गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (16:06 IST)

कोकणवासीयांना मदत करत 'हरिओम'नी जपली सामाजिक बांधिलकी

कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकांचे हात सरसावले आहेत. त्यात सिनेसृष्टीतील कलाकारही मागे नाहीत. या कठीण काळात कोकणवासीयांच्या मदतीला अनेक नावाजलेले कलाकार पुढे येत असतानाच दोन नवोदित कलाकारही त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. 'हरिओम' या आगामी मराठी चित्रपटात हरी आणि ओमची भूमिका साकारणारे हरिओम घाडगे आणि गौरव कदम पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले असून सिंह नरवीर तानाजी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते मदत करत आहेत. दोन आयशर टेम्पो भरून संसार उपयोगी साहित्य त्यांनी जमा केले आहे. पोलादपूर, महाड, चिपळूण व कोल्हापूरमधील पूरग्रस्तांची हरिओम घाडगे व गौरव कदम यांनी भेट घेऊन त्यांना मानसिक आधार देत, सर्वतोपरी मदत केली.
 
कांदिवली आणि मालाड पश्चिम मधील भूमी पार्क, न्यू म्हाडा टॉवर, अस्मिता ज्योती को. हौ. सोसायटी, जनकल्याण नगर, म्हाडा, येथे मदतफेरी काढून सिंह नरवीर तानाजी प्रतिष्ठानच्या वतीने पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. नागरिकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गहू, गव्हाचे पीठ, तांदूळ,डाळीं, किराणामाल, औषधे, पाणी बॉटल, मेणबत्या, कपडे, अंथरूण-पांघरूणचे कपडे इत्यादी संसार उपयोगी साहित्याच्या रूपाने पूरग्रस्तांनसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
 
अशा या कठीण प्रसंगी नवोदित कलाकार सामाजिक भान जपत मदतीसाठी पुढे सरसावतात हे नक्कीच कौतुकास्पद आहे.