1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शनिवार, 26 ऑगस्ट 2023 (11:57 IST)

चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण "संस्कृती"

Chitpavan Konkanastha Brahmin
कोकणस्थ ब्राह्मण या जातीमध्ये अनेक कुळे आहेत. आणि प्रत्येक कुळाचे एक "लक्ष्मी-केशव" मंदीर त्यांच्या मुळ कूळ-गावी आहे. बरीचशी मंदीरे तत्त्कालिन ब्राह्मणांच्या चरितार्थासाठी बांधलेली आहेत. एन्थोवेन या ब्रिटिश समाजशास्त्रज्ञाने "मुंबई इलाख्यातील जाती' या ग्रंथात १३६ ब्राह्मण पोटजातींची नोंद केली आहे. "ज्ञानकोशा'त डॉ. केतकरांनी भारतात ब्राह्मणांच्या ८०० पोटजाती असल्याची नोंद केली आहे.) त्यापैकी एक पोटजात म्हणजे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांच्या पूर्वाश्रमीच्या ऐतिहासिक परंपरेमुळे त्यांच्या ऐतिहासिक उदयाबद्दल आणि महत्त्वाकांक्षांबद्दल त्यांचे अनुयायी, समर्थक आणि विरोधकांत या समुदाय विशेषाबद्दल कुतूहल आढळते.
 
चित्तपावन शब्दाचा अर्थ आणि व्युत्पत्ती आणि दंतकथा
बऱ्याचदा चित्पावन/चित्तपावन या शब्दाचा अर्थ चितेतून पावन झाले आहेत ते असा घेतला जातो. कारण, चित्पावनांना भगवान परशुरामांनी कोकणात आश्रय दिला असे मानले जाते. समुद्रात १४ प्रेते तरंगत होती, परशुरामांनी त्यांना जिवंत केले आणि दीक्षा दिली. तेच चित्पावन ब्राह्मण असे समजले जाते. मात्र इतिहासाचार्य राजवाडे यांनी चित्पावनांचे मूळपुरुष हे अग्नी चयन करत व अग्नि (चित्य) चयनाने जे पावन झाले ते चित्पावन असे वर्णन केले आहे (म.श्री. दीक्षित संपादित ’आम्ही चित्पावन’). 
 
’दंतकथा : परशुरामाने १४ व्यक्तींना कोकणात आणून वसविले व त्यांना ब्राह्मण करून घेतले, या दंतकथेची संगती ते लावतात. चित्पावन हे नाव का पडले, याचे ऐतिहासिक दाखले त्यांनी दिले आहेत. ३०८८ वर्षांपूर्वी चित्पावन वसतीसाठी कोकणात आले, असे वि. का. राजवाडे यांचे म्हणणे आहे. अरुण क. घोष यांच्या मतानुसार चित्पावन पोटजात सातवाहनाच्या काळात निर्माण झाली. अद्यापि संशोधनाने सिद्ध/शास्त्रीय आधार नसलेल्या काही मतांनुसार चित्पावन ब्राम्हणांच्या प्रथा चाली-रीती पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारी भूमिहार ब्राम्हण, पंजाबचे मोह्यळ ब्राम्हण, केरळातील नंबुद्री ब्राम्हण, आंध्रप्रदेशातील हव्यक, गुजरातेतील अन्विक, उत्तराखंडाचे कुमाऊं ब्राम्हण आदीशी मिळत्याजुळत्या आहेत आणि या सर्व समुदायात परशुरामास विशेष सन्मान आहे. कोकणस्थ ब्राम्हणांचा त्रोटक उल्लेख कोब्रा असाही केला जातो.
 
