शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (17:15 IST)

जळगाव : ‘भाजपचे गायब 24 नगरसेवक 18 तारखेला शिवसेनेला मतदान करतील’

जळगावमध्ये महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. ऐन निवडणुकीच्या आधी भाजपचे तब्बल 24 नगरसेवक नॉट रिचेबल म्हणजेच संपर्कात नसल्याचं समोर आलं आहे.
महत्त्वाचे म्हणजे भाजपकडून व्हिप जारी करण्याआधीच नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेने भाजपचे नगरसेवक पळवल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
जळगावच्या महापौर आणि उपमहापौर पदाची 18 मार्चला निवडणूक आहे. भाजपमध्ये महापौरपदाच्या निवडीवरून रस्सीखेच सुरू झाली होती.
भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी 14 मार्च रोजी नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. पण भाजपचे नगरसेवक त्याआधीच अज्ञातस्थळी रवाना झाले. त्यामुळे भाजपच्या 57 नगरसेवकांमध्ये फूट पडल्याची शक्यता आहे.
 
नेमकं प्रकरण काय आहे?
2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार येईपर्यंत जळगाव महानगरपालिकेवर सुरेश जैन यांच्या गटाचे वर्चस्व होतं. पण तत्कालीन फडणवीस सरकारच्या वेळेस पालिकेवर भाजपची सत्ता आली.
75 पैकी 57 जागा भाजपने जिंकल्या. दोन टर्ममध्ये भाजपचा महपौर असेल असं ठरल्याने महापौर भारती सोनावणे यांचा कार्यकाळ 17 मार्च रोजी संपणार आहे. तेव्हा दुसऱ्या टर्मच्या महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. ही निवडणूक 18 मार्च रोजी होईल असं ठरलं. पण त्याआधीच भाजपचे 24 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाल्याच्या बातम्या आल्या.
जळगावचे स्थानिक पत्रकार संतोष सोनावणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "भाजप आणि शिवसेनेमध्ये महापौर पदासाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे. तसंच महापौर पदासाठी भाजपमध्येच रस्सीखेच सुरू असल्याने अंतर्गत गटबाजी आहे. या वादातून नगरसेवक बंड करण्याची शक्यता आहे. सध्या 24 नगरसेवक अज्ञातस्थळी आहेत."
 
'नगरसेवक आमच्या संपर्कात'
ऐन महापौर निवडीआधी भाजपचे तब्बल 24 नगरसेवक संपर्कात नसल्याने भाजपचे महापौरपद धोक्यात आलं आहे.
जळगाव महानगरपालिकेत महापौर निवडीसाठी 38 मतांची गरज आहे.
शिवसेनेचे 15 नगरसेवक आहेत. एमआयएमचे 3 नगरसेवक आहेत. भाजपचे 57 नगरसेवक असून यापैकी 24 नॉट रिचेबल आहेत.
यासंदर्भात भाजपची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही भाजपचे स्थानिक आमदार राजू भोळे यांना संपर्क साधला. ते म्हणाले, "मला यासंदर्भात काहीही कल्पना नाही. माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने मला कल्पना नाही."
दुसऱ्या बाजूला शिवसेनेने मात्र भाजपचे 20 हून अधिक नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
शिवसेनेचे नगरसेवक जय उर्फ बंटी जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आम्ही कोणाचेही नगरसेवक पळवले नाहीत. ते स्वत: आमच्याकडे आले आहेत. 20 हून अधिक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. ते सध्या जिल्ह्याच्या बाहेर आहेत. 18 तारखेला ते शिवसेनेच्या बाजूने मतदान करतील."
"शिवसेनेचाच महापौर होईल. यासाठी 38 नगरसेवकांची आवश्यकता आहे. आमचे 15 नगरसेवक असून एमआयएमचे तीन नगरसेवक आमच्यासोबत आहेत. शिवाय, भाजपचे 20 हून अधिक नगरसेवक आमच्यासोबत आहेत," असंही जय जोशी यांनी सांगितलं.
भाजपची अंतर्गत गटबाजी याला कारणीभूत असल्याचंही ते म्हणाले.
माजी महापौर सुनील महाजन यांच्या पत्नी जयश्री महाजन या शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार आहेत.
 
फडणवीस आणि महाजन यांची प्रतिष्ठा पणाला?
भाजपकडून उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व माजी मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन करतात. ते माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे भाजपच्या दोन्ही बड्या नेत्यांसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक ठरतेय.
एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे आधीच उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठ्ठा धक्का बसला. त्यात भाजपचे बहुमत असूनही शिवसेनेला सत्ता स्थापनेत यश आल्यास भाजपची कोंडी होऊ शकते.
यासंदर्भात बोलताना राजकीय विश्लेषक राहुल रनाळकर यांनी सांगितलं, "शिवसेनेने भाजपमधून नगरसेवकांचा एक गट फोडला आहे. हा गट 18 मार्चला शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला तर भाजपची मोठी नाचक्की होऊ शकते."
"जळगाव भाजपमध्येही अंतर्गत गटबाजी आहे. भाजपचे आमदार राजू भोळे यांच्याबाबत नाराजी असून ती दूर करण्यात संघटनाही कमी पडली आहे. त्यात जळगावमधील स्थानिक कामं मार्गी लागली नाहीत. कोरोना रुग्णसंख्येत देशात पहिल्या दहा शहरांमध्ये जळगावचा क्रमांक लागतो. त्यादृष्टीने अपेक्षित खबरदारी घेण्यात प्रशासन अपयशी ठरलं आहे," असं राहुल रनाळकर सांगतात.