1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जून 2023 (08:54 IST)

टायटॅनिक जहाज बुडाल्यानंतर 110 वर्षं उलटली तरी 'ही' चार रहस्यं कायम

 Titanic
एडिसन वेगा
बरोबर 110 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. टायटॅनिक या जहाजातून प्रवास करणारे बहुतांश प्रवासी तर झोपेतचं होते. त्या अंधाऱ्या रात्री टायटॅनिक हिमनगावर जाऊन आदळलं.
 
टायटॅनिक इंग्लंडच्या साउथॅम्प्टन येथून 41 किलोमीटर प्रतितास वेगाने अमेरिकेतील न्यूयॉर्ककडे जात असताना हा अपघात घडला. अवघ्या तीन तासातच म्हणजे 14 आणि 15 एप्रिल 1912 च्या मध्यरात्री टायटॅनिक अटलांटिक महासागरात बुडालं.
 
असं एक जहाज जे कधीच बुडणार नाही अशा चर्चा असायच्या त्याच जहाजाला जलसमाधी मिळाली. या अपघातात सुमारे 1500 लोकांचा मृत्यू झाला. 110 वर्ष उलटून गेली तरी हा सर्वात मोठा सागरी अपघात मानला जातो.
 
सप्टेंबर 1985 मध्ये या जहाजाचे अवशेष अपघाताच्या ठिकाणाहून हलवण्यात आले. हा अपघात कॅनडापासून 650 किलोमीटर अंतरावर 3,843 मीटर खोलीवर झाला होता. अपघातात जहाजाचे दोन तुकडे झाले आणि दोन्ही भाग एकमेकांपासून 800 मीटर दूर अंतरावर होते.
 
या दुर्घटनेला 110 वर्षे उलटून गेली मात्र आजही हा अपघात एक रहस्य आहे. बीबीसी न्यूज ब्राझीलने काही तज्ञांशी बोलून या रहस्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला.
 
1. हे जहाज बुडण्याची शक्यताच नव्हती.
या अवाढव्य जहाजाबद्दल असं म्हटलं जात होतं की ते बुडण्याची शक्यताच नव्हती. देवही त्याला बुडवू शकत नव्हता. हा विश्वास निर्माण झाला होता कारण त्याला कारणंही तशीच होती.
 
फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ डी जनेरियो येथील नौदल आणि महासागर अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक आणि अभियंता अलेक्झांडर डी पिन्हो अल्हो सांगतात, "या जहाजात अनेक वॉटरटाइट कंपार्टमेंट्स बांधण्यात आले होते. म्हणजे जर जहाजाची एक खोली पाण्याने भरली तरी दुसरी खोली पाण्याने भरणार नाही."
 
हे जहाज तयार करताना काही अडचणी आल्या. विजेच्या तारा आणि पाण्याचे पाइप व्यवस्थित काम करत राहावेत यासाठी त्या जहाजाची उंची किती ठेवावी यावर बराच विचारविनिमय झाला.
 
प्रोफेसर अल्हो यांच्या म्हणण्यानुसार, "शेवटी विचारांती जहाजाची उंची ठरवली. जरी जहाजात पाणी शिरलं तरी हे पाणी छताच्या उंचीपर्यंत पोहोचणार नाही यावर ही त्यांनी विचार केला. त्यांनी छतावर सुरक्षित कंपार्ट्मेंट्स ही बनवले."
 
पण तेव्हा हिमनागशी भीषण टक्कर होईल याचा विचार कोणी केला नसेल.
 
प्रोफेसर अल्हो सांगतात, "हिमनगाचा आघात इतका जोरदार होता की जहाजाचा मुख्य भाग असलेल्या लांबीच्या अर्ध्यापर्यंत खोच पडली आणि या स्थितीत पाणी छतापर्यंत पोहोचलं."
 
"जहाज पूर्णपणे पाण्याने भरलं होतं. अशा परिस्थितीत बचाव करणं शक्य नव्हतं. तुम्ही जहाजातलं पाणी काढण्यासाठी सर्व पंप कार्यान्वित करू शकता, तुम्ही हरप्रकारे प्रयत्न करू शकता, पण ज्या वेगाने पाणी आत येत त्याच वेगाने ते बाहेर पडू शकत नव्हतं."
 
जहाज बांधणी आणि नेव्हिगेटर सिव्हिल इंजिनियर थिअरी स्पष्ट करते की, "टायटॅनिकचा प्रचारच मुळी न बुडणार जहाज असा केला होता. याचं कारण असं होतं की, अनेक तळघरं वॉटरटाईट भिंतींनी बांधली गेली होती. तळघरांच्या दोन रांगांमध्ये पाणी भरलं तरी जहाज बुडणार नव्हतं. पण हिमनगाशी टक्कर झाल्यामुळे जहाजाचे मोठे नुकसान झाले आणि वॉटरटाइट कंपार्टमेंटच्या अनेक भिंती नष्ट झाल्या."
 
