गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 15 ऑगस्ट 2021 (13:16 IST)

स्वातंत्र्यदिन: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 13 महत्त्वाचे मुद्दे

भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्षं साजरे करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च मध्ये गुजरातच्या अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातून 'आझादी का अमृत महोत्सव' सुरू केला होता, जो 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून सलग आठव्यांदा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत.
 
आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. आपणा सर्वांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवीन चेतना घेऊन येईल. जय हिंद!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 13 महत्त्वाचे मुद्दे
1. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना वंदन करण्याचा दिवस. देशासाठी सर्वस्व पणाला लावणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह झाशीची राणी, राणी चेन्नमा, राणी गंडिल्यू यांच्यासह पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करण्याचा दिवस. देश या महापुरुषांचा ऋणी राहील.
 
2. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या युवा पिढीने देशाचं नाव उज्वल केलं आहे. हे सगळे आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. देशासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान. आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी अशी कामगिरी युवा पिढीने केली आहे.
 
3. फाळणीच्या अनेक कटू आठवणी आहेत. फाळणीची जखम अनुभवणाऱ्या नागरिकांप्रती आदरांजली देण्याचा दिवस.
 
4. आपल्या वैज्ञानिकांनी कोरोनावर लस शोधून काढली. लशीसाठी आपण कोणत्याही देशावर अवलंबून नाही. आपली स्वत:ची लस नसती तर आपलं काय झालं असतं याचा विचार करा. जगभरात कोरोनाचं संकट आहे. आपल्याकडे लस नसती तर आपल्याला लस मिळाली असती का? जगातली सगळ्यात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरू आहे.
 
कोव्हिन अप, डिजिटल सर्टिफिकेट ही व्यवस्था जगाला आकर्षित करत आहे. अनेक महिने गरिबांना आपण मोफत अन्नधान्य पुरवलं. जगासाठी ही अचंबित करणारी गोष्ट आहे.
 
5. आपली लोकसंख्या प्रचंड आहे. आपली जीवनशैली वेगळी आहे. अनेक देशवासीयांना आपण वाचवू शकलो नाही. अनेक बालकं अनाथ झाली. घरातली कर्ती माणसं निघून गेली. या वेदना सदैव आपल्याबरोबर असतील.
 
6. अमृतमहोत्सवाचं लक्ष्य आहे की अशा भारताचं निर्माण जिथे सुविधा सर्वसमावेशक असतील. अशा भारताचं निर्माण जिथे नागरिकांच्या जीवनात सरकार विनाकारण दखल घेणार नाही.
 
7. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हे आपलं उद्दिष्ट असणार आहे.
 
8. समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. भ्रष्टाचाराला जराही थारा नाही. अनेक योजना राबवल्या जात आहेत. गरिबांना पोषणयुक्त तांदूळ. छोट्या गावखेड्यांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न. दलित, उपेक्षित, आदिवासींसाठी आरक्षण सुनिश्चित केलं जाईल.
 
9. ईशान्य भारत, लडाख, जम्मू-काश्मीर हे भारताच्या विकासाचं मोठे आधारस्तंभ होणार आहेत. ईशान्य भारतात दळणवळणाच्या सोयी प्रस्थापित केल्या जात आहेत. ईशान्य भारतात ऑर्गनिक फार्मिंग, हर्बल मेडिसिन, पर्यटन यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. आपल्याला हे काम अमृतमहोत्सवाच्या काही दशकातच पूर्ण करायचं आहे.
 
10. भारत सहकार भावनेला महत्त्व देतो. अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने सहकार क्षेत्र महत्त्वाचं आहे. सहकार हा एक संस्कार आहे. सहकार म्हणजे एकत्र चालण्याची भावना आहे.
 
11. देशभरात 75 वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जातील. देशात हवाई वाहतुकीचं जाळं अधिक विस्तारलं जात आहे.
 
12. खेळाच्या मैदानावर भाषेचा अडसर आला नाही. त्यांनी देशवासीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी केली. देशात खेळ आणि फिटनेसप्रति जागरुकता वाढली आहे.
 
खेळ शाळा-महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग आहेत. भारताच्या लेकी देदिप्यमान प्रदर्शन करत आहेत. महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी मिळेल याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. रस्त्यापासून कामाच्या ठिकाणापर्यंत महिलांना सुरक्षित वाटणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे.
 
13. मुलींसाठी सैनिक स्कूलचे दरवाजे खुले झाले आहेत. देशातील सगळ्या सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्यात येईल. मिझोरममध्ये हा प्रयोग केला होता पण आता हा देशभरात लागू होणार.
 
याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी भाषणादरम्यान नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा. ऊर्जा क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवेल. ग्रीन जॉब्सच्या संधी निर्माण होतील असंही त्यांनी सांगितलं.
 
"आपण लढाऊ विमानं, पाणबुड्या तयार करत आहोत. भारताचे स्टार्टअप्स संपूर्ण जगासाठी चर्चेचा विषय झाले आहेत. गव्हर्नन्सचं नवं प्रारुप आपण विकसित केलं आहे. नागरिकांना कोणताही त्रास न होता सोयीसुविधा मिळायला हव्यात", असं त्यांनी सांगितलं.
 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूंची उपस्थिती आकर्षणाचं केंद्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जाणार आहे. याशिवाय करोना योद्ध्यांसाठी विशेष ब्लॉकची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्समधून फुलांचा वर्षाव होणार आहे.
 
सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रासहित टोकियो ऑलिम्पिकमधील ३२ खेळाडूंना स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर निमंत्रित करण्यात आलं आहे. जवळपास 240 ऑलिम्पिकपटू, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचा सपोर्टचे कर्मचारी आणि स्पोर्ट्स फेडरेशनचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.