1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

संसार हा सुखाचा

- अरुणा सबाने

WD

विवाहानंतर दोन वेगवेगळ्या वातावरणातल्या वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या व्यक्ती एकत्र येतात. एकत्र येतात म्हणजे काय जन्मभरासाठी एकमेकांच्या सुखदु:खाचे भागीदार होतात. विवाह होईपर्यंत आपल्या कमावत्या पुत्रावर आई-वडिलांचे जे बंधन नसते, मुलगा म्हणून ज्या अनेक सवलती मुलाला मिळालेल्या असतात, त्या सर्वावर आता मात्र नववधूची बंदी आलेली असते. उठण्या-बसण्याच्या वेळेपासून तर जेवणा-फिरण्याच्या बाबतीतही पत्नीची रोकटोक हळूहळू सुरू होते. सुरूवातीला पतीला सुध्दा बरे वाटते. आपल्याला कुणीतरी हक्काने, प्रेमाने सांगते, आपल्याला विनंतीवजा आज्ञा करतेय यातही पतीला सुख मिळत असतं.

याच्या उलट पत्नीचे होते, पतीच्या निवडीच्या सिनेमा, पतीच्या आवडत्या रंगाची साडी, कुणाकडे जायचं, कुठे जाणे टाळायचे वगैरे बाबतीत पतीची मर्जी कुठे काय बोलायचे यावर पतीचा लगाFirst impression is the last impression ही म्हण मनात घोटूनच पत्नीने पहिले पाऊल पतीगृही टाकलेले असते. कारण तिला हे चांगलेच माहीत असते की, आता काही दिवस आपण ह्यांचे ऐकून घ्यायला हवे. एकदा का आपण ह्यांना आपलंस केले की, मग जन्मभर हे आपले ऐकणार. नव्हे, आपण ह्यांना ऐकायला लावणारच म्हणून ती सुध्दा सुरूवातीला 'ह्यांच्या' तालावर नाचायला खुशीनी तयार असते. पण किती दिवस? महीना-दोन महिने-लवकरच प्रेमाचा ज्वर उतरतो. तिला व त्याला दोघांनाही मग आठवण होते की, आपल्यालाही एक मन आहे, त्याच्या काही अपेक्षा आहेत आणि दोघांमधलाही 'स्व' जागृत झाला की, इथूनच वादावादीला सुरूवात होते.

अनेकदा पती-पत्नीतील वादाचं कारण इतकं क्षुल्लक असतं की त्यावर त्यांनी शांतपणे विचार केल्यास त्याचं त्यांना हसू येईल आणि आपण विनाकारण एवढ्या क्षुल्लक गोष्टींसाठी भांडत बसलो हे कळेल. शिवाय ही चूक परत होणारही नाही. पण पती-पत्नी स्वत:च्या चुकांकडे त्रयस्थ भूमिकेतून बघतच नाही आपण वारंवार त्याच त्या चुका त्यांच्याकडून घडत राहतात. परिणामी संसारात उगाचच कटुता निर्माण होते.

खरे तर विवाह हे जसे एक बंधन आहे तसेच तो आपसातला एक समझौता आहे. नव्हे असावा. कधी पतीला तर कधी पत्नीला एकमेकांनी एकमेकांची बाजू समजून घ्यावी लागते. ज्या दाम्पत्यांजवळ समजून घेण्याची शक्ती जास्त असेल त्यांच्यात कलह फार कमी प्रमाणात होतात. पण मुळीच भांडण झालेले नाही किंवा होतच नाही, असे एकही दाम्पत्य या पृथ्वीतलावर सापडणार नाही हे विधान मी ठामपणे करू शकते. कारण दोन भिन्न व्यक्ती एकत्र आल्यात की, प्रत्येक गोष्टीत फरक असणारच. विवाह समझौता असतो. कधी याला, तर कधी तिला ‍आणि अनेकदा दोघांनाही थोडंफार बदलावेच लागते.

मात्र प्रत्येकदा पत्निनीच झुकते माप घ्यावे असं बहुतांशी सगळ्यांचेच मत असते. पण हा नियम नाहीय. वेळ व परिस्थिती बघून जो कोणी समजौता करील त्याचा संसार सुखाचाच होतो. प्रत्येक स्त्री-पुरूषाच्या मनात आपल्या भावी जीवनाबद्दल स्वप्न असतात. पण स्वप्न नेहमीच सत्यात उतरतील असे नाही. आपला जीवनसाथी आपल्याला हवा तसा मिळाला नाही हा राग त्याच्यावर काढणे कितपत बरोबर आहे? शिवाय कॉलेजकन्यांच्या बहुतांश जीवनसाथीबद्दलच्या कल्पना म्हणजे पिश्चरमधला हिरो, ज्यात सगळेच गुण चांगले असतात. परंतू एकाच व्यक्तीत सगळे चांगले गुण निघणे हे फक्त सिनेमात व कथा-कादंबर्‍यातच शक्य आहे. सिनेमा व प्रत्यक्ष जीवन यात खूप तफावत आहे, हे प्रत्येक तरूणींनी लक्षात ठेवलेच पाहिजे.

आपल्या नेहमी असे बघण्यात येते की, ज्या घरात आई-वडीलांमध्ये प्रेम आणि वैचारिक साम्य असेल त्या घरातील मुले मानसिकरीत्या निरोगी असतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात मोकळेपणा असतो, धारिष्ट्य असते आणि त्यांच्याजवळ आत्मविश्वासही भरपूर असतो. घरातले वातावरण मोकळे व उत्साहपूर्ण असते. कुठेही गेलेत तरी त्या वातावरणात ते नेहमीच लवकर मिसळतात आणि आपल्या मोकळ्या स्वभावामुळे लवकर लोकप्रिय होतात.

