शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 जानेवारी 2023 (15:19 IST)

नऊ राज्यांतल्या निवडणुका तसंच 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती काय असणार?

kamal 600
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत सुरू आहे. त्या हॉलच्या गेटवर मंदिर, सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचं एक मोठं कट आऊट लागलं आहे. यावर्षी नऊ राज्यात  निवडणुका होणार आहेत. त्यानंतर 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये मंदिर आणि राष्ट्रवाद हे महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत, असं काही जाणकारांचं मत आहे.
 
त्रिपुरामध्ये एका भाषणात गृहमंत्री अमित शाह यांनी अयोध्येत होणारं राम मंदिर 1 जानेवारी 2024 मध्ये उघडणार असल्याची घोषणा केली होती.
 
तेव्हा विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केला होता की, अमित शाह मंदिराचे पुजारी आहेत का किंवा त्यांचा मंदिराशी काय संबंध आहे? जाणकारांच्या मते भाजप पुन्हा एकदा मंदिराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मतं मागतील.
 
मात्र 2024 मध्ये लोकसभा निवडणुका तिसऱ्यांदा जिंकण्याचा भाजप नक्कीच प्रयत्न करेल.
 
नरेंद्र मोदीची भाजप या दोनच मुद्यांवर निवडणुका लढण्याचा धोका न पत्करता अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारताची झालेली प्रगती आणि देशात पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर सुद्धा लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील.
 
हॉलच्या गेटवर जे कटआऊट आणि उजव्या बाजूला जे फोटो आहेत त्यात इस्रो, ब्राह्मोस मिसाईल, आणि युद्धनौकेचे फोटो आहेत. त्यात भाजपच्या रणनीतिची थोडीफार झलक बघायला मिळते.
 
भारताच्या जलसीमेवर चीनचा वावर ही वाढला आहे. श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरापर्यंत चीनची मजल गेली आहे. लडाख आणि अरुणाचल प्रदेशात चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनचे हे प्रयत्न हाणून पाडण्याचा पुनरुच्चार नरेंद्र मोदींनी वारंवार केला आहे.

 जे पी नड्डा म्हणतात- निवडणुका हारायच्या नाहीत
नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेश आणि अन्य काही निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला आहे.
 
सोमवारी (16 डिसेंबर) केलेल्या अध्यक्षीय भाषणात नड्डा म्हणाले की, “हिमाचल मध्ये परंपरा बदलायची होती. पण ती आम्ही बदलू शकलो नाही.”
 
जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना आणि इतर नेत्यांना म्हणाले की, “कंबर कसून तयार आपल्याला एकही निवडणूक हारायची नाहीये.”
यावर्षी त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोरम, कर्नाटक, तेलंगाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आणि राजस्थान मिळून नऊ राज्यात निवडणुका होणार आहेत.
 
मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये 2018 मध्ये काँग्रेसला विजय मिळाला होता. राहुल गांधीचे निकटवर्तीय असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसचं सरकार पडलं.
ते म्हणाले की तेलंगाणासारख्या राज्यात पक्षाची स्थिती फारशी चांगली नाही. तिथे अशा एक लाख तीस हजार केंद्रांची नोंद घेण्यात आली आहे. तिथे काम सुरू करण्यात आलं आहे.
 
मागच्या वर्षी 160 अशा जागांची चर्चा झाली जिथे पक्षाची स्थिती सुधारण्याची गरज आहे. 2014 आणि 2019 मध्ये मिळवलेल्या विजयानंतर भाजपने परराष्ट्र धोरणावरही लक्ष केंद्रित केलं आहे. त्यात किती यश मिळालंय हे भाजप वेळोवेळी सांगत आलं आहे.
 
कोव्हिडच्या काळातलं लसीकरण, पायाभूत सुविधांच्या बाबतीतली प्रगती, (पक्षाच्या मते ब्रिटनला मागे टाकून भारत जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आली आहे.) मोटारींच्या उत्पादनात तिसरं स्थान, मोबाईल उत्पादनात दुसरं स्थान आणि रोज 37 किलोमीटर रस्ते निर्मिती अशा अनेक बाबी मतदारांच्या गळी उतरवण्याची तयारी भाजप करत आहे.
 
