रविवार, 22 सप्टेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 30 जुलै 2022 (08:26 IST)

तनुश्री दत्ता म्हणते, 'मला काहीही झाल्यास नाना पाटेकर जबाबदार'

हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री तनुश्री दत्तानं इन्स्टाग्राम पोस्ट लिहून खळबळजनक वक्तव्य केलंय. माझ्या जीवाला काहीही झाल्यास नाना पाटेकर जबाबदार असतील, असं अभिनेत्री तनुश्री दत्तानं म्हटलंय.
 
29 जुलै 2022 रोजी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तनुश्रीनं म्हटलंय, 'मला काहीही झाल्यास नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील माफिया जबाबदार असतील. बॉलिवूड माफिया कोण? तर तेच ज्यांची नावं सातत्यानं सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर येत होती.'
 
अभिनेत्री तनुश्री दत्तानं या पोस्टमधून 'बॉलिवूड माफियां'च्या सिनेमांवर बहिष्कार टाकण्याचंही आवाहन केलंय.
 
यापूर्वी '#MeToo' मोहिमेवेळी तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला होता. त्यावेळी काय झालं होतं,
'तनुश्रीच्या हेतूवर शंका घेण्यापेक्षा त्यांच्या हिमतीला दाद द्या'
'हॉर्न ओके प्लीज'च्या चित्रीकरणावेळी नाना पाटेकरांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं होतं, असं अभिनेत्री तनुश्री दत्तानं म्हटलं आहे. पण तिच्या या आरोपांवरून बॉलिवुडमध्ये दोन गट पडल्याचं दिसून आले होते.
 
एकीकडे अमिताभ बच्चन, सलमान खान आणि आमिर खान यांनी या विषयावर बोलण्याचं टाळलं होतं, तर दुसरीकडे फरहान अख्तर, स्वरा भास्कर, सोनम कपूर, ट्विंकल खन्ना, प्रियंका चोप्रा और अनुराग कश्यप असे कलाकार तनुश्री दत्ताच्या पाठीशी उभे राहिले होते. पाटेकर यांनी हे आरोप नाकारले आहेत. तसेच तनुश्रीवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
 
'आशिक बनाया आपने' या सिनेमापासून प्रकाशझोतात आलेल्या तनुश्रीने आरोप केला आहे की 'हॉर्न ओके प्लीज' या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान नाना पाटेकरांनी तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तिला आधी अवघडल्यासारखं झालं. तिने याचा विरोध केल्यावर सिनेमाच्या निर्मात्यांनी आणि नृत्य दिग्दर्शकाने काहीही केलं नाही, असंही तिने म्हटलं होतं.
 
तनुश्री दत्ता आता अमेरिकेत असते. गेले काही दिवस ती भारतात आलेली आहे. सिनेजगतापासून ती प्रदीर्घ काळ दूर आहेत. नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता 2009मध्ये प्रदर्शित झालेल्या हॉर्न ओके प्लीज त्यांनी एकत्र काम केलं होतं.
 
सोशल मीडियावर तनुश्री यांच्या बोलण्याला देशातील #metoo मोहीम असं म्हटलं जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा करणारे कलाकार या प्रकरणावर मौन बाळगून आहेत.
 
या कलाकारांत 'पिंक' चित्रपटावेळी 'नो मीन्स नो' अर्थात 'नाही म्हणजे नाही' या डायलॉगचा पुनरुच्चार करणारे अमिताभ बच्चन यांचा समावेश आहे. आपल्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमात महिलांच्या अधिकारांविषयी बोलणारे आमिर खान यांचाही समावेश आहे.
कोण काय म्हणतंय?
 
अमिताभ बच्चन यांना याप्रकरणाबाबत विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, "माझं नाव तनुश्री दत्ता नाही आणि नाना पाटेकरही नाही. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ शकतो?"
 
आमिर खान यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "कोणत्याही मुद्यावर पुरेशी माहिती नसताना मी बोलणं उचित ठरणार नाही. मात्र असं खरंच काही घडलं असेल तर ते निराशाजनक आहे. मात्र याप्रकरणाची चौकशी होईल, सत्य काय आहे ते समजेलच. आता त्यावर काही बोलणं योग्य होणार नाही."
 
सलमान खान म्हणाले, "मला या प्रकरणाची माहिती नाही. मला काही माहिती असतं तर तुम्हाला समजलं असतं. मला काहीच कल्पना नाही." हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला उद्देशून ते म्हणाले, "ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही आल्या आहात त्याबाबत प्रश्न विचारा. हा मुद्दा आता पुरे. बाकीच्यांना प्रश्न विचारण्याची संधी द्या."
तनुश्री यांना कोणाचा पाठिंबा?
 
