रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (08:07 IST)

एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना दिलासा, ५०० कोटी रुपयांचा निधी वितरीत

एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे वेतन आणि इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर गुरुवारी हा निधी तातडीने वितरीत करण्यात आला. त्यामुळे वेळेवर वेतन न मिळाल्याने हवालदिल झालेल्या कर्मचार्‍यांना दिलासा मिळणार आहे.
 
कोरोनामुळे लागलेले निर्बंध,रोडावलेली प्रवासी संख्या,इंधनाची दरवाढ आदी कारणांमुळे एसटी महामंडळ आर्थिक गाळात आहे.एसटी महामंडळ तोट्यात गेल्याने त्याचा परिणाम कर्मचार्‍यांच्या वेतनावर झाला आहे.वेतन वेळेवर मिळत नसल्याने घरखर्च भागवण्याची मोठी समस्या कर्मचार्‍यांसमोर आहे.वेतन मिळत नसल्याने कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्याची घटना घडल्या आहेत.
 
एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे ६०० कोटी रुपयांची मदत मागितली होती.त्यावर अजित पवार यांच्या निर्देशानंतर एसटी महामंडळाला ५०० कोटी तातडीने वितरित करण्यात आले आहेत.त्यामुळे राज्यभरातील ९८ हजार एसटी कर्मचार्‍यांना वेतनाचा प्रश्न सुटणार आहे.
 
चालू आर्थिक वर्षासाठी १ हजार ४५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरीत केला असून उर्वरित ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत,असे निर्देश पवार यांनी दिले होते.निधी मिळाल्याने एसटी कर्मचार्‍यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.