याबाबत पक्षाने दिल्लीत एक प्रदर्शन भरवलं होतं. त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं.
पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना हे प्रदर्शन बघण्यास सांगितलं होतं. तसंच देशाच्या कानाकोपऱ्यात या प्रदर्शनाची ख्यातकीर्ती पोहोचवण्यास सांगण्यात आलं होतं.
 
भाजपची निवडणुकांमधील कामगिरी
विरोधी पक्ष आणि सामान्य लोक कायम हा प्रश्न विचारतात की, 220 कोटी लोकांना लसी देण्यात आल्या त्यातल्या किती लसी मोफत दिल्या?नोटबंदीवरही लोक अनेक प्रश्न उपस्थित करतात.
 
मात्र कोव्हिडच्या साथीनंतर उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये भाजपला विजय मिळाला होता. पश्चिम बंगाल मध्ये मात्र भाजपला विजय मिळाला नाही.
मागच्या वर्षी गुजरात मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाध्यक्षांनी केलेल्या भाषणाचा गोषवारा कथन केला. मोदींकडून कार्यकर्त्यांनी बरंच काही शिकायला हवं असे ते म्हणाले.
 
पंतप्रधान मोदींचा रोड शो
कार्यक्रम स्थळी पोहोचण्याआधी नरेंद्र मोदींनी अर्धा किलोमीटर रोड शो सुद्धा केला. त्यासाठी दिल्लीतील पटेल चौक ते जयसिंह रोड फुलं, फुगे, पक्षाचा ध्वज, मोदींचे कट आऊट लावून सजवला होता. थोड्या थोड्या अंतरावर अनेक नर्तक त्यांची कला सादर करत होते.
 
जेव्हा मोदी लोकांमध्ये पोहोचले तेव्हा लोक त्यांच्या नावाने घोषणा देत होते. कार्यकर्त्यांनी काही वेळापूर्वी आणून दिलेले झेंडे ते मोदींना दाखवत होते.
मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असं वक्तव्य काही दिवस आधी अमित शहांनी केलं होतं. याआधी फक्त जवाहरलाल नेहरू  आणि इंदिरा गांधीच तीनदा पंतप्रधान झाले आहेत.
 
काँग्रेसची प्रतिक्रिया
सोमवारी (16 जानेवारी) काँग्रेसच्या जयराम रमेश यांनी ट्वीट केलं की, मोदींचा रोड शो ही राहुल गांधीच्या 'भारत जोडो'ची नक्कल आहे.
त्यावर भाजपने काहीही उत्तर दिलं नाही. इतका छोटा रोड शो काढायची काय गरज होती हा प्रश्नही कोणत्याच प्रसारमाध्यमांनी भाजपला विचारला नाही.
 
रविशंकर प्रसाद यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राहुल गांधीवरच टीका केली.  
ते म्हणाले, “नरेंद्र मोदींच्या सरकारने सीमावर्ती भागात 30 हजार किलोमीटर पेक्षा जास्त रस्ते निर्माण करण्यात आले आहे. मात्र काँग्रेसचं मत होतं की सीमेवर रस्ते निर्माण करता येत.”
 
रफाल विमानाच्या बाबतीतही त्यांनी प्रश्न विचारला की त्यांनी काँग्रेसने ही विमानं का खरेदी केली नाहीत?
काँग्रेसने रफालच्या किमतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावरून ते सुप्रीम कोर्टातही गेले होते. तेव्हा तांत्रिकदृष्ट्या कोर्ट या प्रकरणाची चौकशी करू शकत नाही.
 
मोदी सरकारवर स्तुतीसुमनं
या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर स्तुतीसुमनं उधळली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारतात झालेल्या कोव्हिड लसीकरणाची स्तुती केली. तसंच पुतिन यांनी युक्रेन युद्धात भारताच्या निष्पक्ष भूमिकेबद्दल स्तुती केली,
तसंच तिथे असलेल्या 32 हजार विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर येता यावं यासाठी अर्धा दिवस युद्ध थांबवल्याचं सांगितलं.
जुने मित्रपक्ष निघून गेल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की अकाली दल आणि नितीशकुमार स्वत:हून निघून गेले.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आज (17 जानेवारी) ला सामाजिक आणि आर्थिक प्रस्तावावर चर्चा होईल. मोदींच्या भाषणानंतर बैठकीचा समारोप होईल.
 
Published By- Priya Dixit