बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020 (14:51 IST)

नाल्यातील घाण पाणी तुब्यांत स्फटिकासमान

गजानन महाराजांचे पुन्हा दर्शन घडावे अशी बंकटलालच्या मनास हूर-हूर लागत असे. त्यांनी शेगावात खूप शोधले पण महाराज कुठेच सापडले नाही. नंतर 4 दिवसांनी गोविंदबुवा टाकळीकर यांचे कीर्तन असे. बंकटलाल कीर्तन ऐकावयास निघाले. त्यांनी पितांबर नावाचा शिंप्याला थांबवून महाराजांच्या विषयी सांगितले. ते एकूण पितांबर म्हणे पुन्हा महाराज दिसले की मला सांगा. मी पण त्यांचा दर्शनास येईन.
 
नंतर ते कीर्तन ऐकू लागले. कीर्तन सुरू असतास बंकटलालची नजर सहज समोरच्या पाऱ्यांवर गेली. तेथे त्याला महाराज बसलेले दिसले. बंकटलाल चटकन उठून महाराजांकडे धावले. त्यांच्या पाठोपाठ पितांबर धावला. दोघांना महाराज भेटल्याचा आनंद झाला. बंकटलालने विचारले "महाराज, काही खायला आणू का?" महाराज म्हणाले, ''तुझी इच्छा असेल तर समोरच्या माळणीच्या घरातून पिठले, भाकरी आण." बंकटलालने माळणीच्या घरातून पिठले, भाकरी आणली. महाराजांनी पिठले- भाकरी खाल्ली. नंतर महाराजांनी आपल्याजवळचे तुंबे पीतांबराला दिले आणि म्हणाले- ''नाल्यावरून पाणी भरून ह्यात आण.'' पीतांबराने तुंबे घेतले आणि म्हणाला, ''महाराज, नाल्यात पाणी फारच कमी आहे, व जे आहे ते फारच घाण आहे.'' 
 
महाराज म्हणाले, ''मला तेच पाणी हवे आहे. जा तुंबा बुडव नि पाणी आण. ओंजळीने तुंब्यात पाणी भरू नको.'' मग पितांबर तुंबा घेऊन निघाला. नाल्याजवळ आल्यावर बघतो की नाल्यात तर पाणी फारच थोडे आहे. जेमतेम पायाचे तळवे बुडतील न बुडतील. इतक्या थोड्याच पाण्यात तुंबा कसा काय बुडणार? शिवाय पाणी घाणही होते. घाण पाणी का महाराजांना प्यायला द्यायचे ? पण महाराजांना तर तेच पाणी हवे आहे. आता तुंब्याला बुडवून बघावे. बघू काय होते ते. असा विचार करून पीतांबराने नाल्यातील त्या घाण पाण्यात तुंबा बुडविला. एकाएकी तुंब्या खाली खड्डा तयार झाला. तुंबा पाण्यात बुडाला आणि पाण्याने भरला. पीतांबराने तुंबा वर घेताच त्याला त्यात स्वच्छ पाणी दिसले. 
 
त्याला मोठे आश्चर्य वाटले. त्याने ते पाणी महाराजांना नेऊन दिले. महाराज पाणी प्यायले. मग बंकटलालने महाराजांना सुपारी आणि पैसे दिले. महाराजांनी बंकटलालला पैसे परत दिले. ते म्हणाले,'' हे तुमचे व्यवहारातील नाणे मला नको. मला भक्तिभावाचे नाणे लागते. ते तुझ्या जवळ आहे म्हणून तर मी भेटलो.''