शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By वेबदुनिया|

चोरवडला भरणारी भूतांची जत्रा

नरेंद्र राठोड
WDWD
खरा भारत खेड्यात रहातो असे म्हणतात. खेड्यांचा आणि जत्रेचा संबंध तर अतूट आहे. जत्रा भरत नसलेले गाव शोधूनही सापडणार नाही. श्रद्धा व अंधश्रद्धाच्या या भागात आम्ही आपल्याला एका आगळ्या वेगळ्या जत्रेत घेऊन जात आहोत. या जत्रेत पाळणे आहेत. खेळण्याची, खाण्यापिण्याची दुकाने आहेत. रहाट पाळणे आहेत. पण या बरोबरच भूतदेखिल आहेत. वाचून धक्का बसला असेल. पण हे खरं आहे. आम्ही आपणास घेऊन जातोय जळगाव जिल्ह्यातील चौखड या गावी. या गावात भरणारी भूतांची जत्रा परिसरात खूप प्रसिद्ध आहे.

दरवर्षी दत्तजयंतीच्या दिवशी ही भूतांची जत्रा भरते. हे ऐकून आम्ही त्या दिवशी चौरवडला गेलो. गावाजवळ पोहचल्याबरोबर झुंडीने येणारे लोक दिसू लागले. यात झुंडीत काही लोक चित्रविचित्र हालचाली करत होते. बरळत होते. पाहतानाच ते मनोरूग्ण असावेत असे वाटत होते.

WD
या गटातील काही लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला समजले, की, ही मंडळी त्यांच्या मित्रांना भूतबाधा झाल्याने चौरवडच्या जत्रेत घेऊन आले आहेत. दत्त महाराजांच्या प्रभावामुळे भूतबाधित व्यक्ती आपोआप या गावाकडे खेचल्या जातात, असे एकाने आम्हाला सांगितले. त्यांची भूतबाधा दत्त महाराजांमुळे दूर होते, अशी त्यांची श्रद्धा आहे.

त्यांच्याशी चर्चा करत आम्ही यात्रेत पोहचलो. इतर यात्रांप्रमाणेच या यात्रेतही रहाट पाळणे होते. तिकडे गर्दी होती. पण त्यापेक्षा जास्त गर्दी अंगात येणारे व वेडेवाकडे हावभाव करणार्‍यांची होती. काही जण विचित्र आवाज काढत होते. काही स्वत:शीच गप्पा मारत होते.

WDWD
या लोकांचे विचित्र वागणे मनाला विषण्ण करत होते. चित्रविचित्र आवाज काढणारे काही मनोरूग्ण चबूतर्‍यावर जाऊन तेथून उड्या मारत होते. काही जण तेथे जाऊन नमस्कार करत होते. नमस्कार केल्यानंतर काही वेळाने त्यांचे हे विचित्र वागणे कमी झाल्यासारखे वाटले. त्यांच्यासोबत आलेल्या लोकांच्या मते ते आता भूतबाधेतून मुक्त झाले होते. आम्ही पूर्ण दिवस या यात्रेत भटकलो. या रूग्णांमध्ये महिलांचीच संख्या जास्त होती.

WDWD
हे सर्व मनोरूग्ण आहेत हे दिसताक्षणीच आम्हाला जाणवत होते. त्यामुळे त्यांना बरे करण्यासाठी मनोचिकित्सा व प्रेमाची गरज आहे. येथील परमेश्वरच आपल्याला या व्याधीतून दूर करेल, असा विश्वास येथे आलेल्या लोकांत होता. त्यांच्या मते परमेश्वर आहे, असे आपण मानतो तर मग भूतांवर अविश्वास का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला जरूर कळवा.