1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (16:00 IST)

टीकेला उत्तर देतांना अजितदादांनी राज ठाकरेंचं नाव घेणं देखील टाळलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांना रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे.राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला,अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.त्यांच्या टीकेला अजितदादांनी प्रत्युत्तर दिलं आहे.काही लोक कधी कधी काही तरी बोलून जातात,त्यांच्या बोलण्याला महत्त्व देण्याची गरज नाही, असं म्हणत अजितदादांनी राज ठाकरेंचं नाव घेणं देखील टाळलं. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला होता. आज अजित पवार यांना पुण्यात पत्रकारांनी याच मुद्द्यावरुन प्रश्न विचारला असता त्यांनीही राज ठाकरेंवर त्यांच्या स्टाईलमध्ये निशाणा साधला.
 
शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोकं असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं काम नाही, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.
 
हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?,असा सवाल राज यांना करण्यात आला होता.त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता.