गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (10:46 IST)

ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव, ED च्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न: संजय राऊत यांचे राज्यसभा अध्यक्षांना पत्र

शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला, असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. त्याचवेळी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या माध्यमातून मला गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
 
मुलीच्या लग्नावरील खर्चाचीही चौकशी सुरू
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्तक्षेपाची आणि कारवाईची मागणी करत राऊत यांनी लिहिले की, "ठाकरे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात होता आणि नकार दिल्यावर ईडीच्या माध्यमातून मला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे." संजय राऊत म्हणाले की ईडीने तपास सुरू केला आहे. 17 वर्ष जुनी जमीन खरेदी प्रकरण आणि मुलीच्या लग्नात झालेल्या खर्चाचीही चौकशी केली जात असून विक्रेत्यांना धमकावले जात आहे.
 
सरकारविरोधात आवाज उठवल्याबद्दल गोवले जात
पत्रात संजय राऊत यांनी केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे. मी सरकारच्या विरोधात आवाज उठवत असल्यामुळे मला जबरदस्तीने गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
 
राज्यसभा खासदार म्हणाले, "सुमारे एक महिन्यापूर्वी काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि ठाकरे सरकार पाडण्यासाठी आम्हाला मदत करण्यास सांगितले. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका व्हाव्यात, अशा प्रयत्नात मी महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी त्यांची इच्छा होती. यानंतर मी नकार दिल्यास मला तुरुंगात पाठवण्याची धमकी देण्यात आली.