ्यात करड्या कातळातही बघाविशी वाटतेच ना. हिवाळ्यात शुभ्र धुक्याची शाल पांघरलेल्या तिच्या कुशीत आपणही गुरफटून जावे वाटते.आणि म्हणूनच जिथे सौंदर्य आहे तिथे सृजनही आहे.