अनुवंशशास्त्र आणि शरीरयष्टी
सर्वसाधारणत: गोरा वर्ण, सडपातळ बांधा, निळे/हिरवे/घारे डोळे, तरतरीत नासिका यामुळे चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण वेगळे ओळखता येतात. युरोपीय वैज्ञानिकांनी ब्राम्हणांच्या विविध गटांबद्दल जे अभ्यास केले त्यात, अनुमानांच्या अपेक्षेप्रमाणे कोकणस्थ ब्राम्हण, वाय गुणसूत्र परीक्षणांवरून इतर भारतीय ब्राम्हणी गटांपेक्षा वेगळे, आणि दक्षिणी युरोपातल्या, प्रामुख्याने फ्रेंच, इटालियन, ग्रीक, लायबेरियन, आणि आयरिश लोकांच्या गुणसूत्रांशी जवळीक दर्शवणारे आढळले. कोकणस्थ ब्राम्हणांप्रमाणे दक्षिण इंग्लंडात बरेच जण अजूनही अंशतः मूळ आयरिश आणि फ्रेंच वाय हेप्लोग्रुप गुणसूत्रांचे आढळतात. कोकणच्या सागरी किनाऱ्यावर प्रथमतः पोहोचणारे गोरे, उत्तम तब्येतीचे, मध्यम बांध्याचे, सौम्य तपकिरी ते लाल केसांचे आणि घाऱ्या अथवा हिरव्या डोळ्यांचे असावेत. असेच कोकणस्थ ब्राम्हण आजही असेच असतात. अलीकडील अभ्यास (किविसिल्ड आणि इतर २००३, गायकवाड आणि इतर २००५), पोर्तुगीज आणि फ्रेंचांनी भारतातील काही भागावर राज्य केल्याच्या काळापासून, चित्पावनांच्या युरोपीय मुळाबद्दल शंका व्यक्त केली जात असे. तरीपण चित्पावनात इतरही वैविध्यपूर्ण गुणसूत्रांचाही प्रभाव आढळतो. (साहू आणि इतर २००६) यांच्या मते चित्पावनांच्या वडिलांच्या बाजूस बऱ्याचदा आढळणारा (Y-DNA), R1a (Y-DNA) हा हेप्लोग्रूप उत्तरी भारतीयांतसुद्धा सामान्यत: आढळतो. याचा अर्थ त्यांच्या प्राचीन पूर्वजांचे एक-समान असणे हे अजूनतरी न उलगडलेले कोडे आहे. मिडल ईस्टर्न ओरिजिनचा समजला जाणारा J2 (Y-DNA) बऱ्याच उच्चजातीय भारतीयांत आढळतो. (साहू आणि इतर २००६). यांच्या मतानुसार R2 (Y-DNA), L (Y-DNA), आणि H1 (Y-DNA) हेप्लोग्रुपांचे अस्तित्व प्राबल्याने मूळचे भारतीय समजल्या जाणाऱ्या आणि पश्चिम व दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांत आढळते. त्यामुळे उपलब्ध पुराव्यावरून उपरोल्लेखित वर्णीय वैशिष्ट्ये आईच्या बाजूने आल्याची जास्त शक्यता आहे. उत्तरांचल राज्याच्या गढवाल प्रभागातील सुमारे १६४९९ फुटावरील रूपकुंड नावाच्या तलावात वादळात सापडलेले अनेक जुने (सुमारे नवव्या शतकातील) मानवी सागांडे एकत्र सापडले होते त्या सांगाड्यांच्या the Centre for Cellular and Molecular Biology (CCMB), Hyderabad, येथे केल्या गेलेल्या DNA संशोधनानुसार त्यातील तीन सँपल्सचे DNA चित्पावन ब्राह्मणांशी साधर्म्य असणारे आढळून आले.
 
गोत्रे
चित्पावनांची १४ गोत्रे आहेत. गोत्रांची नावे ही त्या गोत्रांचा मूळपुरुष असलेल्या विद्वान ऋषींची नावे आहेत. प्रत्येक गोत्रात अनेक उपनामांचा समावेश आहे. काही उपनामे ही एकापेक्षा जास्त गोत्रात आढळतात.
 
