शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 6 नोव्हेंबर 2022 (13:53 IST)

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : ऋतुजा लटके विजयी, विजयानंतर बोलताना म्हटलं...

rutuja uddhav
संपूर्ण राज्याचं लक्ष असलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत.
 
पहिल्या फेरीत ऋतुजा लटकेंना 4,200 मतं मिळाली. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत लटके यांना 7817 मतं मिळाली.
 
चौथ्या फेरीअखेर ऋतुजा लटकेंना 14468 मतं मिळाली आहेत. पाचव्या फेरीची मतमोजणी संपल्यानंतर ऋतुजा लटकेंना 17278 मतं मिळाली आहेत.
 
आठव्या फेरीची मतमोजणी संपली तेव्हा ऋतुजा लटकेंना 29033 मतं मिळाली आहेत. ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चित आहे. कारण प्रत्येक फेरीच्या मतमोजणीअखेरीस त्यांना मिळालेली मतं वाढत आहेत. दहाव्या फेरीनंतर ऋतुजा लटकेंना मिळालेल्या मतांची आकडेवारी होती- 37469
 
अकराव्या फेरीअखेर ऋतुजा लटकेंना 42343 मतं मिळाली. बाराव्या फेरीची मत मोजली गेली तेव्हा लटकेंना 45218 मतं मिळाली. त्यांच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झालं.
 
सतराव्या फेरीअखेर 71 हजार मतं ऋतुजा लटकेंना मिळाली.
 
ऋतुजा लटके यांच्याखालोखाल मतदारांनी 'नोटा'ला मतं दिली आहेत. त्यामुळे ऋतुजा यांची लढत ही अपक्षांपेक्षाही नोटाविरुद्ध असल्याचं चित्र पाहायला मिळालं. नोटाला दहा हजारांहूनही अधिक मतं मिळाली.
 
विजयानंतर काय म्हणाल्या ऋतुजा लटके?
'हा आपले पती रमेश लटके यांचा विजय आहे. त्यांनी अंधेरीत जी विकासकामं केली, त्याचा हा विजय आहे,' असं ऋतुजा लटके यांनी म्हटलं.
 
ऋतुजा लटके यांनी विजयानंतर शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच अनिल परब आणि अन्य शिवसेना नेत्यांचे आभार मानले.
 
मी महाविकास आघाडीची उमेदवार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यांना भेटून मी त्यांचेही आभार मानेन असंही त्यांनी म्हटलं.
 
'नोटा'ला मिळालेल्या मतांबद्दल बोलताना ऋतुजा लटकेंनी म्हटलं की, नोटा हा लोकशाहीनं दिलेला पर्याय आहे. मतदारांनी आपण हे मतदान का केलं याचा विचार करावा.
 
दरम्यान, नोटाला मिळालेली मतं ही भाजपची खेळी असल्याचा आरोप शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला. माध्यमांशी बोलताना नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं की, शिवसेनेचं यश कलंकित करण्यासाठी नोटाचा वापर केला गेला आहे, बाकी काही नाही.
 
फुटीनंतरची पहिली निवडणूक
या निवडणुकीमुळे राज्याचं संपूर्ण राजकारणच ढवळून निघालेलं पाहायला मिळालं होतं. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी हे मतदान झालं होतं.
 
या निवडणुकीच्या काही महिने आधीच शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि 40 आमदार घेऊन ते बाहेर पडले. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि शिवसेनेवरच दावा केला. हे प्रकरण कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे गेलं.
 
शिवसेनेत झालेल्या या फुटीचे पडसाद या निवडणुकीवर पाहायला मिळाले. ही निवडणूक कोणत्या चिन्हावर होईल याचा प्रश्न निर्माण झाला. शिवसेना आणि धनुष्यबाण यावर दोन्ही गटांनी दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्ह गोठवलं.
 
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाव बाळासाहेबांची शिवसेना असे देण्यात आले आणि त्यांना ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले. तर उद्धव ठाकरेंच्या गटाचे नाव शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असे देण्यात आले. त्यांना मशाल हे चिन्ह मिळाले.
 
फुटीनंतर मशाल या निवडणूक चिन्हावर उद्धव ठाकरे गट लढवत असलेली ही पहिली निवडणूक आहे.
 
चिन्ह मिळाल्यानंतर दोन्ही गटात लढत होईल असे वाटत असताना शिंदे गटाने ही जागा भाजपसाठी सोडल्याचे म्हटले.
 
भाजपतर्फे मुरजी पटेल यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज देखील भरला होता. पण नंतर दिवंगत नेत्याच्या निधनानंतर जर कुटुंबातील कुणी उभे राहत असेल तर त्या विरोधात उमेदवार न देण्याची संस्कृती आहे असं कारण देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुरजी पटेल यांना उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले.
 
त्यानंतर या निवडणुकीसाठी मतदान झाले. त्या मतदानाचा आज निकाल आहे.

Published By -Smita Joshi