शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्री स्वामी समर्थ
Written By

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळहवा

श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय
॥ श्री गणेशाय नमः ॥ भक्तजन तारणार्थ । यतिरुपे श्रीदत्त । भूवरी प्रगट होत । अक्कलकोटी वास केला ॥१॥ जे जे झाले त्यांचे भक्त । त्यात श्रेष्ठ स्वामीसुत । ऐकता त्यांचे चरित्र । महादोष जातील ॥२॥ प्रसिद्ध मुंबई शहरांत । हरीभाऊ नामे विख्यात । आनंदे होते नांदत । निर्वाह करीत नोकरीने ॥३॥ कोकणप्रांती राजापूर । तालुक्यात इटिया गाव सुंदर । हरीभाऊ तेथील राहणार । जात मराठे तयांची ॥४॥ ते खोत त्या गावचे । होते संपन्न पूर्वीचे । त्याच गांवी तयांचे । माता-बंधू राहती ॥५॥ मुंबईत तयांचे मित्र । ब्राह्मण उपनाव पंडित । ते करिता व्यापार त्यात । तोटा आला तयांसी ॥६॥ एके समया पंडितांनी । स्वामीकिर्ती ऐकिली कानी । तेव्हा भाव धरोनी मनी । नवस केला स्वामीते ॥७॥ जरी आठ दिवसांत । मी होईन कर्जमुक्त । तरी दर्शना त्वरीत । अक्कलकोटी येईन ॥८॥ यासी सात दिवस झाले । काही अनुभवा न आले । तो नवल एक वर्तले । ऐका चित्त देउनि ॥९॥ हरीभाऊ आणि त्यांचे मित्र । अफूचा व्यापार करीता त्यात । आपणा नुकसान सत्य । येईल ऐसे वाटले ॥१०॥ त्यांनी काढिली एक युक्ती । बोलावुनी पंडिताप्रती । सर्व वर्तमान त्या सांगती । म्हणती काय करावे ॥११॥ हे नुकसान भरावयासी । द्रव्य नाही आम्हांपासी । फिर्याद होता अब्रुसी । बट्टा लागेल आमुच्या ॥१२॥ तेव्हा पंडित बोलले । मलाही कर्ज काही झाले । निघाले माझे दिवाळे । यात संशय असेना ॥१३॥ तुम्ही व्हावया कर्जमुक्त । यासी करावी युक्ती एक । तुमचा होउनी मी मालक । लिहून देतो पेढीवरी ॥१४॥ उभयतांसी ते मानले । तत्काळ तयापरी केले । तो नवल एक वर्तले । ऐका सादर होवोनी ॥१५॥ अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला । हे सांगावया पंडिताला । मारवाडी आला आनंदे ॥१६॥ पंडिते ऐकोन वर्तमान । आनंद झाला त्यालागोन । हरीभाऊते भेटोन । वृत्त निवेदन केले ॥१७॥ अक्कलकोटी स्वामी समर्थ । सांप्रतकाळी वास करीत । त्यांचीच कृपा ही सत्य । कर्जमुक्त झालो आम्ही ॥१८॥ नवस केला तयांसी । जाऊ आता दर्शनासी । वार्ता ऐकुनी उभयतांसी । चमत्कार वाटला ॥१९॥ ज्यांनी आपुले मनोरथ । पूर्ण केले असती सत्य । ऐसे जे का समर्थ । अक्कलकोटी नांदती ॥२०॥ तरी अक्कलकोटाप्रती । येतो तुमच्या सांगाती । आम्ही पाहूनिया स्वामीमूर्ती । जन्म सार्थक करु की ॥२१॥ गजानन हरीभाऊ पंडित । त्रिवर्ग अक्कलकोटी जात । समर्थांचे दर्शन घेत । पूजन करीत भक्तीने ॥२२॥ पाहूनी समर्थांची मूर्ती । तल्लीन हरीभाऊंची वृत्ती । मुख पाहता नयनपाहती । न लवती तयांची ॥२३॥ तेव्हा समर्थ तयांसी । शिव, राम, मारुती ऐसी । नामे दिधली त्रिवर्गासी । आणि मंत्र दिधले ॥२४॥ पंडिता राम म्हटले । गजानना शिवनाम दिधले । मारुती हरीभाऊस म्हटले । तिघे केले एकरुप ॥२५॥ मग समर्थे त्या वेळे । त्रिवर्गा जवळ बोलाविले । तिघांशी तीन श्लोक दिधले । मंत्र म्हणोनी ते ऐका ॥