तनुश्री एकट्या पडणं, लोकांनी त्यांच्या हेतूविषयी शंका घेणं क्लेशदायक आहे. वादविवाद आणि ट्रोलिंगच्या माध्यमातून मिळणारी लोकप्रियता कोणत्याही महिलेला नको असते. चित्रपटाच्या सेटवर तनुश्री यांच्याबाबत जे घडलं ते चुकीचं आहे.
 
तनुश्री यांच्यासोबत घडलेल्या कथित प्रसंगाच्या कथित प्रत्यक्षदर्शी पत्रकार जेनिस यांच्या ट्वीटचा उल्लेख काही नटनट्यांनी केला आहे.
 
जेनिस आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, "2008 मध्ये मी 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर गेले होते. त्याठिकाणी तनुश्री अस्वस्थ असल्याचं जाणवलं. नाना पाटेकर आणि गणेश आचार्य आपापसात काहीतरी बोलत असल्याचं दिसलं. थोड्या वेळाने शूटिंग सुरू झालं. काही वेळानंतर तनुश्री तिथून निघून गेली. शूटिंग थांबलं. तनुश्री व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेली. थोड्या वेळाने पोलीस आले. नाना पाटेकर यांना बोलताना मी पाहिलं. ते म्हणाले, 'ती माझ्या मुलीसारख्या आहे.' यानंतर तनुश्रीच्या घरचे आले. त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला."
 
अनुराग कश्यप यांनी जेनिस यांचं ट्वीट शेअर करताना म्हटलं की, "आता तरी तनुश्री यांच्या हेतूविषयी कोणी शंका घेणार नाही."
 
अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी तनुश्री दत्ता यांनी मीडियाला दिलेली मुलाखत शेअर करताना म्हटलं आहे की माझा तनुश्री यांच्यावर विश्वास आहे.
 
ट्विंकल खन्ना लिहिते, "तनुश्री दत्ता यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलण्याआधी हे वाचा. शोषणविरहित वातावरणात काम करणं हा त्यांचा अधिकार आहे."
फरहान अख्तर ट्वीटमध्ये म्हणतो, "हे घडलं तेव्हा जेनिस तिथे उपस्थित होत्या. 10 वर्षांनंतरही तनुश्री यांच्या गोष्टीत काहीही बदल झालेला नाही. त्यांच्या हेतूवर शंका घेण्याऐवजी त्यांच्या धाडसाला दाद द्यायला हवी."
 
प्रियंका चोप्रा यांनी फरहान अख्तर यांचं ट्वीट रीट्वीट केलं आहे. ती म्हणते, "मी सहमत आहे. जगात पीडितांच्या बोलण्यावर लोकांनी विश्वास ठेवायला सुरुवात करायला हवी."
 
सोनम कपूर म्हणते, "तनुश्री आणि जेनिस यांच्या बोलण्यावर माझा विश्वास आहे. जेनिस माझी मैत्रीण आहे. त्या खोटं बोलणार नाहीत. कोणाच्या बाजूने बोलायचं हे आपल्याला ठरवायला हवं."
 
या संदर्भात रेणुका शहाणे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. त्या लिहितात, "नाना पाटेकर त्यांच्या गुणवत्तेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामासाठी जसे प्रसिद्ध आहेत, तसाच त्यांच्या शिघ्रकोपी स्वभाव अनेकांना माहीत आहे आणि त्याची झळ इंडस्ट्रीमध्ये अनेकांनी सोसली आहे. तनुश्रीने तिला त्या नृत्याच्या शूटिंगवेळी अवघडल्यासारखं वाटत होतं, असं म्हटलं आहे. नाना पाटेकर यांचा हेतू गैरवर्तणूक करण्याचा नसेलही पण दिग्दर्शक किंवा नृत्य दिग्दर्शक अभिनेत्रीला अवघडल्या सारखं वाटू नये म्हणून नृत्याच्या स्टेप्समध्ये बदल करू शकले असते. नृत्याच्या स्टेप्समध्ये बदल केले असते तर काय मोठी आपत्ती आली असती?"
 
या चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी सेटवर असं काही घडलं नव्हतं असं त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणतात, "काही गैरसमज झाले होते. पण तसं काही घडलं नव्हतं. शिवाय नाना पाटेकर यांनी स्टेजवर कोणत्याही राजकीय पक्षांच्या लोकांनी बोलावलं नव्हतं."