1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 मार्च 2023 (08:31 IST)

सावरकर आमचे दैवत, आम्ही दैवताचा अपमान सहन करणार नाही, उद्धव ठाकरे यांचा थेट राहुल गांधीना इशारा

uddhav
आता जिंकेपर्यत लढायचं आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढायचं.मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची बहुचर्चित ‘शिव गर्जना’ सभा संपन्न 
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बहुचर्चित ‘शिव गर्जना’ सभा  रविवारी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानात पार पडली. यावेळी सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. सोबतच आता जिंकेपर्यत लढायचं आहे. आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढायचं आहे मी मुख्ममंत्री होण्यासाठी लढत नाही, तुमच्यासाठी लढतोय; उद्धव ठाकरे असे सांगितले. दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे. आम्ही दैवताचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिला.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे केले ते येड्या गबाळेचे काम नाही. सावरकरांनी 14 वर्ष छळ सोसला. जसे आपले क्रांतीकारक बळी गेले, तशाच मरण यातना सावरकर 14 वर्ष सोसल्या आहेत. आपण लोकशाही टिकविण्यासाठी एकत्र लढत आहोत. त्याला फाटे फोडू नका असे आवाहनही ठाकरे यांनी केले.
 
भाजपला थेट निवडणुकीचे आव्हान
सभेच्या सुरुवातील मालेगावच्या नागरीकांनी कोरोना विरुद्ध यशस्वी लढा असल्याचे सांगत त्यांना धन्यावद आणि त्यांचे कौतुक केले.  भाजपवर निशाना साधतांना शिवसेना तोडू शकतो असं जर भाजपाला वाटत असेल तर मी आज त्यांना खुलं आव्हान देतो की आत्ता निवडणुका घ्या. तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावाने मतं मागा, मी माझ्या वडिलांच्या नावाने मतं मागतो.बघू महाराष्ट्राची जनता कुणाला कौल देते? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपाला आव्हान दिलं. तुमची ५२ काय १५२ कुळं खाली उतरली तरीही ठाकरेंपासून शिवसेना तुम्ही तोडू शकत नाही. हिंमत असेल तर प्रयत्न करून बघा.” असं खुलं आव्हान भाजपला दिलं.
 
मुख्यमंत्री यांना सवाल, शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिलेले वाचता येत नाही का?
मुख्यमंत्री यांच्यावर टीका करताना शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्र्यांना वाचता येत नाही का? भाषण बरे वाचता येते... मुख्यमंत्री महोदय तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहात.. केंद्रातील भाजप सरकारचे शेतकरी विरोधात धोरण आहे, त्याविरोधात तुम्ही आवाज उठवा... पण बकरे कधी आवाज उठवणार? तोंड उघडले तर काय बाहेर पडणार... यांच्याकडून आपेक्षा काय करणार... मुख्यमंत्री शेतकरी आहेत... मुख्यमंत्र्यांच्या शेतात दोन दोन हॅलिपॅड आहेत... असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
 
कृषी मंत्र्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे, ते काळोखात जाऊन अवकाळीची पाहणी करत आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान कृषी मंत्री काळोखात करतात.. महिलांना शिव्या देतात... सुप्रिया सुळे यांना त्यांनी शिवीगाळ केली. तरीही मंत्री म्हणून निर्लजासारखे मांडीला मांडी लावून बसतात.. हे त्यांचे हिंदुत्व आहे, असे ठाकरे म्हणाले. 
 
चंद्रकांत पाटील म्हणाले होते की आम्ही छातीवर दगड ठेवून यांना मुख्यमंत्री केलं. भाजपवाले म्हणतात आमच्याकडे गुजरातहून वॉशिंग पावडर येते. त्यामुळेच आम्ही सर्वांना धुवुन स्वच्छ करतो. आता मला कळाले हे सर्व गुजरातला का गेले होते ते. गद्दारीचा शिक्का तुमच्या कपाळावर आहे. जेथे मत मागायला जाल त्यावेळी हे विसरु नका. तुम्ही गद्दारी करुन मुख्यमंत्री झाला आहात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
 
१५ दिवसांपूर्वी संजय कदम, अद्वय हिरे  आले हे सभा सभारंभ पुरता असू नये. ही लढाई देशाची, शेतकऱ्यांची आहे. तुमची मला आवश्यकता आहे. श्रीकृष्णाने जसा गोवर्धन उचलला तसा लोकांनी पण हातभार लावला तसा तुम्ही पण हातभार लावा. रावण धनुष्य घेतांना उताणा पडला तिथे हे मिंधे कोण? मी तुमच्या सोबतीने लढायला उभा आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
 
निवडणूक आयोगाचे गांडुळ झाले
निवडणूक आयोगाचे गांडुळ झालेय..आयोगाच्या डोळ्यांत मोती बिंदू झाले नसेल तर खेड आणि मालेगांव ची सभा बघावी. प्रतिज्ञापत्र लाखोंच्या संख्येनं दिली ती काय रद्दी होती काय. शिवसेना माझ्या वडिलांनी स्थापन केली, मिंधेंच्या वडिलांनी केली नाही... गद्दारांना स्वत:च्या वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते...गद्दारांच्या हातामध्ये भगवा शोभत नाही.. पक्ष चोरला.. चिन्ह चोरले पण यांना शिवसैनिक चोरता आला नाही.... पण गद्दारांचा शिक्का कपाळावर मारुन घेतला, असे ठाकरे म्हणाले.  
Edited By - Ratnadeep ranshoor