२६॥ गुरुर्ब्रह्माः गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥१॥ ऐसा मंत्र हरीभाऊते दिधला असे समर्थे । तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची ॥२७॥ दुसरा मंत्र गजाननाला । तया वेळी श्रींनी दिधला । तेव्हा तयाच्या मनाला । आनंद झाला बहुसाळ ॥२८॥ आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम् । सर्व-देव-नमस्कारं केशवं प्रति गच्छति ॥२॥ संतोषले त्याचे मन । मग पंडिता जवळ घेवोन । एक मंत्र उपदेशोन । केले पावन तयाते ॥२९॥ इदमेव शिवम् इदमेव शिवम् । इदमेव शिवम् इदमेव शिवः ॥३॥ तीनशे रुपये तयांनी । आणिले होते मुंबईहूनी । त्यांचे करावे म्हणोनी । विचारिले समर्थांते ॥३०॥ ऐसा प्रश्न ऐकोनी । समर्थ बोलले त्या लागोनी । त्यांच्या पादुका बनवोनी । येथे आणाव्या सत्वर ॥३१॥ स्वामीसन्निध काही दिन । त्रिवर्ग राहिले आनंदाने । हरीभाऊंचे स्वामीचरणा दृढ जडले ॥३२॥ काही दिवस गेल्यावरी । त्रिवर्ग एके अवसरी । उभे राहून जोडल्या करी । आज्ञा मागती जावया ॥३३॥ आज्ञा मिळता तयांसी । आनंदे आले मुंबईसी । हरीभाऊंच्या मानसी । ध्यास लागला स्वामींचा ॥३४॥ व्यवहारी वर्तता । स्वस्थता नसेची चित्ता । गोड न लागती संसारवार्ता । चैन नसे क्षणभरी ॥३५॥ असो पुढे त्रिवर्गांनी । चांदीच्या पादुका करवोनी । अर्पावया स्वामींचरणी । आले अक्कलकोटाते ॥३६॥ भक्तजनांचा कैवारी । पाहोनिया डोळेभरी । माथा ठेविला चरणांवरी । बहुत अंतरी सुखावले ॥३७॥ चांदीच्या पादुका आणिल्या । त्या श्रींचरणी अर्पण केल्या । समर्थे आदरे घेतल्या । पायी घातल्या त्याच वेळी ॥३८॥ त्या आत्मलिंग पादुका । चौदा दिवसपर्यंत देखा । पायी वागवी भक्तसखा । दिधल्या नाही कोणाते ॥३९॥ हरीभाऊ एके दिनी । समर्थांसन्निध येवोनी । दर्शन घेवोन श्रीचरणी । मस्तक त्यांनी ठेविले ॥४०॥ तो समर्थे त्यांप्रती । घेवोनिया मांडीवरती । वरदहस्त सत्वरगती । मस्तकी त्यांचे ठेविला ॥४१॥ म्हणती तू माझा सूत । झालासी आता निश्चित । परिधान करी भगवे वस्त्र । संसार देई सोडोनी ॥४२॥ मग छाटी कफनी झोळी । समर्थे तयांसी दिधली । ती घेवोनी तया वेळी । परिधान केली सत्वर ॥४३॥ आत्मलिंग पादुका सत्वरी । देती हरीभाऊंचे करी । म्हणती जाऊनी सागरतीरी । किल्ला बांधोनी राहावे ॥४४॥ धरु नको आता लाज । उभार माझा यशध्वज । नको करु अन्य काज । जन भजना लावावे ॥४५॥ जाऊनी आता सत्वर । लुटवी आपुला संसार । लोभ मोह अणूमात्र । चित्ती तुवा न धरावा ॥४६॥ आज्ञा ऐकोनिया ऐसी । आनंद झाला मानसी । सत्वर आले मुंबईसी । साधूवेष घेवोनी ॥४७॥ सद़्गुरुने मस्की हस्त । ठेविता झाले ज्ञानवंत । धन्य धन्य ते स्वामीसुत । धन्य स्वामी दयाळ ॥४८॥ सद़्गुरुचा उपदेश होता । तात्काळ गेली भवव्यथा । उपरीत झाली चित्ता । षड्विकार निमाले ॥४९॥ बहुत गुरु जगी असती । नाना मंत्र उपदेशिती । द्रव्यप्राप्तीसव निश्चिती । ढोंघ माजविती बहुत ॥५०॥ तयांचा उपदेश न फळे । आत्मरुपी मन न वळे । सत्यज्ञान काही न कळे । मन न चळे प्रपंची ॥५१॥ तयांसी न म्हणावे गुरु । ते केवळ पोटभरु । भवसागर पैलतीरु । उतरतील ते कैसे ॥५२॥ तैसे नव्हेची समर्थ । जे परमेश्वर साक्षात । मस्तकी ठेविता वरदहस्त । दिव्यज्ञान शिष्यांते ॥५३॥ असो हरीभाऊंनी काय केले । ब्राह्मणांसी बोलाविले । संकल्प करोनि ठेविले । तुळसीपत्र घरावरी ॥५४॥ हरीभाऊ घर लुटविता । तारा नामे त्यांची कांता । ती करी बहुत आकांता । घेत ऊर बडवोनी ॥५५॥ म्हणे जोडोनिया कर । लुटविता तुम्ही संसार । हा नव्हे बरवा विचार । दुःख लागेल भोगावे ॥५६॥ आजवर अब्रुने । दिवस काढिले आपण । परी आता अवलक्षण । आपणा काय आठवले ॥५७॥ हासतील सकल जन । धिक्कारतील पिशून । उपास पडता कोण । खावयाते घालील ॥५८॥ अल्पवयी आपणासी । बुद्धी सुचली ही कैसी । त्यागोनिया संसारसुखासी दुःखडोही का पडता ॥५९॥ संसारसुख भोगोन । पुढे येता वृद्धपण । मग करावे मोक्षसाधन । सेवावे वन तपार्थ ॥६०॥ आपल्या वडिलांची थोरवी । मनामाजी आणावी । त्यांची किर्ती मळवावी । उचित नसे आपणा ॥६१॥ तुम्ही संसार सोडोनी । जाऊनी बसाल जरी वनी । तरी मग सांगा कोणी । मजलागी पोसावे ॥६२॥ माझे करिता पाणिग्रहण । अग्नि ब्राह्मण साक्ष ठेवोन । आपण वाहिली असे आण । स्मरण करावे मानसी ॥६३॥ तुम्ही म्हणाल मजसवे । तुहि घरदार सोडावे । मजसमागमे फिरावे । भिक्षा मागत घरोघरी ॥६४॥ तरी संसारसुखासक्त । मी असे जी सत्य सत्य । संसारी मन विरक्त । माझे न होय कदाही ॥६५॥ आता जरी आपण । संसार टाकिला लुटोन । हे केले महत्पुण्य । ऐसे कोण म्हणेल ॥६६॥ कुटुंबा उपवासी मारावे । सर्वस्व धर्म करावे । यासी काय पुण्य कार्य म्हणावे । पाप उलटे होतसे ॥६७॥ विनविते जोडोनी कर । अद्यापि स्वस्थ करा अंतर । आपला हा विचार । सोडोनी द्यावा प्राणप्रिया ॥६८॥ ऐशी तियेची उत्तरे । ऐकोनिया स्वामीकुमरे । समाधान बहुत प्रकारे । करीतसे तियेचे ॥६९॥ परी तारेच्या चित्तात । षडरिपू होते जागत । संसाराचे मिथ्यत्व । तियेलागी कळेना ॥७०॥ आशा, मनीषा, भ्रांती आणि । कल्पना वासना या डाकिणी । त्यांनी तिजला झडपोनी । आपणाधीन केलेसे ॥७१॥ त्यायोगे सद्विचार । तियेसी न सुचे अणूमात्र । धरोनिया दुराग्रह । स्वामीसुता बोधीतसे ॥७२॥ षड्विकार त्यागोनी । रमला जो स्वामींचरणी । दृढ निश्चय केला मनी । संसार त्याग करावा ॥७३॥ स्त्रियेच्या अंगावरी अलंकार । तेहि लुटविले समग्र । तिये दिधले शुभ्र वस्त्र । परिधान करावया ॥७४॥ आत्मलिंग समर्थे । स्वामीसुताते दिधले होते । त्या पादुका स्वहस्ते । मठामाजी स्थापिल्या ॥७५॥ कामाठीपुऱ्यात त्या समयी । मठ स्थापिला असे पाही । हरीभाऊ होऊनी गोसावी । मठामाजी राहिले ॥७६॥ धन्य धन्य ते स्वामीसुत । गुर्वाज्ञेने झाले विरक्त । परी जन त्यांते निंदित । नाना दोष देवोनी ॥७७॥ पूर्वजन्मी तप केले । त्याचे फळ प्राप्त झाले । सद़्गुरुचरणी विनटले । सर्व फिटले भवदुःख ॥७८॥ इति श्री स्वामी चरित्रामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा भाविक परिसोत । षोडशोऽध्याय गोड हा ॥७९॥
 
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