शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. माझा महाराष्ट्र
Written By उमेश अनपट|

पैठण

औरंगाबादपासून दक्षिणेकडे ५६ किलोमीटरवर पैठण तालुका आहे. हा तालुका गोदावरी नदीच्‍या तीरावर वसला आहे. याला मराठवाड्‍याचे प्रवेशद्‍वार म्‍हणूनही संबोधतात. या तालुक्‍याला ऐतिहासिक व नैसर्गिक असे महत्‍व आहे. येथे एकनाथ महाराजांमुळे पैठण प्रसिद्ध आहे. शिवाय पैठणी साड्‍यांचे निर्मिती केंद्रही येथेच आहे. गोदावरी नदीवरील सर्वंत मोठे जायकवाडी धरण येथेच आहे. याच धरणाच्या पाण्यावर ज्ञानेश्‍वर उद्‍यान आहे.

पैठणला एकनाथ महाराजांची समाधी आहे. ही समाधी गोदावरी तीरावर एका आकर्षक व विलोभनीय मंदिरात आहे. या ठिकाणी षष्ठीच्‍या दिवशी नाथषष्ठी नावाने मोठी यात्रा भरते. महाराष्‍ट्रातील वारकरी संप्रदाय या वेळी मनोभावे येथे उपस्‍थित असतो. येथेच ज्ञानेश्‍वर महाराजांनी रेड्‍याच्‍या मुखातून वेद वदवून घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते.

पैठण जगप्रसिद्ध पैठणी साड्‍यांसाठी प्रसिद्‍ध आहे. या साड्‍यांना आकर्षक असा जरतारी पदर असतो. या साडीमध्‍ये स्त्रीचे सौंदर्य अतिशय खुलून दिसते. या साड्‍या हातावर विणल्‍या जातात. येथील पैठणी हातमाग केंद्राला भेट देऊन थेट तेथूनच पैठणी खरेदी करू शकतो.

प्रसिद्ध जायकवाड धरण पाहणे हा अतिशय रम्य अनुभव आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्याला आता नाथसागर असे संबोधततात. या धरणाचे वैशिष्ट्‍य म्‍हणजे ते सपाट जमिनीवर आहे. अशा प्रकारचे ते आशिया खंडातील केवळ दूसरे धरण आहे. शिवाय त्याचे बांधकाम मातीत केले आहे. धरणाची भिंत जवळजवळ पंधरा किलोमीटर लांबीची आहे. धरणाला सत्‍तावीस मोर्‍या आहेत. या धरणाला मराठवाड्‍याला अनन्‍यसाधारण महत्‍व आहे. या धरणावर मासेमारीही चालते. धरणातील माशांची चव आपल्‍याला येथील हॉटेलमधून चाखायला मिळते. या धरणावर संध्‍याकाळ घालवणे हा विलोभनीय अनुभव आहे. धरणाच्‍या भिंतीवर उभा राहून धरणातील पाणी पाहिल्‍यास या धरणाची दोन रूपे आपणास पहायला मिळते. एक रूप अतिशय मनमोहक आणि दुसरे आक्राळ विक्राळ. हे धरण पहाताना एखाद्‍या सागराच्‍याच किनारी असल्‍याचा आपल्‍याला भास होतो. संध्‍याकाळी क्षितिजापलिकडे डुंबणार्‍या सुर्याची क‍िरणे समुद्राच्‍या पाण्‍याला सोनेरी करून टाकतात. हे दृश्‍य अतिशय मनमोहक दिसते.

जवळच ज्ञानेश्वर उद्यान आहे. या उद्यानाचे वैशिष्‍ट्‍य म्हणजे ते म्‍हैसूरच्‍या वृंदावन गार्डनची प्रतिकृती आहे येथे लहानांपासून मोठ्‍यांपर्यंत सर्वांच्‍याच मनाला विरंगुळा मिळतो. मनमोहक फुलांनी युक्‍त असा बगिचा येथे आहे. लहानग्यांना खेळण्‍यासाठी खेळ उद्यान आहे. मुलांसाठी आगगाडी आहे. रंगीबिरंगी कारंजे आहेत. पोहण्‍याचा आनंद लुटण्‍यासाठी धबधबाही आहेपाण्‍याच्‍या तालावर नाचणारे पाणी पहाण्‍याचा एक वेगळाच आंनंद आहे. येथे आल्यानंतर आपण आपला थकवा विसरून उत्साह, आनंद मिळवतो.