रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023 (13:47 IST)

Ujjain Rape Case: बलात्कारानंतर रक्तानं माखलेल्या कपड्यांनी 'ती' अडीच तास भटकत राहिली

rape
मध्य प्रदेशातील उज्जैन येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनीआतापर्यंत पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यात एका रिक्षा चालकाचाही समावेश आहे.
आरोपी असलेल्या रिक्षाचालकाला काल (28 सप्टेंबर) पोलिसांनी घटनास्थळी नेलं असता, तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पळताना भिंतीला धडकला आणि कोसळला. पोलिसांनी त्याला पकडलं आणि जखमी झालेल्या या आरोपी रिक्षाचालकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
 
25 सप्टेंबर 2023 रोजी उज्जैनमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली.
 
महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडनगर रोडवरील दांडी आश्रमाजवळ सोमवारी (25 सप्टेंबर) सायंकाळी ही मुलगी जखमी अवस्थेत आढळून आली. तिचे कपडे रक्ताने माखले होते.
 
याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ही मुलगी सुमारे अडीच तास फाटलेल्या, रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये संवरखेडी सिंहस्थ बायपासच्या वसाहतीमध्ये भटकत राहिली.
 
पण तिला स्थानिक लोकांकडून कोणतीही मदत मिळाली नाही.
 
पोलिसांनी या भागातील संबंधित सर्व सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहेत. शिवाय, या प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन करण्यात आली आहे.
 
तपासाच्या आधारे या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल, असं मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी भोपाळमध्ये पत्रकारांना सांगितलं आहे.
 
CCTV फुटेजमध्ये काय आहे?
या फुटेजमध्ये ही अल्पवयीन मुलगी तीन रिक्षाचालक आणि इतर दोन लोकांसोबत बोलताना दिसत आहे. या सर्वांची पोलीस चौकशी करत आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मतीमंद आहे आणि ती सतना येथील रहिवासी आहे.
 
पोलिसांनी आधी मुलीचे वय 12 वर्षे असल्याचे सांगितले होते. परंतु FIR मध्ये तिचे वय 15 वर्षे नोंदवले आहे.
 
उज्जैनचे पोलीस अधीक्षक सचिन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ही मुलगी सतना जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. 24 सप्टेंबरपासून ती घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या अपहरणाची तक्रारही सतना येथील पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. मुलीची आई लहानपणीची या मुलीला सोडून गेली होती. तर तिचे वडील अर्धवेडे झाले आहेत. मुलगी गावात तिच्या आजोबा आणि मोठ्या भावासोबत राहते आणि त्याच शाळेत 8 व्या वर्गात शिकतेय."
 
24 सप्टेंबर रोजी तिच्या आजोबांनी आयपीसीच्या कलम 363 अंतर्गत आपली नात बेपत्ता झाल्याबद्दल तक्रार दिली होती, असंही शर्मा यांनी सांगितलं.
 
"मुलगी बडनगर रोडवरील दांडी आश्रमाबाहेर आढळून आल्यावर आश्रमाचे आचार्य राहुल शर्मा यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस त्या मुलीला रुग्णालयात घेऊन गेले. प्राथमिक उपचारानंतर मुलीला इंदूरच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथं तिच्यावर उपचार करण्यात आले. आता मुलीची प्रकृती सुधारत आहे," असंही शर्मा यांनी सांगितलं.
 
सतनामधून पोलिसांचे एक पथक इंदूरला रवाना झालं आहे.
 
मुलगी शाळेतून निघून गेली होती आणि सायंकाळपर्यंत घरी न आल्याने तिचा शोध घेण्यात आला. पण ती सापडली नाही, त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आजोबांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर उज्जैन प्रकरण उघडकीस आल्यावर CCTV व्हिडिओ तिच्या भावाने पाहिला आणि त्याने तिला ओळखलं.
अडीच तास ही मुलगी मदत शोधत राहिली. पण महाकाल शहरात कोणीही पुढे आले नाही. या घटनेने केवळ उज्जैनच नाही तर संपूर्ण मध्य प्रदेश आणि देश हादरला आहे.
 
दरम्यान, आपण उज्जैनला कसे पोहोचलो, हे सांगण्याच्या मनस्थितीत ती नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
 
'मुलीला उभंही राहता येत नव्हतं'
राहुल शर्मा या व्यक्तीने सर्वप्रथम पोलिसांना या मुलीबाबत माहिती दिली. माहिती दिल्यानंतर 20 मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचल्याचं शर्मा सांगतात.
 
ते पुढं म्हणाले, “त्यावेळी मुलीला उभे राहता येत नव्हतं आणि ती जी भाषा बोलत होती, ती त्याला समजत नव्हती. त्यावेळी मुलीची प्रकृती ठीक नव्हती. उज्जैनसारख्या शहरात मुलीला मदत मिळू शकली नाही, याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटत आहे,”
ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे, असे स्थानिक रहिवासी आणि पत्रकार जय कौशल यांनी सांगितलं.
 
पण जेव्हा मुलीला मदत मिळू शकली नाही तेव्हा ते म्हणतात, "लोकांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण झालीय. लोक मदतीसाठी पुढे येत नाहीत. कारण यासाठी त्यांनाच जबाबदार धरलं जाईल की काय याची भीती वाटत असावी. पोलीस त्यांना विनाकारण यात अडकवतील.”
 
काँग्रेसने मध्य प्रदेश सरकारला घेरलं
याप्रकरणी विरोधी पक्ष काँग्रेसने भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे.
 
"मध्ये प्रदेश सरकार मुलींचे रक्षण करण्यास असमर्थ आहे. महिला आणि मुलींवर बलात्काराच्या सर्वाधिक घटना मध्य प्रदेशात आहेत," असं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं.
 
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही सरकारला धारेवर धरले आहे. ते म्हणाले "ही घटना प्रशासन आणि समाजाला कलंक लावणारी आहे. मला मुख्यमंत्र्यांकडून जाणून घ्यायचे आहे की तुम्ही फक्त निवडणुका लढवून खोट्या घोषणा करत राहणार का?"
 
त्याचवेळी भाजपच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनीही मध्य प्रदेश सरकारला घरचा आहेर दिलाय.
 
"एका अल्पवयीन मुलीला रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर फिरत राहणं हे दुर्दैवी आहे. ही घटना आपल्या समाजाला लागलेला कलंक आहे," असं त्या म्हणाल्या.
 
 
 






Published By- Priya Dixit