गोत्रे - प्रवर
अत्रि -आत्रेयार्चनानसश्यावाश्चेति
कपि - आंगिरसामहीवोरुक्षयसेति
काश्यप - काश्यपावत्सारनैध्रुव
कौंडिण्य -वासिष्ठमैत्रावरुणकौंडिण्येति
कौशिक - वैश्वामित्रघमर्षणकौशिकेति
गार्ग्य - आंगिरसशैन्यगार्ग्येति
जामदग्न्य -भार्गवच्यावनाप्नवानौर्वजामदग्न्येति
नित्युंदन -आंगिरसपौरुकुत्स्यत्रासदस्यवेति
बाभ्रव्य -वैश्वमित्रदेवरातौदसेति
भारद्वाज -आङि्गरसबार्हस्पत्यभारद्वाजेति
वत्स -भार्गवच्यावनाप्नवानौर्वजामदग्न्येति
वासिष्ठ -वासिष्ठेन्द्रप्रमदाभरद्वस्विति
विष्णुवृद्ध -आंगिरसपौरुकुत्स्यत्रासदस्यवेति
शाण्डिल्य-  शाण्डिलासितदैवलेति 
वर सांगितल्याप्रमाणे चित्पावनांत १४ गोत्रे आहेत, व मूळ कुळे(आडनावे) ६० समजली जातात.साठे(साठ्ये) हे साठावे आडनाव. मराठवाड्यातल्या अंबेजोगाई येथील योगेश्वरी ही तसेच भवानी, महालक्ष्मी, वज्राई या कोकणस्थांच्या कुलदेवता आहेत.
 
सर्व गोत्रे आणि त्यांतील मूळ आडनावे
१. अत्री : आठवले, चितळे, भाडभोळे. (एकूण तीन) २. कपि : खांबेटे, जाईल, माईल, लिमये. (एकूण चार) ३. काश्यप : गानू, गोखले, जोग, लवाटे, लेले. (एकूण पाच) ४. कौंडिन्य : पटवर्धन, फणसे (फणशे). (एकूण दोन) ५. कौशिक : आपटे, गद्रे, बाम, भावे (भाव्ये), वाड. ((एकूण पाच) ६. गार्ग्य : कर्वे, गाडगीळ, दाबके, माटे, लोंढे (एकूण पाच) ७. भारद्वाज : आचवल, गांधार, घांघुरडे, टेणे, दर्वे, रानडे (रानड्ये). (एकूण सहा) ८. जामदग्नि : कुंटे, पेंडसे. (एकूण दोन) ९. नित्युंदन : भाडभोके, वैशंपायन. (एकूण दोन) १०. बाभ्रव्य : बाळ, बेहेरे. (एकूण दोन) ११. वत्स : मालशे. (एकूण एक) १२. वासिष्ठ : ओक, गोगटे, गोवंड्ये, धारू, पोंगशे, बागल. बापट, बोडस, दाते (दात्ये), भाभे, विंझे, साठे (साठये, साठ्ये). (एकूण बारा) १३. विष्णुवर्धन : किडमिडे, नेने, परांजपे (परांजप्ये), मेहेंदळे. (एकूण चार) १४. शांडिल्य : गणपुले, गांगल, डोंगरे, जोशी, दामले, परचुरे, भाटे, सोमण. (एकूण आठ)
अशी चौदा गोत्रे, आणि एकसठ आडनावे(कुळे).
 
चित्पावनांची आडनावे यज्ञविषयक कार्यावरून बनली. 'खांडल विप्र महासभा का इतिहास' या ग्रंथातील सूचीत प्रथम संस्कृत अधिकारनामे व नंतर त्यांचे राजस्थानी व मराठी अपभ्रंश दिले आहेत. 
 
संस्कृती, सामाजिक आणि आर्थिक
सर्व साधारणतः कोकणस्थ कुटुंबे सभ्य, उच्चशिक्षित, साध्या परंतु नीटनेटक्या राहणीमानाची, काटकसर करणारी, अंथरूण पाहून पाय पसरणारी म्हणून ओळखली जातात. सन १९५० च्या पूर्वी असलेल्या पिढ्यांत पुरुषांचा पोषाख मुख्यत्वे उपरणे व धोतर आणि स्त्रियांचा नऊवारी लुगडे असा असे. १९७० नंतरच्या दशकात त्यांची जागा पुरुषांचा पायजमा किंवा पॅन्ट आणि स्त्रियांची सहावारी साडी यांनी घेतली. आधुनिक काळात कोंकणस्थ स्त्रियांनी पंजाबी सलवार कमीज किंवा क्वचित पाश्चिमात्य पोशाखाचा स्वीकार केलेला आढळतो. कोंकणस्थांना नाटकाची आणि भावसंगीताची विशेष आवड असते.
चित्पावन समाज महाराष्ट्रातील सामाजिक पुनरुत्थानाच्या विविध चळवळीचे पहिले लक्ष्य ठरत आला. सुरुवातीस सौम्य विरोध झाला तरी हा समाज नव्या आधुनिक विचारसरणीला धरून सामाजिक सुधारणा सकारात्मकतेने अमलात आणत गेला. याचा मुख्य परिणाम असा झाला की आज कोकणस्थ स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जीवनातील सर्व क्षेत्रांत आघाडीवर दिसतात.
 
सण
या विभागातील ज्या चालीरिती इतर भारतीय/ ब्राम्हण/ हिंदू चालीरितींशी मिळत्या जुळत्या असतील त्या येथून इतर संबंधित लेखांत हलवण्यात सहकार्य करावे व येथे केवळ चित्पावन कोकणस्थांच्या पुरत्या मर्यादित चालीरितींचा समावेश करावा इतर भाग वगळावा.
 
नवरात्र
आश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रातील अष्टमीला कोकणस्थ ब्राह्मणांत घागरी फुंकल्या जातात. सकाळी सोवळ्यात सुवासिनी महालक्ष्मीची पूजा करतात. तिन्हीसांजेला महालक्ष्मीचा मुखवटा तयार करून त्याची पूजा करण्यात येते. आणि त्यानंतर घागरी फुंकण्याला सुरुवात होते. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा अष्टमीचा खेळ चालतो.
 
संक्रांत
संक्रांतीचे वाण पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात. त्याला सुगडे असेही म्हणतात. काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणेही असतात. ही वाणे सवाष्णीला दिली जातात. एक देवाजवळ व एक तुळशीजवळ ठेवले जाते. व मग तीन सवाष्णींना आपल्या घरी बोलावून वाण दिले जाते. काही बायका छोटी बोळकी देतात. काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोळकी देतात. त्याला 'सुगडे' म्हणतात. बहुतेक कोकणस्थ ब्राह्मणांकडे सुगडे देण्याची प्रथा आहे. लग्नानंतरची पहिली पाच वर्षे महिला 'पाटावरची वाणे' देतात. म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सुगडी, तिळगूळ व हळदकुंकू घेतात आणि तीन सवाष्णींच्या घरी जाऊन त्यांच्या घरांतील देवासमोर पाट मांडून त्यावर या वस्तु ठेवतात. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत बायका आपापल्या घरी हळदीकुंकवाचे कार्यक्रम करतात. त्यावेळी आलेल्या स्त्रियांना वस्तु दिल्या जातात. या वस्तु 'लुटल्या' गेल्या असे म्हणायची पद्धत आहे.. पूर्वी काही ठिकाणी 'सोरट' करत असत. 'सोरट'मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तु मांडून ठेवतात व समोरच्या वाडग्यातील चिठ्ठयांमधून एक चिठ्ठी निवडून त्यात असलेली वस्तु त्या सवाष्णीला कुंकू लावून देतात.
 
