1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (15:32 IST)

राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का,बीजेपीचे २१ नगरसेवक आणि १९ माजी नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल

उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पक्षाला खिंडार पडला असून आजी- माजी नगरसेवक  स्वगृही परतले आहेत. हा प्रवेश राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. माजी महापौर ओमी कलानी यांच्यासह बीजेपीचे २१ नगरसेवक आणि १९ माजी नगरसेवक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी कलानी कुटुंबाची मध्यरात्री बंद दाराआड चर्चा केल्यानंतर, शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. राष्ट्रवादी पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्षा सोनिया धामी यांची मंगळवारी रात्री प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केल्यावर, शहरजिल्हाध्यक्ष पदी कोण? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. पंचम कलानी यांनी भाजप नगरसेवक पदाचा राजीनामा महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे दिल्यावर, त्यांचे नाव राष्ट्रवादी पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्ष पदी घेतले जात आहे. त्यानुसार त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यासह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे.
 
वरप, कांबा आणि म्हारळ मधील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकूण ११४ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कलानीच्या चौथ्या पिढीने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.