अवघ्या ४८ मिनिटांत गाठता येणार मुंबई-पुणे; भारत स्वतः तयार करणार पुढील बुलेट ट्रेन कॉरिडोर
भारतातील बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले आहे की, पुढील वर्षापासून मुंबई ते पुणे दरम्यानच्या नवीन बुलेट ट्रेन कॉरिडोरचे काम सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे काम भारत आणि जपान मिळून करत असताना, हा मुंबई-पुणे कॉरिडोर भारत पूर्णपणे स्वतःच्या बळावर (स्वदेशी तंत्रज्ञानाने) तयार करणार आहे.
प्रवासाचा वेळ ४८ मिनिटांवर
मुंबई-पुणे दरम्यानचे १७० किलोमीटरचे अंतर बुलेट ट्रेनमुळे अवघ्या ४८ मिनिटांत कापले जाईल. यामुळे मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरे 'ट्विन सिटी' (जुळी शहरे) बनतील आणि एक मजबूत आर्थिक व सांस्कृतिक केंद्र तयार होईल.
पुणे-हैदराबाद अंतर २ तासांत
पुणे ते हैदराबाद दरम्यानच्या ५०० किलोमीटरच्या अंतरासाठीही बुलेट ट्रेनचे नियोजन असून, हे अंतर २ तास ८ मिनिटांत पूर्ण करता येईल.
आर्थिक इकोसिस्टम
या बुलेट ट्रेन नेटवर्कमुळे पुणे, हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद, सूरत, वापी आणि ठाणे ही सर्व शहरे एकमेकांशी जोडली जाऊन एक मोठा आर्थिक कॉरिडॉर आणि इकोसिस्टम तयार होईल.
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे अपडेट
या पहिल्या प्रोजेक्टच्या सुरत-वापी या पहिल्या सेक्शनवर ऑगस्ट २०२७ पर्यंत प्रवास सुरू होण्याची शक्यता असून, संपूर्ण मार्ग २०२८ पर्यंत कार्यान्वित होईल. या मार्गावर ट्रेन ३२० किमी/तास वेगाने धावेल.
बजेटमधील घोषणा
केंद्र सरकारने २०२६-२७ च्या बजेटमध्ये ७ नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोरची घोषणा केली होती. यामध्ये मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बेंगळुरू, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बेंगळुरू, दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलिगुडी यांचा समावेश आहे.
