गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 एप्रिल 2022 (22:01 IST)

केंद्राकडे रखडलेल्या प्रकल्पांना गती द्या, तुम्हाला श्रेय मी देतो म्हणत फडणवीसांना टोला

मेट्रोच्या श्रेयाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली. मुंबईतील विविध प्रकल्पांसाठी जागा देण्यासाठी केंद्राकडून करण्यात येणाऱ्या अडवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. मुंबईकरांच्या गरजेसाठी हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विरोधक का मदत करत नाहीत ? असाही सवाल त्यांनी यावेळी केला. मुंबईकरांच्या हितासाठी केंद्राकडे रखडलेल्या प्रकल्पांना गती द्या, तुम्हाला श्रेय मी देतो अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या कामाच्या श्रेयाच्या मुद्द्यावर विरोधकांवर निशाणा साधला. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
 
बुलेट ट्रेनसाठी आग्रह एकीकडे होत आहे. त्यासाठी बीकेसीतील जागा केंद्राकडून राज्य सरकारकडे मागण्यात येत आहे. कारण अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठीची ही धडपड सुरू आहे. मुंबईकरांची इतकीच काळजी आहे, तर कांजुरची ओसाड पडलेली जमीन मेट्रो प्रकल्पासाठी का देत नाही ? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. ही जमीन मिळाली तर बदलापूर अंबरनाथपर्यंत मेट्रो जाऊ शकते, भविष्यातील ही गरजच असणार आहे. दुसरीकडे मुंबई पंपिंग स्टेशनसाठी जागा केंद्राकडे मागण्यात येत आहे. तसेच धारावी पुनर्विकासासाठी रेल्वेची जमीन मागण्यात येत आहे, पण या गोष्टी अडवून ठेवल्या आहेत. जेव्हा विरोधक आम्हीच दावा केला आहे, असा दावा करत आहेत तेव्हा मुंबईकरांसाठी अडलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न का करत नाहीत ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.