फ्लुमिनेन्स फेडरल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि वाहतूक अभियंता ऑरिलो सोरास मूर्ता यांच्या मते, "टायटॅनिकची वॉटर टाईट कंपार्टमेंट बंद करण्याची यंत्रणा देखील योग्यरित्या काम करत नव्हती."
 
त्या काळी जहाज बनवण्यासाठी वापरण्यात येणारा धातू सध्याच्या स्टीलइतका मजबूत नव्हता.
 
सोरास मुर्ता पुढे सांगतात की, "जोरदार टक्कर झाल्यानंतर जहाजाची रचनाही बदलली. दरवाजे ही बंद होत नव्हते, ते अडकले होते. त्या काळातही टायटॅनिक शुद्ध स्टीलचे बनले होते, पण त्यावेळचे स्टील आजच्या स्टीलइतके मजबूत नव्हते."
 
साओ पाओलो येथील मॅकेन्झी पेर्सेबायटेरियन युनिव्हर्सिटीमधील धातूविज्ञानाचे प्राध्यापक जॉन वैतावुक स्पष्ट करतात की, 1940 च्या दशकापर्यंत जहाजाचा मुख्य भाग हा धातूच्या शिट्सचा बनलेला असायचा.
 
मात्र, नंतरच्या काळात या जहाजाचे मुख्य भाग तयार करण्यासाठी धातू वितळवून वापरण्यात आले.
 
वैतावुक सांगतात, "तो काळ आणि आत्ताच काळ यांची तुलना केली तर तंत्रज्ञान आणि साहित्यात बरेच बदल झाले आहेत. आता धातू वितळवून शिट्स जोडल्या जातात. स्टील बनवताना कार्बनचा वापरही कमी होत आहे आणि मॅंगनीजचा वापर वाढू लागला आहे. आजचे स्टील हे खूप मजबूत आहे. ."
 
वैतावुक यांच्या मते, आजची जहाज पाण्याशी, समुद्राच्या लाटा आणि वादळांच्या चढउतारांशी जुळवून घेण्यास अधिक सक्षम आहेत.
 
2. 'ब्लू बँड' मिळवण्यासाठी स्पर्धा
मोठ्या अपघातानंतर त्यांच्या कारणांमध्ये बऱ्याचदा मानवी दोष आढळून येतो.
 
तज्ज्ञांच्या मते, हिमनगाने भरलेल्या भागातून जाण्यात अडचणी असतानाही हा प्रवास लवकर पूर्ण करण्यासाठी खूप दबाव होता.
 
वास्तविक हा दबाव 'ब्लू बँड' मिळवण्यासाठी होता. 1839 च्या सुरुवातीस, हा मान अटलांटिक महासागर पार करणाऱ्या सर्वात वेगवान जहाजाला दिला जायचा. टायटॅनिक ही या सन्मानाची प्रबळ दावेदार मानली जात होती.
 
प्रोफेसर अल्हो म्हणाले, "त्या काळातील सर्वोत्तम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून टायटॅनिक बनवण्यात आली होती. त्यावेळी जहाज बनवण्यासाठी जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा होती. सर्वात लांब आणि वेगवान जहाज तयार करण्यासाठी इंग्लंड आणि जर्मनीमध्ये ही स्पर्धा सुरू होती."
 
सर्वात मोठ्या आणि वेगवान जहाजाला अधिकृतपणे 'ब्लू बँड' मिळायचा. हा पराक्रम साधण्यासाठी कोणत्याही जहाजाचा पहिला प्रवास हा सर्वात महत्त्वाचा मानला जायचा.
 
अल्होच्या यांच्या मते, "पहिल्या प्रवासात जहाजाची स्थिती सर्वोत्तम असते, पहिल्या प्रवासात जहाज सर्वात वेगवान प्रवास करू शकते आणि टायटॅनिकनेही तसाच वेग वाढवण्याचा प्रयत्न केला होता."
 
या अपघातातून वाचलेल्यांपैकी अनेकजण सांगतात की, जहाजाच्या कॅप्टनला वाटेत एका हिमनग असल्याची माहिती मिळाली होती. पण त्याने जहाजाचा वेग कमी केला नाही कारण तो अटलांटिक महासागर लवकरात लवकर पार करण्याच्या प्रयत्नात होता.
 
3. बुडणाऱ्या जहाजांमध्ये टायटॅनिकचं एकटंच जहाज नव्हतं
.जहाज चालवणाऱ्या व्हाईट स्टार लाइन कंपनीने 20 व्या शतकाच्या सुरुवातीला बेलफास्ट शहरातील हार्लंड आणि वुल्फ शिपयार्डमध्ये तीन जहाज बांधण्याचे आदेश दिले होते.
 
जागतिक दर्जाच्या डिझाइन टीमने बांधलेली ही तीन जहाज जगातील सर्वात लांब, सुरक्षित आणि सुसज्ज असतील अशी अपेक्षा होती. "या प्रकल्पांना त्यावेळी चांगलीच प्रसिद्धीही मिळाली होती" असं अभियंता स्टंप सांगतात.
 