गौरी-गणपती
गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात. तर काही ठिकाणी हात असलेल्या तर काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या गौरी असतात. कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळ्याकाठी अथवा विहिरीपाशी जाते. चार खडे ताम्हणात घेते. तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने( न बोलता) चालावे असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी, ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर कोमट पाणी घालून, हळदकुंकू लावून, मग तिला घरात घेतात. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदुळ पसरून खडे ठेवतात. उभ्या गौरींसाठी खास पातळे व दागिने असतात. गौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. दोन सवाष्णी गौरी घरी आणतात. गौरी आणावयाच्या दिवशी पुढील व मागील दारांपासून ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात. गौरी आणतेवेळी 'गौरी कशाच्या पाऊली आली ग सोन्यामोत्याच्या पाऊली आली' असे म्हणत गौरी आणतात. एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पद्धत आहे. उंबरठ्यावरती धान्य भरून माप ठेवतात. दोन्ही सवाष्णींनी उंबरठ्याच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुभत्याचे कपाट, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवतात. नंतर गौरी जागेवर बसवतात. गौरीपुढे तांदळाची व गव्हाची ओटी ठेवतात. खोबर्‍याची वाटी, फळे, कुंकवाचे करंडे ठेवतात. काही बायका गौरींपुढे लाडू, करंज्या, चकल्या इ. ताजे पदार्थ करून ठेवतात. गौरींपुढे दोन बाळे पण ठेवतात. हळदकुंकू, गंध, फूल, अक्षता, दूर्वा, आघाडा, गेजवस्त्र यांनी गौरींची पूजा करतात. त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळदकुंकू, साखर देतात. दुसर्‍या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करतात. गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात. साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात. दुसर्‍या दिवशी मुख्यतः घावन-घाटले किंवा पुरणपोळी करतात. तळण, खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करतात. तिसऱ्या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी 'उतरवतात' म्हणजे त्यांचे विसर्जन करतात.
 
अनंत चतुर्दशी (भाद्रपद शुद्ध चतुर्दशी)
अनंत चतुर्दशी हे व्रत अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली तरच, मागून घेतात. ओळीने चौदा वर्षे हे व्रत करण्याचा प्रघात आहे. सर्व व्रतांमध्ये अनंत।अनंताचे व्रत कडक आहे. या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने ताम्रकलश चौरंगावर मांडून त्यास दोन छोटे रूमाल गुंडाळतात. त्यावर दर्भ।दर्भाचा शेज तयार करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळिग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात. समंत्रक चौदा गाठी मारलेला असा तांबडा रेशमाचा दोरा बनवून त्याचीपण पूजा करतात. पूजा झाल्यावर तो दोरा उजव्या हातात बांधतात. त्यानंतर अनंताची कथा भक्तिभावाने ऐकतात. रात्री मंत्रजागर, गाणी इ. कार्यक्रम करतात. अशा प्रकारे चौदा वर्षे अनंताचे व्रत करतात. त्याने इच्छीत फळ प्राप्त होते असा समज आहे. कित्येक ठिकाणी पिढ्यान-पिढ्या हे व्रत केले जाते.
 
दसरा - सीमोल्लंघन (आश्विन शुद्ध दशमी)
नवरात्र संपले की दहावा दिवस म्हणजे दसरा येतो. पौराणिक कथेनुसार देवांविरुद्ध राक्षसांचे घनघोर युद्ध आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ दिवस चालले होते. दहाव्या दिवशी पार्वतीने विजयी होऊन काशीत प्रवेश केला. तो दिवस होता आश्विन शुद्ध दशमीचा. विजयारूपी पार्वतीने विजय मिळविला म्हणून या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात. दसरा हा पवित्र अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतात. कोणत्याही मंगल कार्याचा किंवा कोणत्याही नवीन कामाचा श्रीगणेशा या दिवशी करतात. लहान मुलांकडून ह्या दिवशी सरस्वतीपूजन करून शिक्षणाचा प्रारंभ करतात.
 
