1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (19:09 IST)

कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार - नरेंद्र मोदी

देशभरात कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
 
महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोपही नरेंद्र मोदींनी केला.
 
लॉकडाऊनमध्ये काँग्रेसच्या लोकांनी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उभं राहून मुंबईतील कामगारांना आपआपल्या घरी जाण्यासाठी तिकीट काढून दिले. लोकांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोत्साहित केलं असंही ते म्हणाले.
 
राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते संसदेत बोलत होते. काँग्रेसचा अनेकदा पराभव झाला तरी त्यांचा अहंकार जात नाही. काँग्रेसच्या भूमिका आणि वक्तव्य पाहिली तर 100 वर्षं सत्ता येऊ नये यासाठी जणू त्यांचा प्रयत्न सुरू आहे असं वाटतं असा टोला त्यांनी लगावला.
 
भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
 
पश्चिम बंगाल, तमिळनाडू, गोवा, ओडिशा, नागालँड अशा अनेक राज्यात मतदारांनी काँग्रसला नाकारलं आहे याचा उल्लेख करत त्यांनी काँग्रसच्या पराभवांचा पाढा वाचला. तरीही काँग्रेसचा अहंकार जात नाही, अशी टीका त्यांनी केली.
 
पंतप्रधानांनी म्हटलं, "पहिल्या लॉकडाऊन काळात देश करोना नियमांचे पालन करत होता, साऱ्या जगात असा संदेश दिला जात होता, तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर लोकांना जाण्यासाठी सांगितलं गेलं, तिकीट काढून दिलं गेलं.
 
महाराष्ट्रातील ओझं कमी करा आणि जिथे कोरोना कमी आहे त्या उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये घेऊन जा असंच जणू म्हटलं. तुम्ही आमच्या श्रमिक लोकांना मोठ्या त्रासात ढकलून दिलं."
कोरोनासारख्या आरोग्य संकटातही काँग्रेसने कायम टीका केली. राजकारणासाठी कोरोना काळाचा वापर केला. त्यावेळी जे निर्णय घेतले त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. जगभरात भारताची प्रतिमा खराब होण्यासाठी टीका करण्यात आली असंही ते म्हणाले.