गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जानेवारी 2022 (08:30 IST)

अहमदनगर जिल्ह्यातील आगारांतून बस सुरू, मात्र दोन तालुक्यातील बस बंदच…

मागील अडीच महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहनही केले, तरी सुद्धा अहमदनगर जिल्ह्यातील ११ आगारांपैकी सध्या नऊ आगारांतून थोड्याफार प्रमाणात बस सुटत असल्याने प्रवाशांची गैरसोय टळत आहे.
कालावधीत अकोले व पाथर्डी आगारांतून अद्याप एकही बस धावलेली नाही. अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११ आगारांपैकी ९ आगारातील बस सुरू झाले असून, पाथर्डी आणि अकोले मधून अद्याप एकही बस धावलेली नाही.
जिल्ह्यात एकूण ३ हजार ८८५ कर्मचारी आहेत, त्यापैकी २ हजार ४७५ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. तसेच आत्तापर्यंत १२५९ कर्मचारी कामावर रुजू झाले आहे.
यातील १४१ कर्मचारी रजेवर आहे, तर या संपादरम्यान जिल्ह्यातील २९० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. निलंबन करण्यात आलेल्यांपैकी 70 कर्मचारी कामावर हजर झाले असून 27 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आलीये.
तरी सुद्धा अनेक कर्मचारी संपावर ठाम असून विलगीकरणाची मागणी पूर्ण झाल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार केल्याचं सांगितलं आहे.
सध्या जिल्ह्यात शेवगाव, तारकपूर, कोपरगाव, नेवासे, श्रीरामपूर, जामखेड, संगमनेर, पारनेर, श्रीगोंदे या आगरातून १२० बसच्या माध्यमातून जिल्ह्यासह जिल्ह्या बाहेरील प्रवाशांना सुविधा पुरविली जात आहे.
१२० बसच्या माध्यमातून दैनंदिन २५० फेऱ्या होत आहे. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बसची संख्या वाढू लागल्याने खासगी वाहतूकदारांचे धाबे दणाणले असून, अव्वाच्या सव्वा भाडे आकरणी आता बंद होऊ लागलेली आहे.