आपली माती, आपलीच माणसं!
२००८ या वर्षाने सरता सरता महाराष्ट्राच्या पटलावर अनेक राजकीय वादळे उठवली. या वादळांनी 'राज'सत्ता तर हादरवलीच, शिवाय अनेकांवर 'प्रहार'ही केले. रा्ज्याची 'देशमुखी' विलासरावांना सोडावी लागली आणि ती नकळत चालत चालत 'अशोकरावांच्या' गळी पडली. तिकडे 'आरार' आबांना त्यांच्याच 'पॉवरबाज' साहेबांनी थांबायला लावलं आणि 'ओबीसी' अशी नवी बाराखडी लिहू पाहणार्या छगनरावांच्या आणि पर्यायाने 'राष्ट्रवादी'च्या भुजांत बळ भरले. तिकडे उद्धव आणि राज यांच्या 'भाऊबंदकी' या नाटकाचा प्रयोग या वर्षीही रंगला. 'मराठी मुद्याचे'चे प्रॉपर्टी राईट्स अर्थात स्थावर हक्क आपल्याकडेच, असल्याचे सांगून 'मी मराठी, मी मराठी' हे पद दोघेही शिरा ताणून गात असल्याने हे पद आणि 'नाटकही' पुढे सरकायला तयार नाही. गोपीनाथांच्या बंडाने अनेकांच्या 'मुंड्या' त्यांच्याकडे वळाल्या. त्यातच तेही 'ओबीसी' ही नवी बाराखडी गिरवायला लागल्याने 'मिटता कमलदल' अशी अवस्था झाली होती. पण पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्यानंतर कमळाच्या पाकळ्या उमलल्या आणि सर्वत्र 'प्रमोद' जाहला. आता बघूया पुढच्या वर्षी यापैकी कोण किती महत्त्वाचा ठरतो ते? 'आफ्टरऑल' पुढच्या वर्षी अंगण आणि ओसरीतही निवडणुका आहेत, महाराजा. शड्डू ठोकून आव्हान देणार्या या मंडळीतील कोणाची पाठ मातीला लागणार नि कोण वरचढ ठरणार (पुढील फक्त पाच वर्षासाठी हं!) हे याच वर्षी ठरणार. मग बघूया कुणाच्या दंडाची बेटकुळी किती फुगतेय ते.
'प्रोव्हायडेड'- हा प्रश्न सत्ता आल्यानंतरचा आहे. त्यामुळे....
|

