शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 जुलै 2022 (12:00 IST)

अमृता फडणवीस : 'देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना वेशांतर करून भेटायचे'

amruta fadnavis
बंडखोर आमदारांना घेऊन गेलो असताना रात्रीच्या वेळी देवेंद्र फडणवीसांना भेटायचो, असं बिंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐन विधानसभेत फोडल्यानंतर आता फडणवीसांची पत्नी अमृता फडणवीस यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.
 
देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी जाताना हुडी घालत आणि मोठा चष्मा लावून रात्री बाहेर पडत असतं असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
 मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलं की एकनाथ शिंदेंनी असा खुलासा केला आहे की देवेंद्र फडणवीस आणि ते रात्री दीडनंतर एकमेकांना भेटत असत. याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का? यावर अमृता फडणवीस म्हणाल्या की "देवेंद्र हुडी घालून आणि मोठा चष्मा लावून बाहेर पडत असत. मलासुद्धा ते तेव्हा ओळखायला नाही यायचे."
 
 "मी त्यांना विचारले की हे काय चालू आहे तेव्हा ते म्हणायचे काही नाही. पण मला थोडं वाटायचं की काही ना काही चालू आहे," असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
 
देवेंद्र फडणवीस हे सेवाभावी वृत्तीने काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांच्याजवळ कोणतेही पद असलं तरी ते त्याच निष्ठेनी काम करतात, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
 
याआधी जेव्हा एकनाथ शिंदेंनी सांगितले की देवेंद्र फडणवीस आणि ते स्वतः रात्री एकमेकांना भेटत असत तेव्हा तर देवेंद्र फडणवीस यांनी डोक्याला हातच लावला होता.
 
आणि मुख्यमंत्र्यांचं बोलणं ऐकून देवेंद्र यांनी डोक्याला हात लावला...
सोमवारी विधानभवनात एकनाथ शिंदेंनी हेच गुपित उघड केलं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोक्यालाच हात लावला होता.
 
"मी आणि फडणवीस कधी भेटायचो हे आमच्याही लोकांना माहिती नव्हते. सगळे झोपल्यावर मी फडणवीसांना भेटायला जायचो आणि सगळे उठायच्या अगोदर परत यायचो," एकनाथ शिंदे असं म्हणताच देवेंद्र फडणवीसांनी डोक्याला हात लावला आणि सगळं उघड करू नका, अशी म्हणायची वेळ फडणवीसांवर आली.
 
"फडणवीसांनी एकच शपथविधी होईल असं सांगितलं होतं आणि सगळं माहिती असल्याने ते खूश होते. पण आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार घेतला आहे. त्यांचा आणि आमचा अजेंडा सारखाच आहे. त्यांचे 115 आणि आमचे 50 असे मिळून 165 झाले. अजितदादा तुम्ही मगाशी म्हणालात की आम्ही निवडून येणार नाही. पण जे पूर्वी गेले ते विरोधी पक्षात गेले, हिंदुत्वाचा विरोध केला त्यांच्याकडे गेले. आम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार कऱणाऱ्यांकडे गेलो आहे. त्यामुळे 165 नाही, आम्ही दोघं मिळून 200 लोक निवडून आणणार," असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय.