1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 16 नोव्हेंबर 2019 (14:59 IST)

`शोले'मधल्या रामगडच्या फक्त आठवणी उरणार? गब्बरसिंगचा अड्डा होतोय साफ

इमरान कुरेशी

शोले सिनेमा पाहिला नाही असा विरळाच! पिढ्या बदलल्या तरी सिनेमाची जादू अजूनही तशीच आहे. सिनेमाच्या गाजलेल्या सीनबरोबर अनेक ठिकाणंही आपल्या मनात कोरली गेली आहेत.
 
यातलाच एक सीन आठवतोय, जिथे वीरू महादेवाच्या मूर्तीमागे लपून महादेव बनून बसंतीशी बोलतोय हेच रामनगर `रामगड' या नावानं सिनेमात दाखवण्यात आलं होतं. ते रामगड ज्या कर्नाटक राज्यातल्या रामनगरमध्ये उभारण्यात आलं होतं, ते आता हळूहळू विकासकामांमध्ये लुप्त होऊ घातलं आहे.
 
कारण या आणि अशा अन्य सीनसाठी जिथे सेट बनवण्यात आला होता, त्या जागी आता विकासकामांना वेग येणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग 275 म्हणजेच बंगळुरू-म्हैसूर हायवेसाठी एका बायपासची योजना प्रस्तावित आहे, हा बायपास रामनगरजवळून जाणार आहे.
 
निर्माते रमेश सिप्पी यांनी 70च्या दशकात रामनगरच्या दगडखोऱ्यांत 'शोले'चं शूटिंग केलं होतं. संजीव कुमार, अमिताभ बच्चन, अमजद खान, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन, सचिन पिळगावकर आणि ए. के. हंगल या स्टारकास्टने शोलेमध्ये जान आणली. शोलेतल्या व्हीलनला गब्बर सिंगलाही लोकांनी अजरामर केलं.
 
मात्र आता इथे सारंकाही बदलणार आहे. मात्र हा भाग पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने एका वनअधिकाऱ्याने इथे या विकासकामांसाठी दगडांना सुरुंग लावण्यावर बंदी आणली आहे.
 
परिक्षेत्र वनअधिकारी ए. एल. दालेश सांगतात की, "इथे सुरुंग लावले जात नसून, बायपास बांधणारे ठेकेदार अद्ययावत उपकरणांनी दगड कापून काढत आहेत. इथे सुरुंग लावण्याला पूर्ण बंदी आहे."
 
दालेश यांनी सुरुंग लावत नसल्याचं म्हटलं असलं, तरी इथे सुरुंग लावण्यात येत असल्याचे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनीही आरोप केले आहेत. गावकऱ्यांसाठी इथे चेतावणीवजा संदेश देणारी पाटी लावली आहे. यात "सावधान! जवळच सुरुंग लावलेला असू शकतो" असा संदेश लिहिला आहे.
कायद्यानुसार संवेदनशील क्षेत्रापासून एक किलोमीटरच्या परिघात सुरुंग लावण्यावर बंदी आहे. राज्य सरकारही यात काहीही हस्तक्षेप करू शकत नाही. यापूर्वी 10 किलोमीटर इतक्या परिघासाठी हा नियम होता. परंतु सध्या नक्की सुरुंग कुठे लावला जात आहे, याविषयी गावकऱ्यांमध्ये संभ्रम असल्याचं, रामनगर जिल्ह्याच्या पूर्व अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.
 
पर्यावरण सपोर्ट ग्रूपचे विश्वस्त सिंह सलदान्हा म्हणाले की, "केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं या वर्षीच्या सुरुवातीस सुरुंग लावण्यासाठी 10 किमीच्या परिघाऐवजी एक किमीचा परीघ निश्चित केला. यानंतरच वन्य प्राण्यांना धोका उत्पन्न झाला आहे. रामदेवरा बेट्टा गिद्ध अभयारण्य 2000 साली जाहीर करण्यात आलं असलं, तरी वन्यजीव केवळ अभयारण्याच्या परिघात राहात नाहीत."
 
सध्या तरी इथे विकासकामांच्या योजनांचा विचार केला जात आहे. या भागात सिनेमाचं शूटिंग होऊन 44 वर्षं लोटली तरी बंगळुरू-मैसूर हायवेवरून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये शोलेच्या आठवणी जाग्या होतातच.