NDND
याच्या अगदी उलट दृष्य ज्या घरात पती पत्नीमध्ये नेहमी कलह असेल, भांडणे होत असतील, अशा घरातली मुले नेहमी उदास आणि शांत दिसतात. ही मुले एकदम कुणातच मिसळण्याची हिंमत करीत नाहीत. त्यांना आई-वडीलांचे मोकळं न मिळाल्यामुळे ते नेहमी कुढतात. असंतुष्ट असतात. पुढे जाऊन त्यांना प्रेम मिळाले तरी ते मात्र कुणावरच मोकळेपणानी प्रेम करू शकत नाही. दुसरा आपल्यावर खरंच प्रेम करतोय यावर त्यांचा विश्वास बसत नाही. अशा व्यक्तीचा स्वभाव बदलणं कठीण असतं. जर का त्यांना जीवनसाथी कठोर स्वभावाचा किंवा ज्याला आपण बाळबोध भाषेत शिष्ट म्हणू असा मिळाला तर तो त्याला भावनात्मकदृष्ट्या समजून घेऊ शकत नाही. ‍आणि अशावेळी त्या दोघांच्या संसारात चांगलीच दरी निर्माण होते आणि त्यांचं जीवन नैराश्यपूर्ण बनते.

आपल्याकडील विवाहपध्दती ही एखाद्या जुगारासारखी आहे. मोठे लोक लग्न जुळवतात. वर-वधू एकमेकांना फार पमी वेळ (मुलगी तर एखादा कटाक्षच टाकून मुलाला बघत असते) बघतात, मोठेच लोक सगळा पुढाकार घेतात. वर वधूला एकमेकांना पाहण्याची, बोलण्याची, एकमेकांची आवडनिवड बघण्याची कोणतीच संधी त्यांना बहुतेक मिळत नाही. कितीही सुधारणा झाल्यात म्हटलं तरी लग्न जुळल्यावर एकमेकांची ओळख करून घेण्याची, एकमेकांशी वैचा‍रिक देवाणघेवाण करण्याची संधी फक्त 10 टक्के लोकांनाच मिळते आणि उरलेल्या 90 टक्के लोकांना विवाहानंतर एकमेकांच्या स्वभावाची ओळख होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. जसे आहे तसेच स्वीकारणे भाग असते. पण अशावेळी चिडचिड करून, जोडीदारासोबत भांडण करून काहीही उपयोग होत नसतो, जो अशा वातावरणात वाढलेला असेल तशा सवयी त्याला लागतात. म्हणून हळूहळू प्रेमानेच त्याला वळवता येते.

NDND
खूपदा पती खूपच अव्यवस्थित असतात तर पत्नी म्हणजे स्वच्छतेची भोक्ती. कोणतीच वस्तू त्याला नीट जागेवर ठेवाविशी वाटत नाही तर ह्याच बाबतीत पत्नीचा कटाक्ष, या गोष्टी दिसायला फार छोट्या असल्या तरी अनेकदा याच गोष्टींचा दोघांनाही मन:स्ताप होतो. यावर नुसती चिडाचिडी करून किंवा दुसर्‍याजवळ तक्रारी करून चालायचे नाही तर त्याची वस्तू नेहमी त्यालाच शोधायला लावायची. 2-4 दा त्रास झाला म्हणजे व्यवस्थितपणाचे महत्त्व पती राजांच्या लक्षात आल्याशिवाय राहायचे नाही. टोकाची भूमिका घेण्यापेक्षा प्रेमानी पतीला लवकर जिंकता येईल यावर सगळ्यांनीच विश्वास ठेवायला हरकत नाहीय. घराच्या टापटिपीसोबत स्त्रियांनी स्वत:कडेही जातीनी लक्ष पुरवावं. शारीरिक स्वच्छतेनी मानसिक समाधान मिळतं. अनेकदा घर साफ करता करता स्त्रिया स्वत:कडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करतात. रात्री झोपायला बेडवर आल्यात की त्यांच्या साडीला मसाल्याचा वास व शरीराला घामाचा वास येतो, अशा पत्नीला जवळ घेण्याची कोणत्या पतीला इच्छा होणार?

एक गोष्ट मात्र दोघांनीही आयुष्यभर लक्षात ठेवायला हवी. एकमेकांमध्ये काय वाट्टेल ते महायुध्द घडो. पण एकमेकांचे दोष दुसर्‍यांसमोर मुळीच काढू नये. यामुळे तिच्या अह्मला धक्का लागतो. पती किंवा पत्नी कधीच दुसर्‍यासमोर स्वत:चा अपमान सहन करू शकत नाही. कुणा एकानी आधी दुसर्‍यासमोर अपमान केला की, ते तिच्या मनात पक्केपणी रूतून बसतं आणि ती पण मग त्याचा अपमान करण्याची संधी बघत असते. अशांनी उगाचच तेढ निर्माण होऊन संबंध बिघडतात. अर्थातच संसारात हा सूर मुळीच नको. एकरूप होऊन संसार करण्याच्या उमेदीत सुरूवातीचे दिवस सुरू होतात आणि हळूहळू असे कटू रंग त्यात भरले जातात आणि संसाराची घडी विस्कटल्या जाते. पण यात संयम, थोडा धीर, मनाचा मोठेपणा, झालं गेलं विसरून गेलं, ही भावना, अशा छोट्या छोट्या गोष्टींच भान ठेवलं तर प्रत्येकाचा संसार नक्कीच सुखाचा होईल.