या दिवशी शमी वृक्षाची पूजा केली जाते. रामाने रावणाशी युद्ध करून त्याचा वध केला व वनवासात जाताना शमीच्या वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रास्त्रे परत ताब्यात घेतली म्हणून शमीच्या वृक्षाला या दिवशी विशेष महत्त्व आहे.उत्तर भारत।उत्तरभारतात या दिवशी रावण।रावणाची प्रतिमा जाळण्याची प्रथा आहे. वनवासाला जाताना सीतेचे सुवर्ण अलंकार आपटा।आपट्याच्या झाडामधे ठेवले होते असे मानतात. म्हणून आपट्याची पाने सोने म्हणून सर्वांना वाटतात. या दिवशी वाहनांचीही पूजा करतात. रघूने कुबेरावर स्वारी करायची धमकी दिल्यानंतर कुबेराने पृथ्वीवर सोन्याचा पाऊस पडला, तो सर्व पाऊस रघूच्या अंगणातील आपट्याच्या झाडावर पडला, म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांची सोने म्हणून देवघेव होते. हे सोने बरोबरीच्या लोकांनी एकमेकांत, किंवा लहान मुलांनी मोठ्यांना द्यावयाचे असते. या दिवशी घरातील कर्त्या पुरुषांनी सीमोल्लंघन करावयाचे असते. आपट्याची सोनेरूपी पाने घेऊन देवीचे दर्शन घ्यावयाचे. घरी आल्यावर बहिणीकडून अथवा घरांतील मुख्य सवाष्ण स्त्रीकडून ओवाळून घ्यायचे असा प्रघात आहे. पूर्वी, साम्राज्य-वर्धनाच्या दृष्टीने ज्या मोहिमा आखल्या जात त्यांची सुरुवात या दिवशीच्या सीमोल्लंघनाने होत असे. या दिवशी स्वयंपाकात मुख्यतः पुरणपोळी करतात. तळण, खीर व इतर स्वयंपाक सणाप्रमाणे करतात. मात्र, हल्ली दसऱ्याला श्रीखंड-पुरी करावयाची पद्धत रूढ झाली आहे. दसरा आणि सीमोल्लंघन हे सण महाराष्ट्रातील सर्व जाती एकसारखेच साजरे करतात.
 
बोडण
लग्न, मुंज यांसारखे मंगल कार्य पूर्ण झाल्यानंतर हे व्रत केले जाते. बोडण हा एक हिंदू चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणातील कुलधर्म, कुलाचार आहे. आपल्या कुळातील चालीप्रमाणे म्हणजेच परंपरेप्रमाणे वार्षिक, त्रैवार्षिक अगर शुभकार्य झाल्यावर बोडण भरतात. बोडण हे शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी किंवा रविवारी भरतात. चातुर्मास, पौष किंवा चैत्र महिना सोडून हा देवीचा धार्मिक कार्यक्रम एरवी कधीही करता येतो. तीन किंवा पाच सुवासिनी व एक कुमारिका यांना तेल शिकेकाई देऊन, सुस्नान होऊन सोवळ्याने म्हणजेच रेशमी वस्त्र नेसून सर्व सौभाग्य अलंकार लेऊन येण्यास सांगितले जाते. सर्वांचे पाट गोलाकार मांडून मधोमध एक पाट अगर चौरंग ठेवून ठरावीक पद्धतीचीच रांगोळी काढायची असते. बोडण भरण्यास पितळी परातच लागते. ती चौरंगावर ठेवतात. आल्याबरोबर सुवासिनींची व कुमारिकेची तुळशीपुढे पूजा होते. प्रथम तुळशीची पूजा व नंतर आलेल्या महिलांची व कुमारिकेची गरम पाणी व दूध पायावर घालून ओटी भरतात. त्यानंतर लगेच त्या बोडण भरण्यास बसतात. आपल्या देवघरातील अन्नपूर्णा काढून ती बोडणाच्या परातीत ठेवतात तिची पूजा करण्याआधी, प्रथम सुपारीचा गणपती करून त्याची पंचामृताने पूजा करतात. कणीक साखर घातलेल्या दुधात भिजवून तिचे देवीकरिता छोटे छोटे दागिने करतात. त्या कणकेचेच सिंहासन व दुधासाठी हराडेरा करतात. आरतीसाठी कणकेचे पाच छोटे छोटे दिवेही करतात. देवीची पूजा घरच्या मालकिणीने पंचामृत वापरून करायची असते. देवीभोवती पुरणपोळीवर सर्व पदार्थ वाढून पाच नैवेद्य मांडले जातात. यावेळी नैवेद्यासाठी पुरण घातलेच पाहिजे. नैवेद्य दाखवून कणकेच्या दिव्यांनी दुर्गादेवीची आरती म्हणतात.. नंतर ते पाच दिवे परातीत प्रत्येक नैवेद्याजवळ ठेवतात. घरातील दुसरी बाई चांदीच्या संध्येच्या पळीस साखळी गुंडाळून त्याने दुधाची धार सोडून ते दिवे शांत करते. या पूजेसाठी जसे पुरण हवे तसे एक ते दोन भांडी पंचामृतही (दूध, दही, तूप, मध, साखर) लागते. दिवे शांत झाल्यावर देवीवर प्रत्येकी पाच पळ्या दूध व दही घालतात. नंतर घराची मालकीण सर्वांना बोडणाच्या परातीला हात लावण्यास सांगते. याला बोडण कळवणे म्हणतात. नंतर इतर लोक बोडण कळवण्यास सुरुवात करतात. आधी कुमारिका देवी, पैसा व सुपारी त्या बोडणातून काढते, व नंतर देवीच्या तोंडास पुरण किंवा साखर लावून देवी देवघरात ठेवते. बोडणातले पुरण सवाष्णीच्या हातास लावून त्यांचे हात ’थांबवते’. परातीतील बोडण चमचाभर काढून घेऊन सर्व माणसांना अंगारा म्हणून लावतात. ते बोडण नंतर डब्यात, पातेल्यात घालून गाईस खायला घालतात. ते इतर कोणत्याही जनावरास घालायचे नसते, तसेच टाकून द्यायचे नसते. बोडण हा धार्मिक कुलाचार चित्पावन ब्राह्मणांमध्ये असून इतर कोणत्याही ब्राह्मण पोटजातीत तो आढळत नाही.
 
