गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. जैन
  3. जैन धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

महती सागर

डॉ.यू.म.पठाण

ज्यांनी एकोणीसाव्या शतकात मराठी संतसाहित्याला लक्षणीय योगदान दिले, अशा प्रमुख जैन संतकवींमध्ये महतीसागर यांचा समावेश होतो. ते कारंजा (जि.अकोला,-विदर्भ) येथील भट्टारक पीठाचे होते. त्यांचा जन्म विदर्भातील शेंदरजना (अंसनेर) इथं झाला. ते बहुभाषिक होते. त्यांचे गुरु देवेन्द्रकीर्ती हे होते.

महतीसागर यांचं वैशिष्ट्य असं की, त्यांनी विविध प्रकारची काव्यरचना केली. त्यात अभंग पद, स्तोत्रं, व्रतकथात्मक कविता, रुपणा अशा प्रकारचं लेखन आहे. हे लेखन जैन धर्म, जैन तत्त्वज्ञान जैन धार्मिक परंपरा व जैन आचारधर्म इ. विषयक आहे. महती - काव्य - कुंज या ग्रंथात हे लेखन समाविष्ट केलं आहे. हा ग्रंथ प्रकाशित झाला आहे.

या लेखनाचा तपशील असा आहे.
१. अभंग - 'दानमाहात्मरक, जिनस्तुतिपर, पंचपरमेष्ठीगुणवर्णनात्मक, पंचकल्याणिकवर्णनात्मक इत्यादी
२. व्रतकथा : रत्नमयव्रत, शोडसकारणव्रत, आदित्यवार, दशलासण्किव्रत, इ.
३. पद : चोविस तीर्थंकर - पद, संबोध-सहस्त्रपदी (६४ पदं)
४. स्तोत्र व स्तुती : सरस्वतीस्तोत्र, चोवीस तीर्थंकर स्तुती इ.

प्ररुपणा :
हा काव्यप्रकार केवळ काही जैन मराठा संतकवींच्या रचनेतच आढळतो. महतीसागरांनी 'चतुर्विशती' चौदा गुण स्थान इ. 'प्ररुपणां' लिहिल्या आहेत. महतीसागरांनी मराठीप्रमाणेच संस्कृतमध्येही लेखन केलं आहे. अष्टक-रचना ही त्यातील उल्लेखनीय रचना. (ज्यालामालिनी अष्टक, 'अरहंताष्टक' इ.)

आपले गुरु देवेन्द्र यांच्या आदेशावरुन आपण 'पंचकल्याणिकोत्सवकथे' सारखी रचना केली, असं स्वत:या संतकवीनंच म्हटलं आहे. त्या अन्य रचनांचाही (दशलासणिक कथा, स्तेडशसारणी-व्रतकथा इ.) उल्लेख आढळतो.

प्रथम ते दशलाक्षणिची कथा '।
वदविली बहु आग्रही सत्कथा ।।
व्रतकथा मज 'षोडशकारणी' अ
वदविली गुरुने मज तारणी ।।
जागोनि सद्गुरुचिन्हे, मज जालि आज्ञा ।
'कल्याणिकोत्सव-कथा' करिजे ममाज्ञा ।।
बछि धरोनि मनी आयु समाप्त केला (केली) ।
कल्याणिकोत्सव तश (कथा) मग म्या रचीला (रचीली) ।।

जैन संतकवी महतीसागरांचं सर्व लेखन धर्म प्रबोधनार्थ होतं, त्यातून त्यांनी जनसामान्यांवर उदात्त संस्कार केले.