1908 ते 1915 या काळात बांधलेल्या या जहाजांना ऑलिम्पिक श्रेणीतील जहाज म्हटलं जायचं. 1908 मध्ये 'ऑलिम्पिक' आणि 1909 मध्ये 'टायटॅनिक' ही पहिली दोन जहाज तयार करण्याच काम सुरू झालं. 'जाइजेन्टिक' हे तिसरं जहाज 1911 मध्ये तयार करायला सुरुवात झाली.
 
विशेष म्हणजे ही तीनही जहाजं कोणत्या ना कोणत्या अपघातात सापडली होती.
 
'ऑलिम्पिक' जहाजाने जून 1911 मध्ये सेवा सुरू केली त्याच वर्षी ते युद्धनौकेला धडकलं. दुरुस्तीनंतर हे जहाज सेवेत पूर्ववत दाखल झालं.
 
पहिल्या महायुद्धादरम्यान, ब्रिटिश नौदलाने सैनिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी याचा वापर केला. 1918 मध्ये ते जर्मन पाणबुडीला धडकलं. दुरुस्तीनंतर, 1920 पासून ते पुन्हा वापरात आलं. जुने आणि विश्वासार्ह मानले जाणारे हे जहाज 1935 पर्यंत वापरात होते.
 
टायटॅनिकने 10 एप्रिल 1912 रोजी पहिला प्रवास सुरू केला. साउथॅम्प्टन बंदराबाहेर असलेल्या दुसर्‍या जहाजाशी टक्कर होता होता ते वाचलं. मात्र 14 एप्रिलला ते एका ऐतिहासिक अपघाताचा बळी ठरलं.
 
'जाइजेन्टिक' जहाज देखील फारसं वापरात नव्हतं. पुढे त्याचं नाव बदलून ब्रिटानिक ठेवण्यात आलं. पहिल्या महायुद्धात ब्रिटीश नौदलाने या जहाजाच हॉस्पिटलमध्ये रूपांतर केल. नोव्हेंबर 1916 मध्ये हे जहाज बुडालं.
 
ही तिन्ही जहाज त्यांच्या काळात खूप मोठी आणि अवाढव्य होती पण आजच्या तुलनेत ती खूप लहान होती.
 
"आजच्या जहाजांच्या तुलनेत त्या फक्त बोटी होत्या," असं मुर्ता म्हणतात.
 
टायटॅनिकची लांबी 269 मीटर होती. चालक दल आणि प्रवाशांसह, सुमारे 3300 लोकांच्या निवासाची यात व्यवस्था होती. आजचे सर्वात मोठे समुद्री जहाज वंडर ऑफ द सी आहे. हे जहाज 362 मीटर लांब असून 2,300 क्रू मेंबर्स आणि 7,000 प्रवासी यातून प्रवास करू शकतात.
 
4. एवढे मृत्यू झाले त्यामागे नेमकं काय कारण होतं?
टायटॅनिक दुर्घटनेत सुमारे 1500 लोक मरण पावले. त्यानंतर सागरी जहाजांची सुरक्षा व्यवस्था सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले. या दुर्घटनेनंतर समुद्रात जाणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी रडारसारख्या उपकरणांच्या वापराची सुरुवात झाली.
 
प्रोफेसर अल्हो सांगतात, "रडारचा वापर दुसऱ्या महायुद्धानंतरच सुरू झाला. त्याआधी सर्व काही पाहणीवर अवलंबून होतं. एक खलाशी एका उंचीवर बसायचा तिथून तो जवळ येत असलेला हिमनग पाहून अलर्ट द्यायचा. जर जहाज जास्त वेगाने पुढे जात असेल तर मात्र हा मार्गमार्ग सुरक्षित नव्हता."
 
टायटॅनिक दुर्घटनेतील सुरक्षिततेच्या तरतुदींवर भर देण्यात आला होता. टायटॅनिक दुर्घटनेत अनेक लोक मरण पावले कारण त्यांच्याकडे लाइफबोट नव्हती.
 
प्रोफेसर अल्हो स्पष्ट करतात, "कधीही बुडणार नाही, या विश्वासामुळे जहाजात फक्त अर्ध्याच लाइफबोट्स ठेवल्या गेल्या."
 
त्याचवेळी मुर्ता सांगतात, "जहाजांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना एक महत्त्वाची पायरी ठरली. जहाजांच्या सुरक्षेसाठी एक संस्थात्मक चौकट तयार करण्यात आली, बांधकामादरम्यान सुरक्षेच्या बाबींची काळजी घेण्यात आली. त्यात सातत्याने सुधारणा करण्याच्या योजनेवर भर देण्यात आला."
 
"आजच्या काळात रडार आणि सोनार तंत्रज्ञान हिमनगाचा धांडोळा आधीच घेतात. आज समुद्राचं मॅपिंग असो वा प्रवासादरम्यानचे चार्ट हे सर्व अत्याधुनिक स्वरूपात उपलब्ध आहे."