चित्पावनांची स्वतःची चित्पावनी नावाची कोकणी भाषेची उपबोली होती १९५०च्या दशकानंतर ह्या भाषेत बोलणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झालेली असली तरी, आजही गोवा आणि कर्नाटकाच्या दक्षिण कानडा जिल्ह्यातील चित्पावन आपल्या कुटुंबांमध्ये ही बोली टिकवून आहेत. ऑर्कुटसारख्या माध्यमातून चित्पावनी भाषेचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रय्त्‍न केले जात आहेत. देशावरील बहुतेक चित्पावन ब्राम्हणांनी चित्पावनी आणि कोकणीचा उपयोग सोडून मराठी भाषेचा अवलंब सुरू केला. एके काळी चित्पावन ब्राम्हणांचे संस्कृत भाषेवरसुद्धा लक्षणीय प्रभुत्व असे. चित्पावनी भाषेतील मूळ सानुनासिक उच्चारांचा प्रभाव चित्पावनांच्या मराठी बोलण्यावर आढळतो. अर्थात हा मुद्दा वगळल्यास चित्पावन बोलत असलेली मराठी ही जवळपास प्रमाण मराठी भाषेसारखीच असते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मात्र चित्पावनांनी स्वतःच्या शालेय शिक्षणाकरिता प्राथमिक स्तरापासूनच्या इंग्रजी शिक्षणाचा वापर प्रामुख्याने चालू केला. तसेच एकूण ब्राम्हण समाजाला भारतात मिळणाऱ्या सापत्‍न वागणुकीला कंटाळून चित्पावन मोठ्या प्रमाणावर पाश्चिमात्य देशांत स्थलांतर करू इच्छितात, निदान तशी स्वप्ने पाहतात. अशाने मराठी भाषेचा वापर नवीन पिढीत बोलीभाषेपुरता मर्यादित होत चाललेला आहे. चित्पावनी बोलीतील काही शब्द चेड (मुलगी), बोड्यो (मुलगा), कें (कुठे), कितां (काय), सां (आहे), में (मी), विन्चां (संध्याकाळ), नय (नदी), थेयलां (ठेवले), घेव्नी (घेऊन), येचां (येणारा), हाड (आण), ओखद (औषध), चखोट (चांगले), पेख (थांब), आत्वार (स्वयंपाकघर), नाकां (नको), यठां (ईथे), कईकध
 
- सोशल मीडिया