1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (14:53 IST)

दिवाळीसाठी रेल्वे आणि खासगी बसचे आरक्षण फुल्ल; एसटीच्या ज्यादा गाड्यांचे नियोजन अद्यापही बासनात

आपल्याकडे कोणताही सण म्हटले की, गावाकडे जाण्याची प्रथा आहे, विशेषतः दिवाळी सणात तर गावाला जाण्यासाठी सर्वांचीच गर्दी होते. परंतु यंदा दिवाळी सणाला केवळ आठवडाभराचा कालावधी शिल्लक असतानाही राज्यभरातील विविध मोठ्या शहरांमधून तसेच महत्त्वाच्या आगारांमधून एसटी महामंडळाने जादा बसेस तथा गाड्या सोडण्याची घोषणाही केलेली नाही. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत, मात्र त्यातही महामंडळाचा मोठा बसण्याची फटका शक्यता आहे.
 
दिवाळीनिमित्त महाविद्यालये व शाळांना सुट्टी असल्याने गावी जाणाऱ्यांची एसटी बसला गर्दी असते. कारण सर्व सामान्यांसाठी आणि मध्यमवर्गीयांसाठी एसटीए परवडणारे साधन आहे कारण खाजगी वाहनांचे भाडे त्यापेक्षा जास्त असते, त्यामुळे बहुतांश जण एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे दिवाळीपूर्व नियोजनास एसटी महामंडळाकडून सुरुवात झाली, असे सांगण्यात येत असले, तरी अद्यापही अनेक मोठ्या शहरांमध्ये ज्यादा बसेसचे नियोजन झालेले नाही, असे समजते आहे.
 
दि.१७ ते ३१ ऑक्टोबर या कालावधी दिवाळी जादा वाहतुकीचा असताना वाहतूक करताना एसटी बसेसची संख्या महामंडळाकडून वाढवण्यात येणार आहे. त्याकरिता पुरेशा गाड्या उपलब्ध राहतील, दिवाळी कालावधीमध्ये एकही मार्ग बंद राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना एसटी महामंडळाकडून राज्यातील सर्व आगारांना देण्यात आली आहे. मात्र यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच अनेक कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्याने ते रजेवर जाण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर मागील वर्षाप्रमाणे पुन्हा एकदा संप होतो की काय? अशी देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच्या महाविका आघाडी सरकारच्या काळातील अनेक निर्णय बदलेले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप झाला, तेव्हा भाजपकडून त्यांना पाठिंबा देण्यात आला होता. त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. आता भाजप सत्तेवर आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे प्रकार तातडीने करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून दिवाळीच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन नियमित बससह जादा बसचे नियोजन करण्यात येते. यामुळे दिवाळीत एसटीने राज्यभरात वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळतो. यंदाही दिवाळीपूर्व तयारी करताना प्रशासनाने एसटीच्या जादा बसेसबाबत नियोजन करण्यास सुरुवात होणे गरजेचे आहे. तसेच सर्व स्वमालकीची वाहने विशेषतः शिवनेरी व शिवशाही वाहने ऑनरोड राहतील, मार्गबंद राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही महामंडळाकडून करण्यात आल्या आहेत.
 
यंदा खासगी प्रवासी बस वाहतुकदारांनी दिवाळीनिमित्त भाडेवाढ केली असून त्यामुळे राज्यातील सर्व भागात प्रवास महागला आहे. याशिवाय २० ऑक्टोबरपासून रेल्वेच्या सर्वच एक्सप्रेस गाड्याचे आरक्षण देखील फुल झाले असून त्यामुळे प्रवाशांना एसटी शिवाय पर्याय उरलेला नाही, त्याकरता नेहमीपेक्षा जादा सोडणे आवश्यक ठरणार आहे. मात्र अद्याप ज्यादा एसटी बसबाबत ठोस भूमिका घेतली नसल्याचे सांगण्यात येते, त्यामुळे खासगी प्रवासी बस गाड्यांचे तिकीट काढण्याशिवाय पर्याय प्रवाशांना राहिलेला नाही. त्यासाठी खासगी प्रवासी बस वाहतुकदारांकडे आरक्षणही होत आहे.

Edited by: Ratnadeep Ranshoor