गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (15:12 IST)

मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत ते तपासावे लागेल : नाना पटोले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू असो वा मुस्लिम सर्वांचा डीएनए एकच असल्याचं विधान केलं आहे.त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत हे तपासावे लागेल,असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
 
नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला.मोहन भागवत कुठले डॅाक्टर आहेत ते तपासावे लागेल,संविधानात समभावाची भावना विशद करण्यात आली आहे.सर्वधर्म समभावाची भावाना काँग्रेसने मांडली आहे.रक्त एक आहे असं म्हणण्यापेक्षा सर्व धर्म समभाव असं मोहन भागवत बोलले असते तर त्याचं स्वागत केलं असतं,असा टोलाही पटोले यांनी लगावला.
 
दरम्यान, पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नका,अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली.मागासवर्गीय आयोगाने मागितलेले ४५० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने द्यावा,अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
 
कोरोनाबाबत केंद्र सरकार निर्णय घेतं. त्याचं पालन राज्य सरकार करतं.भाजप राज्य सरकारला बदनाम करत आहे.भाजपला आंदोलनच करायचं असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात करावं.कारण मोदी सरकारनेच कोरोनाच्या गाईडलाईन आणि सूचना दिल्या आहेत, असा हल्ला त्यांनी भाजपवर चढवला.
 
काँग्रेसच्या पुरवणी यादीबाबत हायकमांड निर्णय घेणार असून काँग्रेसमध्ये नाराजी नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी बेळगाव महापालिका निवडणुकीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली.साधारणपणे ज्या राज्यात ज्यांचं सरकार असतं तिथे त्यांचा विजय होतो, असं ते म्हणाले.
 
मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात हिंदू असो वा मुस्लिम असो सर्वांचं डीएनए एकच असल्याचं म्हटलं आहे. प्रत्येक भारतीय हा हिंदू आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील विद्वानांनी कट्टरपंथीयांविरोधात उभं राहिलं पाहिजे, असं ते म्हणाले होते. तसेच ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये मतभेद निर्माण करून त्यांच्यात भांडणं लावली.मुस्लिम कट्टरपंथीय असल्याचं हिंदूंना सांगून ब्रिटिशांनी भांडणं लावली. त्यातच दोन्ही समाजात एकमेकांवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे त्यांनी कधीच एकमेकांसमोर आपलं म्हणणं मांडलं नाही. म्हणून दोन्ही समाजात अंतर निर्माण झालं. आता आपण आपला दृष्टीकोण बदलला पाहिजे, असं ते म्हणाले